सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 194

वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. १६ : संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या  संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही वारकरी संप्रदाय करत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वा) सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायातील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रेरणादायी ठरेल असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्ञानोबा- तुकोबांच्या जयघोषाने प्रेरणा मिळते. रंजल्या- गांजल्यांची सेवा करण्याचे बळ संत तुकारामांच्या अभंगातून मिळते. नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठीचा अभिमान वाढला आहे. परंतु, तुकाराम महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच क्लिष्ट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत सांगितले. भेदभाव न करता लोकहितासाठी काम करण्याचा उदात्त संदेश त्यांनी दिला. तुकोबांच्या संदेशानुसार शासन काम करत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे, त्यांच्या आयुष्यात सुख- समाधान आणण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी काम करत आहे. वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू येथे आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत शासन करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी येत असतात. आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा सुरु असताना दर्शन बारी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. निसर्गाचे रक्षण करणेही आपले कर्तव्य आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस प्रयत्न शासन करत आहे. नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची चळवळ ही लोकचळवळ व्हावी, देशातील सर्वात आदर्श नद्या महाराष्ट्रात आहेत असा नावलौकिक करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

ते म्हणाले, तरुण पिढीसाठी संत तुकाराम यांची गाथा ई-बुक स्वरूपात उपलब्ध करुन देण्याचे काम मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच सर्व शाळांमध्ये हे ई-बुक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

यावेळी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

०००

गोरगरीबांना स्वस्तात घरे मिळण्यासाठी प्रयत्न करू – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : येत्या काळात गोरगरीबांना, गरजूंना आणखी स्वस्तात घरे मिळण्यासाठी, त्यांच्या कर्जाचा भार कमी करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.

मिरज शहरातील समतानगर येथे गोखले इन्फ्राडेव्हलपर्स प्रा. लि. व सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या सार्वजनिक खाजगी भागीदारीतील परवडणाऱ्या भीमपलास गृहप्रकल्पातील सदनिकांचे हस्तांतरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, दिपक शिंदे, समित कदम, विनायक गोखले, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, यांच्यासह अधिकारी, महापालिकेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.

देखणी इमारत उभी करून गोरगरीबांच्या स्वप्नातील चांगली घरे निर्माण केल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, गोरगरीबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, त्यांच्या खर्चाचा भार उचलून त्यांना दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक योजना राबवून प्रयत्न करीत आहेत. मोफत शौचालय, उज्ज्वला गॅस योजना, मोफत धान्य वाटप, प्रत्येक घरी थेट नळाने पाणी, लखपती दीदी, शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून वार्षिक 6 हजार रूपये, पाच लाख रूपये पर्यंतचे मोफत उपचार, अशा अनेक योजना राबवून गोरगरीबांना त्यांच्या आर्थिक स्थितीतून वर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या शतकापर्यंत म्हणजेच २०४७ पर्यंत देशाला जगामध्ये अग्रस्थानी ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. यासाठी प्रामाणिकपणे काम करू, व्यसनापासून दूर राहू, शिक्षणाचे प्रमाण वाढवू, मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवू, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी मनोगत व्यक्त करताना या गृह प्रकल्पातून एक देखणी इमारत उभी राहिली असल्याचे सांगून प्रधानमंत्री आवास योजना ही गोरगरीबांच्या आयुष्यात परिवर्तन करणारी योजना आहे. या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगून लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फीत कापून प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना चावी देण्यात आली.

यावेळी लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या स्वप्नातील घर पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

या प्रकल्पामधील एकूण 160 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर आहेत. प्रति लाभार्थी राज्य शासन एक लाख रूपये आणि केंद्र शासन एक लाख 50 हजार असे एकूण प्रति लाभार्थी 2 लाख 50 हजार रूपये याप्रमाणे एकूण 4 कोटी रूपये इतके अनुदान मंजूर आहे. पैकी राज्य शासनाचे पहिले दोन हप्त्यांचे अनुदान एकूण 1 कोटी 24 लाख रूपये वितरित करण्यात आले असून, अंतिम हप्त्याचे एकूण 36 लाख रूपये अनुदान सदनिका हस्तांतरीत केल्यानंतर प्राप्त होणार आहे.

