सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 196

पानिपत येथे ‘मराठा शौर्य स्मारक’ होणार – मंत्री जयकुमार रावल

मुंबई दि. १३: हरियाणातील पानिपत येथे मराठा युद्धवीरांचे शौर्य स्मारक राज्य शासनाच्या वतीने उभारले जाईल, अशी घोषणा मराठा शौर्य दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यानुसार शासन आदेश निर्गमित झाला आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून पानिपत येथील ‘काला अंब’ परिसरात लवकरच ‘मराठा शौर्य स्मारक’ उभारले जाईल, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

या यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री रावल म्हणाले की, हरियाणा राज्यातील ‘कालाअंब’ येथे लवकरच या स्मारकासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजा यांचा भव्य पुतळा उभा केला जाईल. तसेच मराठा शौर्याचे प्रतीक असणारे संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम व आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जातील. यासाठी हरियाणा राज्य शासनाशी समन्वय साधण्यासाठी मी स्वत: समन्वयक म्हणून काम करणार आहे. या प्रकल्पाला जमीन अधिग्रहित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास विभाग नोडल यंत्रणा म्हणून काम करणार आहे. मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक ते उपक्रम राबवण्यात येतील.

सतराव्या आणि अठराव्या शतकात मराठा साम्राज्याचा विस्तार अफगानिस्तानापर्यंत झाला होता. मराठा शौर्य वीरांच्या अतुलनीय पराक्रमामुळे अटक पासून ते कटक पर्यंत हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला गेला. १७६१ साली अहमदशाह अब्दाली विरुद्ध झालेल्या पानिपत रणसंग्रामामध्ये मराठा वीरांनी झुंज दिली. या लढाईत मराठा साम्राज्याची अपरिमित अशी हानी झाली, मात्र इतिहासामध्ये ही लढाई त्याग, बलिदान, राष्ट्रप्रेम, लढाऊ वृत्ती, राष्ट्राकरिता संपूर्ण समर्पण या करिता संस्मरणीय आहे. तसेच या युद्धातील मराठा वीरांच्या बलिदानाला नमन करण्याच्या उद्देशाने हे मराठा शौर्य स्मारक होत आहे, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपूजन

मुंबई, दि. १३: रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांकरीता अपुरी पडत असल्याने वृद्ध व्यक्ती, स्त्रीया व लहान मुले यांना अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

अशी असणार जेट्टीटर्मिनल इमारत

80 मीटर बाय 80 मीटर, 350 लोकांची क्षमता असलेले ॲम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी, अग्नीसुरक्षा प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, गार्डनिंग व सुशोभीकरण. या कामाच्या ठिकाणी भूगर्भ चाचणी करण्यात आली आहे.

00000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक डॉ. कैलास मोते यांची मुलाखत

मुंबई दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘फलोत्पादन विभागाच्या योजना व अंमलबजावणी’ या विषयावर फलोत्पादन विभागाचे संचालक, डॉ. कैलास मोते, यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात संचालक डॉ. मोते यांची मुलाखत मंगळवार दि.१८ मार्च २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून, महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरील पुढील लिंकवर देखील ही मुलाखत पाहता येणार आहे. ज्येष्ठ निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्यात कृषि क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे विविध फळपिके, भाजीपाला यांच्या उत्पादनात व उत्पादकतेत वाढ झाली आहे.  शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव तसेच ग्राहकांनाही वाजवी दरात शेतीमाल उपलब्ध करुन देण्यासाठी फलोत्पादन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्याला फलोत्पादन क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दीर्घकालीन उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना फलोत्पादन क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. मोते यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 

00000

होळी, धुलिवंदनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी होळी तसेच धुलिवंदनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

होलिकापूजन तसेच प्रेम, स्नेह व बंधुभावाचे प्रतिक असलेला रंगोत्सव सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरो व परस्परांमधील द्वेष भावना नष्ट करो, या शुभकामनेसह सर्वांना होळी व धूलिवंदनानिमित्त हार्दिक शुभेच्छा राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी दिल्या. तसेच होळी व रंगोत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुक राहण्याचे आवाहनही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशाद्वारे केले आहे.

00000

Governor Radhakrishnan greets people on Holi, Dhulivandan

 

Mumbai, March 13:The Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan has greeted the people on the occasion of Holi and Dhulivandan.  In his message, the Governor has said:”Heartiest greetings to all on the joyous occasion of Holikavandan, Dhulivandan and Rangotsav. May the festival of colours fill the life of all with love and affection and may it end hatred. While wishing the people a happy Holi, I appeal to all to remain conscious about protecting the environment.”

