सोमवार, जून 9, 2025
Home Blog Page 197

 ‘ॲग्रीस्टॅक योजना’ – शेतीतील डिजिटल क्रांती

शेतीच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना अधिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ (Agri Stack) योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डिजिटल डाटाबेस तयार करून, शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि पारदर्शक केल्या जातील. नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

 ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? 

‘ॲग्रीस्टॅक’ म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. यात प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक ओळख क्रमांक (Unique Farmer ID) दिला जातो. या क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे. तसेच, पीककर्ज, विमा, अनुदान, खत व बियाणे या सर्व बाबतीत ही योजना उपयुक्त ठरेल.

जिल्ह‌्यातील नोंदी

ॲग्रीस्टॅक’ म्हणजे शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली. आतापर्यत जिल्हयात २ लक्ष ४५ हजार २७६ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक नोंद झाली आहे तर कंधार तालुक्यात सर्वात कमी नोंद झाली आहे. ही आकडेवारी 12 तारखेपर्यंतची असून 12 व 13 तारखेला यामध्ये भर पडण्याची अपेक्षा आहे. याकडेवारी वाढावी यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक शेतकऱ्याची नोंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारींनी दिले आहे.

 योजनेचे स्वरूप आणि फायदे 

१) थेट लाभ हस्तांतरण (DBT)

पीएम किसान सन्मान निधी, पीक विमा, नैसर्गिक आपत्ती मदत इत्यादी अनुदाने थेट बँक खात्यात जमा होतील. यामुळे मध्यस्थांची गरज भासणार नाही, पारदर्शकता राहील.

२) पीककर्ज व विम्यासाठी सोपी प्रक्रिया

पीक विमा आणि कर्ज मिळवण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. हे एक ओळखपत्र परिपूर्ण ठरेल. ॲग्रीस्टॅकमधील नोंदीनुसार कर्ज मंजुरी जलद गतीने होईल.

३) शेतीसाठी अनुदान आणि इतर सुविधा

खत, बियाणे व औषधांसाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळेल.हवामान अंदाज, मृदा परीक्षण, सिंचन योजना यांची माहिती सहज उपलब्ध होईल.

४) नैसर्गिक आपत्ती व शेतीसाठी मदत

दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी किंवा अन्य आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदतीसाठी शेतकऱ्यांची माहिती आधीच उपलब्ध असेल, त्यामुळे मदतीचे वाटप जलदगतीने होईल.

 नोंदणी प्रक्रिया कशी करावी? 

नांदेड जिल्ह्यात दि. ८ मार्च २०२५ ते १३ मार्च २०२५ या कालावधीत विशेष ॲग्रीस्टॅक नोंदणी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिबिरांचे आयोजन केले गेले आहे. महसूल, कृषी व जिल्हा परिषद विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे ही नोंदणी केली जाईल.

शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रांसह आपल्या गावातील CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) येथे जाऊन नोंदणी करावी –

  •  आधार कार्ड
  •  आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक
  •  सातबारा उतारा (७/१२)

नोंदणी प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता नोंदणी करून घ्यावी.

 ई-केवायसीही आवश्यक! 

यासोबतच, रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. पात्र लाभार्थ्यांनी स्वतःच्या गावातील रास्तभाव दुकानात जाऊन ई-पॉश मशिनवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे. तसेच, राज्य सरकारच्या ‘मेरा ई-केवायसी’ मोबाईल अ‍ॅपद्वारे घरी बसूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते.

ई-केवायसी न केल्यास शासकीय अन्नधान्याचा लाभ बंद होईल, त्यामुळे लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.

 आयुष्यमान भारत कार्डसाठी संधी 

याच संधीचा फायदा घेत नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे. यासाठी आवश्यक कागदपत्रे –

  •  आधार कार्ड (झेरॉक्स)
  •  रेशन कार्ड (झेरॉक्स)
  •  मोबाईल क्रमांक

नांदेड जिल्ह्यात सध्या गावोगावी कॅम्प सुरू आहेत. नागरिकांनी तिथे उपस्थित राहून रेशन कार्ड ई-केवायसी, ॲग्रीस्टॅक व आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 शेतकऱ्यांसाठी महत्वाची बाब

नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ८ मार्च ते १३ मार्च २०२५ या कालावधीत आपल्या गावातील नोंदणी शिबिरात जाऊन ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी. ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही गैरसमजात न पडता, योग्य कागदपत्रांसह आपल्या गावातील CSC केंद्रात जाऊन नोंदणी करावी.