केंद्र शासनाच्या पहिल्या दोन हप्त्यांप्रतीचे अनुदान एकूण 1 कोटी 86 लाख रूपये वितरीत करण्यात आले आहेत. अंतिम हप्त्याचे एकूण 54 लाख रूपये अनुदान सदनिका हस्तांतरीत केल्यानंतर प्राप्त होणार आहे. याशिवाय, कामगार कल्याण महामंडळअंतर्गत अटल बांधकाम कामगारांच्या घरकुलाकरिता 2 लाख रूपये प्रति लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधी व्यतिरिक्त दिले जातात. यासाठी 144 बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. यापैकी मंजूर 62 लाभार्थींना पहिल्या दोन हप्त्यांचे अनुदान एकूण 99 लाख 20 हजार रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. 37 नवीन लाभार्थींना अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून मंजुरी मिळालेली आहे. भीमपलास टॉवर हे निवासी संकुल असून त्यामध्ये दोन विंग आहेत. या दोन्ही इमारती प्रत्येकी 6 मजल्याच्या आहेत.

स्वागत व प्रास्ताविक विनायक गोखले यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले. आभार ऋषिकेश गोखले यांनी मानले.

कार्यक्रमास शासकीय अधिकारी, यांच्यासह लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगरूळ गायरान जमिनीबाबतीत सामोपचाराने मार्ग काढू – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (जिमाका) दि : 15 मौजे सांगरूळच्या ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. सांगरूळ गायरान जमिनीच्या अनुषंगाने शासनस्तरावर आढावा घेवून सामोपचाराने निश्चितपणाने तोडगा काढू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे सांगरूळ गायरान प्रश्नाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी आमदार चंद्रदीप नरकेजिल्हाधिकारी अमोल येडगेनिवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, कृषी अधीक्षक जालिंदर पांगारेजिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधवकरवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिककरवीर गटविकास अधिकारी श्रीमती दिपाली पाटीलगोकुळ संचालक बाळासाहेब खाडेसांगरूळच्या सरपंच श्रीमती शितल खाडे आदी उपस्थित होते.

वनहक्क अधिनिनियमातील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीने नागरी सुविधा करिता जागा मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे त्वरीत सादर करावा, अशी सूचनाही पालकमंत्री आबिटकर यांनी या बैठकीत केली. तसेच हा प्रश्न केवळ सांगरूळ गावाचा नाही तर जिल्ह्यातील इतर गावांबाबतही अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी याप्रसंगी दिली. जिल्हा प्रशासनाकडून याप्रश्नी सांगरूळ ग्रामस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले.

79.9 हेक्टर इतक्या गायरान जमिनीबाबत हा प्रश्न उपस्थित होत आहे. वन विभागाच्यावतीनेही या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद म्हणाले. या बैठकीसाठी मौजे सांगरूळचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

महामार्गावरील स्थानिक समस्यांचे निवारण करून बालिंगा पुलाचे काम करावे – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा ते दोनवडे या दोन गावांमध्ये पंचगंगा नदीवरील प्रस्तावित पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने या महामार्गावरील स्थानिकांच्या समस्यांचे निवारण करून बालिंगा पुलाचे काम करावे तसेच पावसाळ्यात या परिसरातील लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी, अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात या पुलाच्या आढाव्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार चंद्रदीप नरकेजिल्हाधिकारी अमोल येडगे नॅशनल हायवेचे अधीक्षक अभियंता दयानंद विभुते, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता मानेनॅशनल हायवेच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक तर दूरदृष्टीप्रणालीद्वारे संतोष शेलार आदी उपस्थित होते. या पूल उभारणीच्या अनुषंगाने तांत्रिक तज्ज्ञांनी येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट द्यावी अशी सूचना करून आबिटकर म्हणालेपावसाळ्यात या प्रस्तावित पुलाच्या उभारणीच्या अनुषंगाने लोकांना कोणतीही अडचण येऊ नये. त्यांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागू नये. तर या पुलाच्या संदर्भात महाराष्ट्रातील नामांकित डिझायनर घेऊन या पुलाच्या उभारणी संदर्भात सर्वमान्य कालबद्ध तोडगा काढावा, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. या पुलाचा आढावा घेण्यासंदर्भात पुढील शनिवारी बैठक घेवू असे जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले. या बैठकीसाठी गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्यासह बालिंगा व परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे मानले आभार

मुंबई, दि. १५ : केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89व्या’ बैठकीत राज्यातील बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार व कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंबावर उपाय तसेच बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत यांसारख्या प्रवाश्यांच्या आणि मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ अपेक्षित आहे.