00000

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, दि.12 (जिमाका):- माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित ‘केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025’ च्या अंतिम सामन्याच्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आयोजक प्रताप पाटील, क्रिकेटचे विविध संघ, खेळाडू, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे की, या स्पर्धेला माझी दरवर्षी उपस्थिती असते. मात्र यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावण्याची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती. कारण अधिवेशन सुरू होते. आज इथे इतका मोठा कार्यक्रम होतो आहे. बक्षीस म्हणून 51 बाईक्स आहेत, 2 इलेक्ट्रिक कार आहेत. मला असे वाटते की, या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सोहळा हा कपिल पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतोय. संपूर्ण देशातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, कपिल पाटील यांचा स्वभाव आहे की, ते कुठलीही गोष्ट, लहान होऊ देत नाहीत. भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची, ही त्यांची खासियतच आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, कपिलजी सांगत होते की, माजी झालो तरी लोकं मोठ्या संख्येने आले. मात्र आपण कधीच माजी होत नाही. निवडणुका येत असतात, जात असतात. लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवे. लोकांच्या मनातून माजी झालो नाही म्हणजे सगळं मिळवले, असे समजायचे.

कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

0000000

महाराष्ट्र ही नवी स्टार्टअप राजधानी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य हे परकीय थेट गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनले आहे. केवळ नऊ महिन्यांत १ लाख ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. स्टार्टअप्सच्या संख्येत आणि गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र नवीन विक्रम प्रस्थापित करत असल्याने आता भारताची नवी स्टार्टअप राजधानी महाराष्ट्र असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

टीआयईकॉन मुंबई यांच्यावतीने आयोजित टीआयईकॉन् मुंबई २०२५: “धंदा फर्स्ट” या देशाच्या आघाडीच्या उद्योजकीय नेतृत्व शिखर संमेलन कार्यक्रमात पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “टीआयई मुंबई हॉल ऑफ फेम” पुरस्कार इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मंचावर टीआयई मुंबईचे संस्थापक अध्यक्ष हरीश मेहता,  हवस मीडिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय मोहन, टीआयई मुंबईचे अध्यक्ष रानू वोहरा, डॉ. अपूर्व रंजन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी हरीश मेहता यांच्या ‘अतुलनीय’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना पुरस्कार समर्पित करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा पुरस्कार २०१४ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू केलेल्या कामाची पोचपावती आहे. महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि ‘एमएमआर’ क्षेत्रात दिसणारे सर्व पायाभूत प्रकल्प, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, वाढवण प्रकल्प हे सुशासनाचे प्रतिक आहेत.

वाढवण बंदर जेएनपीटी बंदराच्या तुलनेत तीनपट मोठे असेल, जे भारतातील एक मोठे बंदर आहे. या बंदराचे काम सुरू करण्यात आले असून ते फक्त बंदर नसेल, तर त्याच्याबरोबरच एक विमानतळ देखील उभारले जाईल. त्याठिकाणी बुलेट ट्रेन स्टेशन असेल. वाढवण बंदराच्या परिसरात चौथी मुंबई साकारली जाईल.

जलसंधारण क्षेत्रात काम करताना सहा वेगवेगळ्या विभागांद्वारे १४ विविध जलसंधारण योजना राबवल्या जात होत्या. त्या एकत्र करून एकच योजना तयार केली आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून २५,००० गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठरवले. लोकसहभागाच्या जोरावर या अभियानातून २०१९ पर्यंत २०,००० गावांनी जलसंधारणाचे नियोजन केले, जलसाठ्याची निर्मिती केली आणि दुष्काळमुक्त झाली.  या योजनेमुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही भूजल पातळी वाढली असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आदर्श नेतृत्व

महाराष्ट्र राज्याच्या पायाभूत सुविधांचा विकास, गुंतवणूक वाढ आणि जलसंधारण क्षेत्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीस हे अनेक प्रकल्प, योजना राबवत आहेत. ज्यामध्ये रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि शहरी वाहतूक यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील दळणवळण आणि लोकांच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीसाठी सर्वोच्च ठिकाण म्हणून उदयास आले आहे. त्यांच्या धोरणांमुळे राज्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली असून अर्थव्यवस्थेचा विकास आणि रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळाली आहे. त्यांनी जलसंधारण आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापनात अग्रणी भूमिका बजावली आहे. “जलयुक्त शिवार अभियान” या सारख्या उपक्रमांमुळे दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यास मदत झाली आहे. या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे तसेच दीर्घकालीन जलसुरक्षेला चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून ‘टीआयई’ मुंबई हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अन्य पुरस्कार विजेते