शासनाच्या या पुढाकारामुळे शेतीला नवा आधुनिक दृष्टिकोन मिळेल आणि शेतकऱ्यांना डिजिटल सेवांचा अधिक लाभ मिळेल. यासाठी आपल्या गावातील CSC सेंटर, महसूल विभाग, किंवा कृषी विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

 

प्रवीण टाके 

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

राजधानीत राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले.

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, सर्वश्री खासदार सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे,  शोभा बच्छाव, नरेश मस्के, बाळुमामा म्हात्रे, निलेश लंके, भाऊसाहेब वाकचौरे, श्यामकुमार बर्वे  यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यासह अतिरीक्त निवासी आयुक्त निवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सदनातील अतिथी मान्यवरांनी आणि महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही  पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कोपर्निकसमार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात यशवंतराव चव्हाण जयंती दिनी अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात प्रभारी उपसचांलक अमरज्योत कौर अरोरा यांनी यशवतंराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांच्यासह कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

 

आदिवासी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

वीर शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व आदिवासी मेळावा

नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे सादरीकरणउपस्थितांची दाद

चंद्रपूर, दि. 12 मार्च : आदिवासी विकास विभाग हा गरिबांचे कल्याण करणारा विभाग आहे. शेवटच्या व्यक्तीला विकासाचे केंद्रबिंदू म्हणून आपला विभाग कार्यरत आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात 40 टक्के निधी वाढवून मिळाला असून यावर्षी 21 हजार 495 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी योग्य बाबींवर खर्च केला जाईल. कोणतेही चुकीचे काम माझ्या हातून होणार नाही, असे आश्वस्त करत आदिवासी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहो, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

एकात्मिक आदिवासी विकास विभाग, चंद्रपूरच्या वतीने क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके जयंती उत्सव व आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सहआयुक्त विनोद पाटील, आदिवासी विकास विभाग नागपूरचे उपायुक्त दिगंबर चव्हाण, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, प्रवीण लाटकर (चिमूर), पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, गोंड राजे महाराज आत्राम, शशिकला उईके, विलास मसराम, सुदर्शन निमकर, कारागृह अधीक्षक श्री. कुंबरे आदी उपस्थित होते.

राज्यात पेसा अंतर्गत 13 जिल्हे व 59 तालुके आहेत. या सर्व ठिकाणी राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आपण प्रवास केला आहे, असे सांगून मंत्री डॉ. उईके म्हणाले,  आदिवासी समाजाच्या विकासासाठी विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगले नियोजन करण्यात येईल. आदिवासी आश्रम शाळांची अवस्था पाहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्यासाठी ‘संवाद चिमुकल्यांशी’ या उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी, अधिका-यांनी आश्रमशाळेत मुक्काम केला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून सर्व आश्रमशाळेत अद्ययावत वसतीगृह बांधण्यात येईल.

त्यामुळे आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पालकांनीसुद्धा आगामी सत्रात आपल्या पाल्यांना आश्रमशाळेत प्रवेश द्यावा. आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी 100 टक्के शिक्षकांची पदे भरण्यात येईल. तसेच समाजातील महापुरुष, क्रांतीकारक यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आदिवासी सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय बांधण्यात येईल.

आदिवासी समाजामध्ये परिवर्तन घडविण्याची ताकद

आदिवासी समाजासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी बाबुराव शेडमाके यांनी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर आहे. महापुरुषांनी केलेले काम, त्यांनी केलेली क्रांती सर्वसामान्य लोकांपर्यंत व आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. म्हणूनच शासन स्तरावर शहीद बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. या समाजाच्या प्रगतीसाठी आपण अहोरात्र काम करू. आदिवासी समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम शहीद बाबुराव शेडमाके यांनी केले. या संस्कृतीला तडा जाऊ देऊ नका. आपला समाज हा परिवर्तन घडू शकतो. संस्कृती टिकली तरच समाजसुद्धा टिकेल. अतिशय प्रामाणिक आणि नम्र असलेल्या या समाजाने एकसंघ राहणे गरजेचे आहे. परिवर्तन घडवण्याची ताकद या समाजामध्ये आहे, असेही आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले.