हा पायाभूत प्रकल्प ‘पीएमजीएस एनएमपी’च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, यामुळे विविध ठिकाणांदरम्यान जोडणी सुधारेल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.

000

वरंध घाटातील अपघातग्रस्त प्रवाश्यांची मंत्री भरत गोगावले यांनी केली विचारपूस

रायगड जिमाका दि. 15- महाड एसटी डेपोच्या रामदास पठार ते महाड बस क्रमांक एमएच 20 बीएल 38 22 या एसटीला 15 मार्च रोजी महाडच्या दिशेने परतत असताना वरंध घाटात बेबीचा गोल ठिकाणी अपघात झाला.  या अपघातात जवळपास 18 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहॆ. या सर्व जखमी प्रवाश्यांची फलोत्पादन, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे भेट देऊन विचारपूस केल. तसेच जखमीवर सुरु असलेल्या उपचारांची माहिती घेतली.
सर्व जखमीना ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तरी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहॆ. मंत्री श्री. गोगावले यांनी जखमींची विचारपूस केली आणि संबंधित डॉक्टरांकडून रुग्णांच्या उपचारासंबंधी माहिती घेतली.

कामठीचा वाढता विस्तार लक्षात घेता स्वतंत्र उपायुक्त कार्यालय उभारणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. १५ : कामठी शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत असून या विस्ताराला योग्य सुरक्षा व दिशा देण्याच्या दृष्टीने अद्ययावत सर्व सुविधापूर्ण स्वतंत्र पोलिस उपायुक्त कार्यालय उभारले जाणार आहे. या कार्यालयात कामठीतील सर्व सीसीटीव्ही कॅमे-याचे कंट्रोल रूम, वॅार रूम, एसीपी कार्यालय, पोलिस स्थानक, पार्किंगच्या सुविधेसह आदर्श ठरेल या पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे कामठी मेट्रो फेज २ विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नियोजन संचालक अनिल कोकाटे, मेट्रोचे प्रकल्प संचालक राजीव त्यागी, पोलिस उपायुक्त नचिकेत कदम, उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नवीन कामठी पोलिस मेट्रो स्टेशनच्या प्रस्तावाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

तळमजला अधिक दोन मजले अशा स्वरूपात नवीन पोलिस उपायुक्त कार्यालय उभारले जाईल. याच्या निधीबाबत मेट्रोच्या निकषानुसार उपलब्धता करून देण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी मेट्रोला दिले. प्रस्तावित कन्हान मेट्रो विस्तारीकरणाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

कन्हान येथे मेट्रो स्टेशननजीक उभारले जाणार दहा मजली व्यापारी संकुल

कन्हान येथे प्रस्तावित मेट्रो प्रकल्पासाठी कामठी नगरपरिषदेच्या जागेचा योग्य विनियोग व्हावा व स्थानिक व्यापा-यांना व्यवसायासाठी संधी उपलब्ध व्हावी या दृष्टीने हे मेट्रो स्टेशनच्या बाजुला बाजुला एकत्र व्यावसायिक संकुल उभारण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे निर्देश या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. हे व्यापारी संकुल दहा मजली असावे. यात दोन मजले हे पार्किंगसाठी, एक मजला आटोमोबाईल सेक्टर, दुसरा मजला कापड बाजारपेठ, भाजीपाला मार्केटसाठी स्वतंत्र मजला यासह इतर व्यावसायांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे ते म्हणाले. या व्यापारी संकुलाच्या आराखड्यात सर्व बाबींचा विचार व्हावा असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक तालुक्यात बांधकाम कामगारांसाठी होणार सुरक्षा किट वाटप शिबीर

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईत अंतर्गत कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा किट असावे, त्यांच्या रोजच्या उपजीविकेसाठी लागणारी आवश्यक भांडे मिळावे यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यात एकाच ठिकाणी शिबिर आयोजित केल्यास पात्र व अपात्र लाभार्थ्यांमध्ये शंकेचे वातावरण निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता ख-या पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाची ही योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर किमान तीन दिवसाचे शिबिर आयोजित करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभागाला दिले.

प्रत्येक पात्र कामगारांना वाटपापूर्वी संपर्क साधून त्यांना वेळ व दिनांक मेसेजद्वारे कळविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेण्यात आला.