पायोनियर युनिकॉर्न गुंतवणूकदार आणि नेक्सस व्हेंचर पार्टनर्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुवीर सुजान, स्टार्टअप इकोसिस्टम आणि भारतातील नवोपक्रमाचे अग्रदूत टी. व्ही. मोहनदास पै, भारतातील गुंतवणूक परिसंस्थेचा अग्रणी प्रविण गांधी, बिग बुल – पायोनियर स्टार्टअप गुंतवणूकदार आणि  केडिया सिक्युरिटीजचे संचालक डॉ. विजय केडिया, ग्राहक सेवेमध्ये परिवर्तन घडवणारा एआय स्टार्टअप – रेझो एआयचे  सह-संस्थापक आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष गुप्ता, भारताचे स्टार्टअप पॉवर कपल उद्योजक गणेश कृष्णन आणि मीना गणेश, ओवायओ चे संस्थापक आणि  मुख्य कार्यकारी अधिकरी रितेश अग्रवाल, मुंबईतील तंत्रज्ञान परिसंस्थेला चालना देणारे टेक उद्योजक संघटना मुंबई, रेनी कॉस्मेटिक्स चे  संस्थापक अशुतोष वलानी, झीप इलेक्ट्रिक चे सह-संस्थापक आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गुप्ता,  एसआयडीबीआय चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज मित्तल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

०००

मृद व जलसंधारण कामांच्या स्थळ पडताळणीसाठी ॲप व वेबपोर्टल – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १२ : राज्यात मृदसंधारण व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी (Ground Truthing) करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून या निर्णयानुसार, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), नागपूर आणि मृद व जलसंधारण विभाग यांच्या सहकार्याने मोबाईल अॅप व वेब पोर्टल विकसित करण्यात येणार असल्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापुर्वी  कृषी विभाग, जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, रोजगार हमी विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विविध योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणात मृदसंधारण व जलसंधारण कामे करण्यात आली. या कामांच्या डिजिटल नोंदणी आणि पडताळणी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य उद्दिष्टे:

  1. MRSAC,नागपूर यांच्याकडील नोंदींची पडताळणी – उपग्रह इमेजरीच्या आधारे मृदसंधारण व जलसंधारण संरचनांचे मॅपिंग करून त्या संरचनांची प्रत्यक्ष पाहणी करणे.
  2. नवीन संरचनांची नोंदणी–शिवार फेऱ्यांद्वारे अद्याप नोंद न झालेल्या व सध्या सुरू असलेल्या नवीन संरचनांची माहिती गोळा करणे.
  3. संरचनांचे व्यवस्थापन व सुधारणा–संरचना दुरुस्ती, नवीन संरचना बांधणी, नाला खोलीकरण, गाळ काढण्यासंबंधी माहिती मोबाईल अॅपद्वारे नोंदवणे.

तांत्रिक सुविधा

विशेष मोबाईल अॅप – केवळ नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध, जिल्हानिहाय, तालुकानिहाय व गावनिहाय डिजिटल माहिती.

Geofence तंत्रज्ञान – उपग्रह आधारित स्थळ नोंदणी व पडताळणीसाठी.

कार्यपद्धती

गाव पातळीवर शिवार फेरीद्वारे प्रत्यक्ष स्थळ पाहणी. स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने संरचनांची पडताळणी. मोबाईल अॅपद्वारे थेट डिजिटल नोंदणी करणे.

या निर्णयामुळे मृदसंधारण व जलसंधारण क्षेत्रातील पारदर्शकता वाढणार असून, भविष्यातील जलसंधारण धोरणांसाठी अचूक माहिती मिळणार आहे.

हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०३१२१५४३२३१६२६ असा आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

लोक सेवा हक्क अधिनियम अंतर्गत सर्व सेवा ऑनलाईन कराव्यात– मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

मुंबई उपनगर, दि. १२: महाराष्ट्र लोक सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसुचित केलेल्या शासकीय सेवांचा लाभ देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असून नागरिकांना सेवेचा लाभ घेण्यासाठी कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. सर्व सेवा दि. 1 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन उपलब्ध होतील याची सर्व विभाग/ कार्यालयानी कार्यवाही सुरु करावी. अशा सूचना राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

महाराष्ट्र लोक सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व विभागातील पदनिर्देशित अधिकारी, अपिलीय अधिकारी यांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक झाली. बैठकीस मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राज्य लोकसेवा आयोगाच्या सह सचिव वैशाली चव्हाण व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