आदिवासींच्या जमीन पट्ट्यांचा विषय मार्गी लागावा : हंसराज अहीर

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले, शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जयंती उत्सवाचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे. हे स्थान देशभक्तीने प्रेरित असून येथील पिंपळाच्या झाडाखाली बाबुराव शेडमाके यांना फाशी दिली गेली. देशात अनेक आदिवासी क्रांतिकारी निर्माण झाले. आदिवासींनी ब्रिटिशांना त्यांची जागा दाखवली. शहीद शेडमाके यांच्या कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी. आदिवासींच्या पूर्वजांनी देशाची सेवा केली आहे, त्याचे स्मरण व्हावे. तसेच आदिवासींच्या जमिनीच्या पट्ट्यांचा विषय मार्गी लागवा, अशी मागणी त्यांनी केली.

ही भूमी सर्वांसाठी प्रेरणादायी : आमदार किशोर जोरगेवार

क्रांतीवीर शहीद बाबुराव शेडमाके यांचा जयंती उत्सव हा परिवर्तनाचा कार्यक्रम आहे. बाबुराव शेडमाके यांच्या जयंती सोबतच आदिवासी मेळावा या पुण्यभूमीवर होत आहे, हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आदिवासींची कर्मभूमी असलेली ही भूमी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या भूमीवर आदिवासींनी अनेक वर्ष राज्य केले. त्यामुळे आदिवासी संस्कृतीचे केंद्र या भूमीवर तयार व्हावे, राज्याच्या आदिवासी विकास विभागाने चंद्रपूरला भरभरून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.

आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली

आदिवासी आश्रम शाळा बोर्डाच्या वतीने उत्कृष्ट ढोल पथक तसेच जय सेवा गोंडी नृत्य मंडळ, लोहारा यांच्यातर्फे आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी इतरही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण केले व उपस्थितांची मने जिंकली.

तत्पुर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिकारी शहीद बाबुराव शेडमाके वीर स्मारकाला मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच दीप प्रज्वलन व बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदिवासी मेळावा निमित्त येथे आयोजित सिकलसेल व दंतचिकित्सा शिबिराचे उद्घाटन आणि पाहणी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते माहितीपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकात्मिक आदिवासी विकास विभाग चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी तर संचालन सपना पिंपळकर यांनी केले..

तारापोरवाला मत्स्यालयाला आधुनिक स्वरूप मिळणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १२ : तारापोरवाला सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देण्यात येत असून या उपक्रमाद्वारे मत्स्यालयाला आधुनिक स्वरूप देण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

विधानभवनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनवाढीबाबत उपाययोजनासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी. एन.पाटील, पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सूर्यवंशी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले की, तारापोरवाला मत्स्यालय मुंबईचे आकर्षण असल्यामुळे याला आधुनिक स्वरूप दिल्यास पर्यटन वाढीस मदत होणार आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाह्य यंत्रणेद्वारे सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन दृष्टीने प्रसिद्ध असलेले समुद्र किनाऱ्यावर लाईफ गार्डची तसेच परिसरात स्वच्छतागृहांची सुविधा देण्यात यावी, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री  नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या समुद्रकिनारी पायाभूत सुविधा निर्माण केल्यास पर्यटन वाढीला मदत होणार आहे, असे मत मंत्री राणे यांनी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गेस्ट हाऊस खासगी भागीदार (Public Private Partner) यांचा समावेश करून चालविण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्यात यावा. यासाठी एका गेस्ट हाऊसवर पायलट प्रोजेक्ट राबविण्यात यावा, अशी सूचना श्री. राणे यांनी केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनासाठी विशेष अनुदान देऊन विकास करण्यात यावा, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

आगामी फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वेंगुर्ला येथे करण्यासाठी पर्यटन विभागाने सहकार्य करावे, अशी सूचनाही मंत्री राणे यांनी केली असून पर्यटन मंत्री यांनी यासाठी अनुकूलता दर्शवली.

०००

मोहिनी राणे/ससं/

जल पर्यटन वाढीसाठी सुविधा उपलब्ध करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई दि. १२ : महाराष्ट्र सागरी मंडळांतर्गत सुरू असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत, मत्स्य व्यवसायासाठी  बंदरांचा विकास करणे तसेच जल पर्यटनाला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुविधा उपलब्ध कराव्या, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली.

मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, रेडिओ क्लब येथे प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारत व तत्सम सुविधा पुरविण्यात याव्यात. यासाठी आवश्यक जागा निश्चित करावी. तसेच, राष्ट्रीय जलमार्ग ५३ अंतर्गत डोंबिवली येथे जेट्टीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करावे. सागरी महामार्गालगत असलेल्या व्यवसायामार्फत मिळणारा महसूल पर्यटकांची सुरक्षा, जलपर्यटन, जेट्टी देखभाल दुरूस्तीसाठी प्राधान्याने खर्च करावा, जेट्टी संदर्भात धोरण आखण्यात यावे असे निर्देश श्री. राणे यांनी दिले.