अनेक लोकांच्या जमिन मोजणीबात तक्रारी आहेत. या तक्रारीचे तत्काळ निवारण व्हावे यादृष्टीने भूमी अभिलेख कार्यालयाद्वारे याचे एक निश्चित वेळापत्रक करून तालुकानिहाय मोजणी मोहीम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तालुका पातळीवरील सर्व विभागप्रमुखांचा ग्रामपंचायत व सरपंचांशी समन्वय आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि.15 :  शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना या शेवटच्या घटकातील व्यक्तीचा विकास व्हावा यादृष्टीने आखण्यात आल्या आहेत. यात राज्य शासनासह केंद्र शासनाच्याही योजना आहेत. शेतीपासून पशुसंवर्धनापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत असणा-या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तालुका पातळीवरील प्रत्येक संबंधित विभागप्रमुखांनी सरपंचांशी प्रत्यक्ष समन्वय साधावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मौदा येथे आयोजित सरपंचांच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.

महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता, संख्याज्ञान, कौशल्य विकसित व्हावे यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. याची अंमलबजावणी ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक शाळेत झाली पाहिजे. त्यादृष्टीने जोपर्यंत पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिक शाळांशी समन्वय ठेवणार नाहीत तोपर्यंत वस्तुस्थिती लक्षात येणार नाही. दूरदृष्टी ठेवून मंत्रालय पातळीवर आम्ही शासन निर्गमित करतो हे लक्षात घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्या त्या विभागप्रमुखांची आहे हे विसरता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय विभागांतर्गत, पशुसंवर्धन विभागांतर्गत, कृषी विभागांतर्गत अनेक पायाभूत विकासाच्या योजना आहेत. यात आरोग्याच्या पण आहेत. शेताला जाणारे पांदण रस्ते शेतक-यांना मिळावेत यासाठी आपण राज्यभर मोहीम हाती घेतली आहे. याची अंमलबजावणी प्रत्येक गावपातळीवरील कंत्राटदार व अभियंत्याने जबाबदारीने पार पाडली पाहिजे. यात कुणाच्या तक्रारी येता कामा नये. ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत त्यांच्याविरुद्ध पोलिस कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.

आरोग्य विभागाबाबत अनेक तक्रारी आहेत. संबंधित तालुका आरोग्य अधिका-याने तालुक्यातील प्राथमिक व उपप्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली पाहिजे. प्रत्येक सरपंचाशी समन्वय ठेवून साथीचे आजार, कुष्ठरोग, हत्तीरोग अशा आजारांच्या उच्चाटनासाठी कटिबद्ध असले पाहिजे. जोपर्यंत अधिकारीवर्ग गावपातळीवर जाऊन याचा आढावा घेणार नाही तोपर्यंत लोकांना मिळणा-या सुविधेत बदल होणार नाहीत, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस माजी आमदार टेकचंद सावरकर, उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी, गटविकास अधिकारी विजय झिंगळे व पंचायत समितीतील अधिकारी, मौदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक अधिकारी प्रत्यक्ष गावात भेट देऊन ग्रामपंचायतीशी शासकीय योजनांबाबत चर्चा करत नसल्याच्या तक्रारीबाबत पालकमंत्री  बावनकुळे यांनी संबंधित अधिका-यांकडून खुलासा मागवून घेतला.

जिल्ह्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न – पालकमंत्री संजय राठोड

पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन बसेसचे लोकार्पण

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यातील नऊ डेपोला प्रत्येकी 10 याप्रमाणे एकून 90 नवीन एसटी बसेस उपलब्ध होत आहेत. त्यापैकी यवतमाळ व उमरखेड या डेपोला आज प्रत्येकी 5 बसेस प्राप्त झाल्या. यवतमाळ बसस्थानकावर या बसेसचे लोकार्पण पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते झाले. जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर आपला भर असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस राज्याची जीवनवाहिनी आहेत. ग्रामीण भागात अजूनही वाहतूकीचे प्रभावी साधन म्हणून बसकडेच पाहिल्या जाते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या बसेस जुन्या आणि अपुऱ्या असल्याने संपूर्ण जिल्ह्यालाच नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली होती. त्यामागणीस प्रतिसाद म्हणून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यास 10 नवीन बसेस प्राप्त झाल्या. त्यातील पाच बसेस उमरखेड तर पाच बसेस यवतमाळ आगारास देण्यात आल्या आहे.