वर्धा जिल्ह्यात घरपोच सेवा मिळण्यासाठी सेवादूत हा उपक्रम सुरू केला आहे. त्याच धर्तीवर मुंबई उपनगर जिल्ह्यातही या उपक्रमाची सुरूवात करावी. तसेच सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांच्या संकेतस्थळावर राज्य सेवा हक्क आयोग व सेवा हक्क कायद्याविषयी माहिती प्रदर्शित केल्यास सेवांचा लाभ सुलभपणे घेणे सोईचे ठरणार आहे. अर्जदाराला सुलभपणे सेवा उपलब्ध होईल यादृष्टीने सर्व विभागांनी व कार्यालयांनी त्यांच्या कार्यालयामध्ये फलक/ डिजिटल बोर्डवर आपल्या विभाग / कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती प्रदर्शित करावी. तसेच क्युआर कोडसह मार्गदर्शक फलक लावण्यात यावे, अशी सूचनाही मुख्य आयुक्त श्रीवास्तव यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना त्यांच्याकडून देण्यात येत असलेल्या सेवा विहित मुदतीत निकाली काढण्याबाबतचे निर्देश दिले. ज्या कार्यालयाकडे लोकसेवा हक्क कायद्याच्या प्रसिद्धीसाठी निधी उपलब्ध नसल्यास तसा प्रस्ताव सादर करावा. त्यानुसार जिल्हा नियोजन निधीमधून निधी उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. श्रीवास्तव यांनी दिलेल्या सुचनांनुसार कार्यवाही करण्यात येईल याबाबत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या वतीने ग्वाही देण्यात आली.

०००

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पर्यावरणस्नेही होळीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. १२ : होळी व धुलीवंदन सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावे असे आवाहन करत या उपक्रमाच्या अनुषंगाने पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पर्यावरणपूरक पाच रंगाचा समावेश असलेला संच भेट देऊन पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

होळी व धुलीवंदन तसेच रंगपंचमी हा सण राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रंग खेळताना ते पर्यावरणपूरक व नैसर्गिक असावेत, यासाठी जनजागृती आवश्यक आहे. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक होळी, धुलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनीही पर्यावरणपूरक होळी, रंगपंचमी व धुलिवंदन साजरी करण्याचे आवाहन केले आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री मुंडे यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना सागर निवासस्थानी जाऊन तर उपमुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांना विधानभवनात भेटून पर्यावरणपूरक रंगाचे संच देऊन शुभेच्छा दिल्या.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

‘पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानपरिषद इतर कामकाज

***

‘पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२: गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा सण असून, हा पारंपरिकपणे साजरा करण्यावर कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी प्रयत्नशील असून गणेश मूर्तिकार बेरोजगार होऊ नयेत आणि पारंपरिक मूर्ती निर्मितीवर परिणाम होऊ नये, यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. यासाठी डॉ.अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखालील एक तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे, जी वैज्ञानिक आणि तांत्रिक दृष्टिकोनातून पीओपी मूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देण्यासंदर्भातील अभ्यास करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) गणेश मूर्तींवर बंदी घातल्याने गणेश मूर्तिकारांवर बेरोजगारीचे संकट कोसळणार असल्याचा मुद्दा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.  त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Pollution Control Board) निर्देशांनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लागू करण्यात आला. मागील काही वर्षांपासून हा मुद्दा न्यायालयात होता आणि न्यायालयाने यापूर्वीही राज्य सरकारला वेळोवेळी मुदत दिली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय देऊन पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत काकोडकर समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत मुदत द्यावी.” अशी विनंती न्यायालयाकडे करणार आहोत. सरकार प्रदूषण टाळण्याच्या बाजूनेच आहे, पण मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांच्या अडचणीही समजून घेतल्या जात आहेत. गणेश भक्तीची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

उशिरा जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेची स्थगिती उठविण्याचा निर्णय  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १२ : महसूल व वन विभागाने राज्यातील जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्यावर लावलेली स्थगिती उठविण्यात आल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे जाहीर केले.

विलंबित नोंदणीबाबत सुधारणा आणि पारदर्शक प्रक्रिया

जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 आणि सुधारित अधिनियम, 2023 नुसार, जन्म-मृत्यूच्या विलंबित नोंदणी प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या होत्या. पूर्वी, जन्म किंवा मृत्यूची नोंद एक वर्षाच्या आत न झाल्यास प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा इलाखा शहर दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून नोंदणी केली जात असे. मात्र, 11 ऑगस्ट 2023 रोजी केंद्र सरकारने सुधारणा करत जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकृत केले.