रत्नागिरी येथील साखरीनाटे मत्स्यबंदराचा विकास करणे, रायगड येथील दिघी या जुन्या जेट्टीची लांबी व रूंदी वाढवून तेथे लिंकस्पॅन बसविणे, वेंगुर्ला येथे पर्यटनासाठी पाईल जेट्टीचे बांधकाम करणे व तत्सम सुविधा निर्माण करणे, काशिद येथे रो-रो सेवेकरिता तरंगती जेट्टी व तत्सम सुविधा निर्माण करणे, देवबाग येथील कर्ली नदीच्या तटाचे संरक्षण करणे संदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

बैठकीत अपर मुख्य सचिव संजय सेठी, सागरी महामंडळाचे मुख्य अभियंता पी प्रदीप, मुंबई बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे अध्यक्ष उमेश वाघ तसेच भारतीय नौसेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२: ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ साठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ अंतिम निर्णय हा सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ निवड समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य  विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक  बिभीषण चवरे, महाराष्ट्र  भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अनिल काकोडकर, दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य अॅड. उज्ज्वल निकम, वासुदेव कामत, गो. ब. देगूलकर, डॉ. शशिकला वंजारी यासह इतर अधिकारी उपस्थित  होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024’ पुरस्कारासाठी शासनाला प्राप्त शिफारस प्रस्तावापैकी एकाची निवड करणे अत्यंत कठीण काम आहे. पुरस्कार निवड समिती सदस्यांनी सुचविलेली नावे लक्षात घेवून असून लवकरच हे पुरस्कार सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून जाहीर करण्यात येतील.

सांस्कृतिक कार्य  विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबाबत सादरीकरण केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीचे अशासकीय सदस्य यांनी पुरस्कारासाठी निवड याबाबत मते मांडली.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानपरिषद इतर कामकाज :

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२: शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत १२ जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

शक्तीपीठ महामार्गाचे महत्त्व

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले की, जसे समृद्धी महामार्गामुळे १२ जिल्ह्यांचे जीवनमान बदलले, त्याचप्रमाणे शक्तीपीठ महामार्गामुळेही मोठे परिवर्तन घडेल. या महामार्गामुळे राज्यातील विविध भागांत सुलभ आणि वेगवान वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, ज्यामुळे व्यापार आणि उद्योगांना गती मिळेल.

शेतकऱ्यांचे समर्थन आणि चर्चा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून या महामार्गासाठी जागा देण्याची तयारी दाखवली आहे. कोल्हापूरच्या एअरपोर्टवर एक हजार शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले, ज्यात महामार्गाचे समर्थन करण्यात आले आहे.

“शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी  चर्चा करू, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पण हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो होणारच,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ग्रीनफिल्ड महामार्गाचा महत्त्वाचा निर्णय

ज्या भागांकडे आजवर दुर्लक्ष झाले, त्या भागांचा विकास करण्यासाठी दिल्ली-मुंबई ग्रीनफिल्ड महामार्ग हे योग्य माध्यम आहे.”अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे प्रसिद्ध उद्गार आहेत – अमेरिका श्रीमंत आहे कारण तेथे चांगले रस्ते आहेत. आपण महाराष्ट्राचाही हा विकास याच पद्धतीने साधणार आहोत,” असे त्यांनी नमूद केले.

शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचे भविष्यातील फायदे

या महामार्गामुळे शक्तीपीठ आणि औद्योगिक केंद्रे जोडली जातील. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील उद्योगांना चालना मिळेल. राज्यातील वाहतुकीचा वेग आणि सुविधा सुधारतील. पुरवठा साखळी मजबूत होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या रीतीने बाजारपेठेपर्यंत पोहोचता येईल. “हा केवळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार  जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. १२: सिंचन विभागामध्ये गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, तापी खोरे, विदर्भ सिंचन, कोकण खोरे विकास महामंडळाकरिता राज्य सरकार विशिष्ट कालबद्ध कार्यक्रम तयार करून आवश्यक त्यास निधी उपलब्ध करून देईल. त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीसुद्धा नदीजोड प्रकल्पाकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प अधिक गतीमान होतील आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल. असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सदाशिव खोत, राजेश राठोड, कृपाल तुमाने, सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ या सदस्यांनी विधानपरिषद नियम 260 अन्वये भूमिका मांडली. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषददेत राज्यातील पाणी व्यवस्थापन, सिंचन प्रकल्प आणि दुष्काळ निवारणासाठी शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांवर विस्तृत माहिती दिली.