 

यवतमाळ आगारास प्राप्त बसेसचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते आज आगाराच्या परिसरात झाले. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, आगार प्रमुख छगन दिवसे, यंत्र अभियंता नरसिंग चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी दादाराव दराडे यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी फित कापून एसटी बसेसचे प्रवाशांच्या सेवेसाठी लोकार्पण केले.

एसटी महामंडळाची बस आज देखील ग्रामीण जीवनाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे या वाहतूक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी आपले प्राधान्य आहे. परिवहन मंत्र्यांकडे नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी मी सातत्याने केली होती. त्यामुळे आज नवीन 10 बसेस उपलब्ध झाल्या. जिल्ह्यातीस सर्व नऊ डेपोला प्रत्येकी 10 नवीन बसेस याप्रमाणे तब्बल एकूण 90 नवीन बसेस उपलब्ध होणार आहे. उर्वरीत बसेस लवकरच प्राप्त होणार असल्याचे यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्या – आदिवासी विकास मंत्री अशोक उईके

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : राळेगाव तालुक्यात रेतीअभावी घरकुल बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला आहे, केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी घरकुल योजनेद्वारे घरे मंजूर झाले मात्र रेती उपलब्ध होत नसल्याने बांधकामे थांबली आहेत. घरकुलांना गती देण्यासाठी रेती उपलब्ध करून द्या, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक उईके यांनी केल्या.

आदिवासी विकासमंत्री यांनी तहसील कार्यालय राळेगाव येथे विविध महत्वपूर्ण विषयांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला राळेगाव तहसिलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, उपअधीक्षक भूमी अभिलेख श्री.गवई, तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी, पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे, चित्तरंजन कोल्हे, डॉ. कुणाल भोयर, प्रशांत तायडे यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रेतीअभावी गोर-गरिबांच्या घरकुलांचे बांधकाम थांबता कामा नये. त्याकरीता आवश्यक प्रयत्न करा परंतू घरांची कामे नियमित सुरु राहिली पाहिजे. शासनाने स्वत:चे पक्के घर नसणाऱ्या लाभार्थ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता निधी उपलब्ध करून दिला. राहते घर पडले आणि नवीन घराच्या बांधकाम करीता रेती मिळत नाही. त्यामुळे काही लाभार्थी कुटुंबाचा राहण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. लाभार्थ्यांची ही अडचण आपण समजून घेतली पाहिजे. शासन प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे, प्रशासनाने त्या दिशेने काम केले पाहिजे, असे प्रा.उईके म्हणाले.

शेतकरी, कष्टकरी, महिला व सर्व समाज घटकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. प्रशासनाने देखील कार्यक्षम आणि संवेदनशीलपणे काम केले, असे ते म्हणाले. घरासाठी रेती उपलब्ध होत नसल्याने अनेक लाभार्थी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी करत होते. त्याअनुषंगाने रेतीचा विषय प्राधान्याने घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

घरकुलांसोबतच राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, राळेगाव नगरपरिषद क्षेत्रात घरकुलांसाठी अतिक्रमण नियमानुकूल करणे, पाणी टंचाई, विविध विकास कामे आदी विषयांवर देखील त्यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्याहस्ते तालुक्यातील 15 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांच्या मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून काही मदत देता येतील का? यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. बैठकीला संबंधित विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘डोंगरी महोत्सव’च्या भव्य आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री शंभूराज देसाई 

सातारा दि.15- डोंगरी  महोत्सव अंतर्गत कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन भव्य दिव्य होण्यासाठी विविध विभागांनी समन्वयातून काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
दौलतनगर येथील शासकीय विश्राम गृह डोंगरी महोत्सव तयारी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी शिशीकांत माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे  आदी उपस्थित होते.
या डोंगरी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग यामध्ये गजनी नृत्य, भजन कीर्तन, पारायण यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. कृषी प्रदर्शनाचे व पशुपक्षी प्रदर्शनाचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करावे. त्याचबरोबर परजिल्ह्यातील डोंगरी भागातील महिला बचत गटांना या डोंगरी महोत्सवामध्ये आमंत्रित करावे व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री तसेच खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात त्यांचे स्टॉल उभे करावेत.
शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे स्टॉलची उभारणी करण्यात यावी. या डोंगरी महोत्सवाला जास्तीत जास्त शेतकरी येतील यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

ताज्या बातम्या

१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघगर्जनेसह पाऊस

0
मुंबई, दि ९ : गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. त्यामुळे १४...

छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ९ - भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव...

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...