बनावट प्रमाणपत्र वाटपावर कारवाईसाठी विशेष तपास समिती

महाराष्ट्र शासनाकडे परदेशी नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्रे वितरित केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, 8 जानेवारी 2025 रोजी गृह विभागाने विशेष तपास समिती (SIT) स्थापन केली. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या या समितीने अनेक तक्रारींची चौकशी केली. या पार्श्वभूमीवर, महसूल विभागाने 21 जानेवारी 2025 रोजी आदेश काढून विलंबित जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली होती.

नागरिकांना दिलासा  स्थगिती हटविण्याचा निर्णय

नागरिकांना शाळा प्रवेश, पासपोर्ट, सातबारा उतारा, शैक्षणिक आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. मात्र, विलंबित प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे, महसूल विभागाने 21 जानेवारी 2025 रोजी स्थगिती हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारित कार्यपद्धती आणि पारदर्शकता सुनिश्चित

सार्वजनिक आरोग्य विभागाने 12 मार्च 2025 रोजी नवीन कार्यपद्धती निश्चित करत, विलंबित नोंदणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आणण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्रे वाटप टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत हे निवेदन करताना नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार असून, विलंबित जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार असल्याचे सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा  राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

समृद्धी  शक्तिपीठ  मुंबई गोवा महामार्ग राज्यासाठी गोल्डन ट्रँगल 

मुंबई,  दि. १२: शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आणि शाश्वत शेतीसाठी शेतीला पाणी, वीज आणि दळवळणाची साधने मुबलक प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे असते. त्यासाठी शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सौर कृषीपंपांची उपलब्धता करून दिली जात असून या सौर कृषी पंपांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा होत आहे. समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग आणि गोवा मुंबई महामार्ग राज्याच्या विकासासाठी गोल्डन ट्रॅंगल ठरतील असे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषद नियम 260 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डीकर बोलत होत्या.

राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यात 2017 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली. अशा प्रकारची योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. येत्या काळात राज्यात सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेची क्षमता 16 हजार मेगावॅट करण्याचा उद्देश आहे. 2035 पर्यंत ही अपारंपरिक ऊर्जा निर्मिती 40 हजार मेगावॅट करण्यात येणार आहे.

सन 2024 – 25 मध्ये विक्रमी असे 2 लाख 73 हजार 266 कृषी पंप वाटप झालेले आहेत आणि एकूण 40 लाख कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवू शकत आहोत. मागेल त्याला सौर कृषी पंप व पी एम कुसुममधून दहा लाख कृषी ग्राहकांना सौर कृषी पंपाचं वाटप करण्यात येणार आहे. सौर कृषी पंपासाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना फक्त 10% रक्कम भरावी लागते आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5% रक्कम भरावी लागते. सौर ऊर्जेचा वार वाढल्यास येत्या काळात औद्योगिक वीजेचे दरही कमी होतील.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग आणि गोवा – मुंबई महामार्ग हा गोल्डन ट्रँगल ठरेल. रस्त्यांचा विकास झाल्यामुळे शेतीमालाची वाहतुक सुलभ होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. मराठावाडा वॉटर ग्रीड हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी प्रकल्प ही लवकरच साकारला जाईल, असेही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

राज्यातील  कोटीपेक्षा जास्त सातबारे ऑनलाईन उपलब्ध  महसूल राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई,  दि. १२: राज्यात सातबारा ऑनलाईन करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. जवळपास 9 कोटी 12 लाख सातबारा ऑनलाईन केले आहेत. ज्या गावांमध्ये सातबाराचे संगणकीकरण झाले आहे तिथे 100 टक्के ऑनलाईन फेरफार देण्यात येत असल्याची माहिती महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. म.वि.प.  नियम 260 नुसार मांडण्यात आलेल्या प्रस्तावास उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते.

राज्यात 42 लाख 34 हजार फेरफार ऑनलाईन पद्धतीने दिल्याचे सांगून राज्यमंत्री कदम म्हणाले, की,  यामुळे शेतकऱ्यांची होणारी अडचण सोडवली आहे. राज्यातील  सव्वाचार हजार गावांमधील कोणत्याही सातबाराची माहिती ऑनलाईन उपलब्ध होत आहे. ही एक अतिशय चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे

मुंबई शहरातील कोळीवाड्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून 41 कोळीवाड्यांपैकी 31 कोळीवाड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. कोळीवाड्यांची परिस्थिती, तेथील घरे याची माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार कोळीवाड्यांच्या विकासाची कार्यवाही करण्यात येईल.

महसूल विभाग सक्षमपणे काम करत असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 

ताज्या बातम्या

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...