पाणी वाटपाचे पुनर्निर्धारण

सन 2005 च्या समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यानुसार 2013 मध्ये मेंढीगिरी समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी 65% पाणी वाटपाचे धोरण ठरले होते. मात्र, नंतरच्या काळात मेंढीगिरी समितीने पावसप्रमाणे पाणी वापराचे पुनर्लोकन करण्याची शिफारस केली. त्यानुसार, 26 जुलै 2023 रोजी मांदाडे समितीची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या शिफारसीनुसार हे प्रमाण 58% करण्यात आले आहे.

न्यायालयीन निर्देश आणि हरकती

मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाला (MWRA) या निर्णयासंदर्भात जनतेच्या हरकती मागवण्याचे निर्देश दिले आहेत. 15 मार्चपर्यंत हरकती प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

जलसंपत्ती वाढवण्याचे प्रयत्न

राज्यातील जलसंधारण व सिंचन प्रकल्पांचा आढावा घेताना सरकारने गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 3,410 कोटी रुपये तर 2025-26 साठी 2,375 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तसेच, विदर्भातील वैनगंगा-नैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 18,575 कोटी रुपये तर कोकण-गोदावरी खोऱ्यासाठी 13,997 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट

शासनाने सिंचन प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. त्यात कोकण-तापी खोऱ्यात 34.80 TMC पाणी उपलब्ध करण्याचे सर्वेक्षण सुरू असून, या वर्षी 160 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच, दुष्काळग्रस्त भागातील सिंचन व्यवस्थापन सुधारण्यासाठी जुन्या कालव्यांची दुरुस्ती करण्यासाठीही शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

 

राज्यात काजू उत्पादन वाढ आणि प्रक्रियेसंदर्भात विविध योजना राबविणार  पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १२: राज्यात विशेषत: कोकणात काजू उत्पादन वाढ आणि प्रक्रियेसंदर्भात विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधान परिषदेत नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मंत्री रावल बोलत होते.

पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्रामध्ये नव्याने काजू बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. नुकतेच काजू बोर्डाचे कामकाज प्रत्यक्ष सुरू झाले असून बोर्डावर संचालक मंडळ, अधिकारी यांची नेमणूक झाली आहे. रत्नागिरीचे काही तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांसह त्यांचा अभ्यास दौरा झाला आहे. या दौऱ्यातून काजूचे उत्पादन वाढण्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला आहे.

पणन मंत्री रावल म्हणाले, भारतात सर्वात जास्त काजू विक्री होते. काजूवर प्रोसेसिंग करणे देखील गरजेचे असते. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या सहकार्यातून मॅग्नेटच्या माध्यमातून काजू प्रोसेसिंगला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जाणार आहे. गाव पातळीवर फार्मर प्रोड्यूसर संस्था असतात. त्यांचे राज्यव्यापी संघटन तयार करुन स्टेट लेव्हल असोसिएशन (एसएलए) निर्माण केल्यानंतर ते राज्य स्तरावर काम करतात. राज्यामध्ये जवळपास ४६ एसएलए आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एक समिती तयार करण्यात आली असून पात्र ठरणाऱ्या संस्थाच एसएलए होऊ शकतील, या समितीचा अहवाल आल्यानंतर यामध्ये सुसूत्रता येईल, असा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन खरेदी झाली आहे. अजूनही याबाबत केंद्राकडे आपण मुदतवाढ देण्यासाठी मागणी केली असल्याचेही मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सदाशिव खोत, राजेश राठोड, कृपाल तुमाने, सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ या सदस्यांनी विधानपरिषद नियम 260 अन्वये आपली भूमिका मांडली होती.

०००

ब्रिजकिशोर झंवर/विसंअ/

 

मागेल त्याला शेततळे या योजनेचे अनुदान वाढवण्यावर विचार  कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १२ : राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान ₹14,433 ते कमाल ₹75,000 पर्यंत अनुदान देण्यात येते. वन विभागाच्या योजनेत तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. या पार्श्वभूमीवर शेततळ्याचे अनुदान वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून तो अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेत नियम 260 च्या मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना सांगितले.

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सदाशिव खोत, राजेश राठोड, कृपाल तुमाने, सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ या सदस्यांनी विधानपरिषद नियम 260 अन्वये आपली भूमिका मांडली होती, त्यास मंत्री कोकाटे यांनी उत्तर दिले.

