रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 199

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमकांचे पुनर्वसन लवकरच पूर्ण होणार – वनमंत्री गणेश नाईक

विधानपरिषद लक्षवेधी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमकांचे पुनर्वसन लवकरच पूर्ण होणार– वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. ११ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २५ हजारपेक्षा जास्त अतिक्रमकांचे  लवकरच संपूर्ण पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली.

सदस्य राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना वन मंत्री नाईक बोलत होते.

राष्ट्रीय उद्यान होण्यापूर्वी या ठिकाणी असलेल्या आदिवासी पाड्यांचा हा मूळ प्रश्न असल्याचे सांगून वन मंत्री नाईक म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील ११ हजार ३५९ पैकी फक्त २९९ सदनिकांचे वाटप शिल्लक आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील पुनर्वसनासाठी म्हाडाच्या माध्यमातून सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी म्हाडाच्या  मुंबईतील व ठाणे जिल्ह्यातील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या जागा ताब्यात आल्यानंतर सदनिका बांधकामाचे काम सुरू होईल.

वन मंत्री नाईक म्हणाले की, ज्या पात्र लाभार्थींनी ७ हजार रुपये भरलेले आहेत त्यांना सदनिका देण्याची शासनाची भूमिका आहे. तसेच या पुनर्वसन प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास या विषयी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरे कॉलनी येथील १२० एकर जागेवर आदिवासी  समाजातील लोकांना प्राधान्याने घरे देण्यात येतील. तर उर्वरित लोकांना उपलब्धते प्रमाणे सदनिकांचे वाटप केले जाईल.

००००

हेमंत चव्हाण/विसंअ

 

अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधात शासनाची भूमिका – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. ११ : राज्यातील शेतकरी आणि रहिवाशांच्या हितासाठी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात राज्य शासनाची भूमिका असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अरुण लाड यांनी कर्नाटक  सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री विखे – पाटील म्हणाले, राज्य शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी कोणतीही संमती दिलेली नाही. केंद्र शासन कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य शासनाचे मत घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही. राज्य शासनाने यापूर्वी देखील वेळोवेळी अलमट्टी धरणाच्या उंची वाढीस विरोध केलेला आहे.

पावसाळ्यामध्ये अलमट्टी धरणातील पाण्याच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण वेळ अधिकारी नेमण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण– मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव- पाटील

मुंबई, दि. ११ : गोसीखुर्द प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव -पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य डॉ परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील बोलत होते.

एखाद्या प्रकल्पग्रस्तांला एकदाच प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ देता येतो असे सांगून श्री पाटील म्हणाले की, त्याअनुषंगाने गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांना जागांच्या बदल्यात रोख निधी आणि नोकरीच्या बदल्यातही रोख रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे. सदस्यांनी मांडलेल्या सूचनांच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा शासन सहानभूतीपूर्वक विचार करेल असे मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

सातारा जिल्ह्यातील तासगाव येथील साकवाचे काम योग्य पद्धतीने

– सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. ११ : सातारा जिल्ह्यातील तासगाव येथे बांधण्यात आलेल्या साकवाचे काम योग्य पद्धतीने व गावकऱ्यांच्या संमतीनेच झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. भोसले बोलत होते.

तासगाव येथे बांधण्यात आलेल्या साकवाचे काम पूर्ण झाल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले म्हणाले की, हा साकव वाहतुकीसाठी खुला झाला आहे. या साकवासाठीची जागा निश्चित कराताना संबंधित गावचे संरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, समाजकल्याण अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन स्थान निश्चित केले होते. या निश्चित केलेल्या ठिकाणीच पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच याआधीही हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात उपस्थित झाला होता, त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांनी दुसऱ्या एका साकवाच्या कामाची ग्वाही दिली होती आणि तोही आता पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सी लेव्हल (स्तरीय तपासणी) चाचणीद्वारे हे स्पष्ट झाले आहे की, या प्रकरणात बांधकाम विभागाची कोणतीही चूक नाही. मात्र, सदस्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करून हा विषय ग्रामविकास विभाग आणि समाजकल्याण विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवला जाईल अशी माहितीही श्री. भोसले यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्यासाठी शासनाची सर्वतोपरी मदत

-नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. ११ : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकासासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल आणि हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य उमा खापरे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