हमीभाव धोरण व खरेदी प्रक्रिया

राज्यात 18 पिकांसाठी हमीभाव लागू असून, केंद्र सरकारने ठरवलेल्या किमती राज्यात लागू होतात. सोयाबीन खरेदीसाठी 564 केंद्रांवर 11.21 लाख मेट्रिक टन खरेदी झाली असून, काही ठिकाणी अद्यापही खरेदी सुरू आहे.

पीक विमा योजनांमधील सुधारणा आणि कारवाई

राज्य शासनाने ₹1 पीक विमा योजना लागू केली असून, 2023 मध्ये 1.71 लाख आणि 2024 मध्ये 17 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. राज्य सरकारने विमा हप्त्यासाठी 2023 मध्ये ₹6,048 कोटी आणि 2024 मध्ये ₹5,841 कोटी भरले आहेत.

दरम्यान, पीक विमा योजनेंतर्गत काही ठिकाणी गैरव्यवहार आढळून आल्याने 2,55,468 अर्ज 2023 मध्ये आणि 4,30,443 अर्ज 2024 मध्ये रद्द करण्यात आले आहेत. तसेच, 130 सीएससी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असून, 24 सीएससी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आर्थिक मदत

राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू असून, याअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ₹6,000 थेट बँक खात्यात दिले जात आहेत. आतापर्यंत ₹8,961.31 कोटींची मदत 90.5 लाख शेतकरी कुटुंबांना वितरित करण्यात आली आहे.

सिंचन योजनेत प्राधान्यक्रम बदल

ठिबक सिंचन योजना अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य शासनाने लॉटरी पद्धती बंद करून प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य तत्त्व लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अल्पभूधारक, महिला आणि अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना अधिक संधी मिळेल.

स्मार्ट प्रकल्प आणि तंत्रशिक्षणासाठी निधी

कोकणातील शेतकऱ्यांसाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत 63 योजनांना प्राथमिक आणि 52 योजनांना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, जागतिक बँकेच्या साहाय्याने राबवल्या जाणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ₹2,100 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा विस्तार

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ₹16,000 कोटी मंजूर झाले असून, 7,201 गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

 

कल्याणकारी मंडळामार्फत जमा होणारा उपकर कामगारांच्या कल्याणासाठीच  कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, दि. १२ : केंद्र सरकारच्या अधिनियमाच्या अनुषंगाने 2007 मध्ये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाद्वारे जमा होणारा 1% उपकर हा कामगारांच्या कल्याणासाठी वापरण्यात येतो. फेब्रुवारी 2025 अखेर 55,94,354 कामगारांची नोंदणी झालेली असून त्यापैकी 32 लाख बांधकाम कामगार सक्रिय असल्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषद सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सदाशिव खोत, राजेश राठोड, कृपाल तुमाने, सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ या सदस्यांनी विधानपरिषद नियम 260 अन्वये आपली भूमिका मांडली होती, त्यास मंत्री ॲड.फुंडकर यांनी उत्तर दिले. कामगार विभागाच्या संदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यपद्धतीवर सविस्तर माहिती दिली. त्यांनी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची आणि त्यामध्ये होणाऱ्या सुधारणांवर माहिती दिली.

सभागृहात काही सदस्यांनी मंडळामध्ये झालेल्या खर्चाबाबत आणि गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर कामगार मंत्री फुंडकर यांनी महोदयांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात नोंदणी प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या, मात्र आता संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी सुधारणा करण्यात आल्या आहेत. तालुकावार लॉगिन आयडी प्रणाली, ऑनलाइन नोंदणी आणि बायोमेट्रिक व दस्तऐवज पडताळणी यांसारख्या उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याचे ही मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी सांगितले.

मंडळाद्वारे कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जात असून त्यामध्ये शिक्षण, विवाह, गरोदरपण, आरोग्य तपासणी आणि अपघात सहाय्यता यासारख्या योजनांचा समावेश आहे. विशेषतः “टेस्ट टू ट्रीटमेंट” या योजनेअंतर्गत ५० लाखांहून अधिक कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, गंभीर आजारांसाठी २ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

बांधकाम कामगारांच्या कौशल्यवृद्धीसाठी बार बेंडिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग यांसारख्या आठ ट्रेडमध्ये १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण कालावधीसाठी प्रत्येकी ₹४२०० वेतन नुकसान भरपाई आणि प्रशिक्षणासाठी ₹५८० खर्च शासन देत आहे. त्याचबरोबर कामगारांची नोंदणी अधिक सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. शासनाचे उद्दिष्ट अधिकाधिक कामगारांना योजनांचा लाभ मिळावा हे आहे. आणि कोणीही फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येत असल्याचेही मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

 

 

 

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

विधानसभा निवेदन/इतर कामकाज :

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपघातग्रस्त ऊसतोड कामगारांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक मदत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. १२: ऊसतोड आणि ऊस वाहतूक करताना कामगारांचा अपघात झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास कामगारांच्या कुटुंबास गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजनेमार्फत आर्थिक मदत देण्यात येते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातकुंड येथे झालेल्या या अपघातातील मृत व्यक्तींच्या वारसांना आणि जखमींना सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सातकुंड येथे किशोर ते कन्नड बायपास जवळ १० मार्च २०२५ रोजी ऊसाचा ट्रक उलटल्यामुळे अपघात झाला. या अपघातात सहा मजूरांचा मृत्यू झाला असून ११ मजूर जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी असलेल्या तीन मजुरांवर उपचार करून त्यांना घरी सोडले आहे. उर्वरीत आठ मजुरांवर एम. जी. एम. हॉस्पीटल, छत्रपती संभाजीनगर व स्वराज हॉस्पीटल, चाळीसगांव या ठिकाणी उपचार सुरु आहेत. मृत झालेले सर्व मजूर हे सातकुंड ता. कन्नड येथील रहिवाशी आहेत. ऊस तोडणी व वाहतुक करतांना होणाऱ्या वेगवेगळ्या अपघातात ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबांस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत मृत व्यक्तींच्या वारसांना पाच लक्ष, अपंगत्व आल्यास २.५० लक्ष व जखमींना उपचारासाठी ५० हजारापर्यंत वैद्यकीय खर्च देण्यात येतो, असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

 

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी मंत्री महोदय व दोन्ही सभागृहातील सदस्य तसेच विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (2) (कार्यभार) डॉ.विलास आठवले आणि विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

०००

अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रोत्साहन भत्ता– महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

विधानसभा प्रश्नोत्तरे 

***

अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रोत्साहन भत्तामहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १२:  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरूण देसाई यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी ३१.३३ कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना लाभ मिळेल असे मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणाली बंधनकारक –  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. १२: राज्यातील शासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक होण्यासाठी १ जानेवारी २०२५ पासून ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये देखील ही प्रणाली  लागू केली जाणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य मोहन मते, संतोष बांगर यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री गोरे म्हणाले, ई-ऑफिस प्रणालीची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी संगणक, इंटरनेट जोडणी, अखंडित वीजपुरवठा आणि संबंधित कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामस्तरापर्यंतही ही प्रणाली लवकरच कार्यान्वित केली जाईल. आत्तापर्यंत ई-ऑफिस प्रणालीद्वारे ३ लाख ५५ हजार पेक्षा अधिक फाईली तयार करण्यात आल्या आहेत. ग्रामविकास विभागांतर्गत ग्रामपंचायत आणि पंचायत समिती स्तरावरही लवकरच ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल, असे मंत्री गोरे यांनी विधानसभेत सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

भिवंडीतील माता आणि बाल रुग्णालयाच्या बांधकामास गती देणार सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १२: भिवंडी येथे माता आणि बाल रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून या इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देऊन या कामाला अधिक गती देण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भिवंडी येथे माता आणि बाल रुग्णालयाच्या नव्या विंगचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर पावसाळ्याच्या अडथळ्यांमुळे काम थांबले होते. या कामाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथक प्रत्यक्ष पाहणी करेल. पाहणीनंतर एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांना देण्यात येतील. प्राप्त अहवालानुसार या कामाला अधिक गती देऊन भिवंडी परिसरात अत्याधुनिक आणि सुसज्ज रुग्णालय उभारण्यास प्राधान्य दिले जाईल. जेणेकरून स्थानिक नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध होतील, असे मंत्री आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

जलसंधारण विभागाकडील बंधाऱ्यांचे डिजिटलायझेशन – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १२ : जलसंधारण विभागाकडील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे डिजिटलायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली.

परभणी जिल्ह्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या बाबतीत सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री राठोड यांनी सांगितले, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागामार्फत परभणी जिल्ह्यात 62 कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्यात आले. 45 बंधारे सुस्थितीत असून त्यांना गेट बसवण्यात आले आहेत त्याद्वारे अपेक्षित सिंचन होत आहे. 17 नादुरुस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच जलसंधारण विभागाकडील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याबद्दल तक्रारी प्राप्त होतील त्याची चौकशी केली जाईल, असेही मंत्री राठोड यांनी सांगितले.

जलसंधारण विभागामार्फत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना आणि जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेची चौकशीसाठी समिती – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १२:  रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडी मध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याच्या घटनेची चौकशी करण्यात येईल. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल असे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबतचा प्रश्न सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. यावेळी सदस्य प्रशांत ठाकूर, विश्वजित कदम, सरोज आहिरे यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, वडखळ ग्रामपंचायतीच्या सर्व अंगणवाड्यांमध्ये वाटप झालेल्या घरपोच आहाराची पुनर्वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुरवठाधारकाकडून खुलासा मागवण्यात आला होता, आणि त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, हा आहार पूर्णपणे स्वयंचलित मशीनद्वारे तयार होतो आणि उत्पादनानंतर अंगणवाडीत पोहोचण्यासाठी 15-20 दिवस लागतात. पाकीटात आढळलेले प्राणी सदृश अवशेष कोरड्या स्थितीत असणे अपेक्षित होते, मात्र ते ओल्या अवस्थेत असल्याने ते अलीकडेच मृत झाले असावेत. तसेच, पूर्णतः स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेमुळे अशा वस्तूंची उपस्थिती असणे शक्य नाही, असे पुरवठाधारकाने स्पष्ट केले आहे.

पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी हे नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

गेवराईतील ग्रामसडक योजनांच्या कामांची चौकशी करणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. १२ : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत सांगितले.

या रस्त्यांच्या गुणवत्तेसंदर्भात विधानसभा सदस्य विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री गोरे म्हणाले की, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे मुख्य अभियंता यांनी १३ जानेवारी २०२५ रोजीच्या पत्रानुसार राज्य गुणवत्ता समन्वय यांना रस्त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत २३ रस्त्यांची तपासणी पूर्ण झाली आहे.

उर्वरित ३४ कामांची तपासणी सुरू असून, लवकरच त्याबाबत अहवाल सादर केला जाईल. ग्रामसडक योजनेत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणे कंत्राटदारांना अनिवार्य आहे. मात्र, ५७ पैकी १५ रस्त्यांवर वृक्ष लागवड न केल्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर ₹१५.१९ लाख इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, असेही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सभागृहात  सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १२ : स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांवर कठोर  कारवाई करण्यासाठी  कायद्यात आवश्यक सुधारणा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

राज्यात अवैध गर्भपात रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सदस्य श्वेता महाले यांनी उपस्थ‍ित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य रोहित पवार व रणधीर सावरकर यांनी सहभाग घेतला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, राज्यात मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी, यासाठी शासनाने ठोस पावले उचलली आहेत.  स्त्रीभ्रूण हत्येसारख्या गुन्ह्यांवर पिसिपीएनडीटी कायद्याद्वारे कठोर कारवाई केली जात आहे. पोलिस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या  अध्यक्षतेखाली  समित्या स्थापन  करण्यात आल्या आहेत. या समित्या प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय असून स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी त्या कार्य करीत आहेत.

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बनावट (डिकॉय) प्रकरणा मधील महिलेला एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचेही सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले. अवैधरित्या होत असल्या स्त्रीभ्रूणहत्या याची माहिती देण्यासाठी 104 हा क्रमांक  कार्यरत असून तो अधिक सक्षम केला जाईल.

अवैद्यरित्या गर्भलिंग तपासणीसाठी

परराज्यातील टोळ्यांवर छापा मारणे, चौकशी करणे व त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी  आदेश देण्यात आले असून  जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारीस्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

ताज्या बातम्या

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
विदर्भ पाणी परिषदेत उपस्थिती नागपूर , दि. ८ -  नागपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करीत कोराडी येथील ऊर्जा प्रकल्पाला वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचा पुनर्वापर...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन कार्यक्रम स्थळाची पाहणी

0
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक 9 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा –  पालकमंत्री चंद्रशेखर...

0
नागपूर, दि. 8 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे’ला मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा

0
मुंबई दि. 8: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि समृद्ध वारशाचा अनुभव देणारी “छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे”ला उद्या, मुख्यमंत्री देवेंद्र...

‘जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात कराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ८ :  जॉन डिअर इंडियातील पुण्यातील प्रकल्पाने  ‘मेक इन महाराष्ट्र’ला महत्त्व दिले असून त्यांनी कृषी क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी उन्नत तंत्रज्ञानावर...