अक्कलकोट तीर्थक्षेत्रासाठी 368 कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता दिली असल्याचे सांगून राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, या आराखड्यात वाहनतळ, तलाव सुशोभीकरण, भक्तनिवास, शौचालये, पोलीस नियंत्रण कक्ष आणि अन्य मूलभूत सुविधांचा समावेश आहे. येथील नऊ प्रमुख रस्त्यांच्या विकासावर भर देण्यात आला असून, त्यापैकी चार रस्त्यांचे काम सुरू आहे, तर उर्वरित पाच रस्ते भू-संपादनाच्या टप्प्यात आहेत. या विकास आराखड्यातील आरक्षित जागेचे भूसंपादन देवस्थानाने करायचे होते. मात्र, 10 वर्षापासून त्यांनी भूसंपादन केले नसल्याने नगरपरिषदेने भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहितीही राज्यमंत्री मिसाळ यांनी दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

सहायक प्राध्यापकांच्या ४४३५ पदांची भरती लवकरच

– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ११ : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला. त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती देण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

उच्च शिक्षण क्षेत्रातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी राज्यपालांनी यावर स्थगिती देऊन बदल सुचवले होते. आता राज्यपालांनी ही स्थगिती उठविल्यामुळे छाननी करून पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या सुधारित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करताना वर्कलोडमध्ये बदल होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अकृषि विद्यापीठे, शासनमान्य अभिमत विद्यापीठांसाठी मंजूर असलेल्या शिक्षक व समकक्ष पदे अशा एकूण पदांपैकी ८० टक्के इतक्या मर्यादेत ६५९ पदे जाहिरात देऊन भरली जाणार असल्याचे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले. प्राचार्य पदभरतीसाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्याचा सामान्य प्रशासन  विभागाकडील अधिकार आता पूर्वीप्रमाणेच सहसंचालकांना परत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधान परिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीत सदस्य सत्यजित तांबे, विक्रम काळे,  अभिजीत वंजारी या सदस्यांनी सहभाग घेतला.

0000

संजय ओरके/विसंअ/

 

सांगली मध्यवर्ती बँकेत झालेल्या अनियमिततेसंदर्भात चौकशीला अधिवेशनानंतर गती

– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई, दि. ११ :- सांगली जिल्हा  मध्यवर्ती बँकेतील अनियमिततेसंदर्भात आरोप प्रकरणी विभागीय सहनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने सखोल चौकशी करून १६ जून २०२३ रोजी अहवाल सादर केला. या अहवालानुसार बँकेने ‘नाबार्ड’च्या मार्गदर्शक सूचना, सहकार कायदा व बॅंकेचे पोटनियम याचे उल्लंघन करून असुरक्षित कर्जवाटप केल्याचे  निदर्शनास आले. बँकेवरील आरोपांसंदर्भात १५ कर्मचाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच, संचालक मंडळाने शासनाकडे दाखल केलेल्या अपिलास अनुसुरून कलम ८८ अंतर्गत चौकशीला गती देण्यात येणार असून अधिवेशनानंतर ‘जैसे थे’ परिस्थितीबाबत सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.

विधान परिषद सदस्य सर्वश्री सदाशिव खोत, शशिकांत शिंदे, हेमंत पाटील यांनी  सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजात झालेल्या अनियमततेबाबत लक्षवेधी सूचना मांडली.

यासंदर्भात सहकार मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, चौकशी आदेशानुसार कलम ८३ मध्ये एकूण ६ मुद्द्यांवर आक्षेप होते, त्यापैकी ४ मुद्दे कलम ८८ च्या चौकशी आदेशात समाविष्ट करण्यात आले. उर्वरित तीन मुद्द्यांमध्ये विश्वकर्मा प्लाऊड अँड ग्लास सेंटर विटा (₹69.22 लाख), फर्निचर नूतनीकरणावर झालेला अतिरिक्त खर्च (₹14.57 लाख), आणि तांत्रिक पदे भरताना सेवकांच्या वेतनवाढीचा अनियमित खर्च (₹35.88 लाख) यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, चौकशी समितीने 32 मुद्द्यांपैकी 29 मुद्द्यांची तपासणी केली आहे. आवश्यक असल्यास एकूण मुद्द्यांसंदर्भात चौकशी आदेश देण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

नवीन कायद्यांनुसार, संचालक मंडळावरही जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. जर बँकेत अनियमितता गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले, तर संचालक मंडळावर फौजदारी कारवाई केली जाणार असून त्यांच्या मालमत्तेच्या जप्तीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ/

 

नाशिक महानगरपालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कामाची चौकशी

– उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. ११ :- नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या  प्रशासन अधिकारी यांच्या कामकाजाविरूद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती येत्या १५ दिवसांच्या कालावधीत चौकशी अहवाल देणार आहे. तोपर्यंत या प्रशासन अधिकाऱ्याची बदली करण्यात येईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधान परिषद सदस्य सर्वश्री किशोर दराडे, अभिजित वंजारी, विक्रम काळे यांनी नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

उद्योग मंत्री श्री.सामंत म्हणाले की, नाशिक व इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या प्राप्त प्रस्तावानुसार 48 शिक्षकांना एकतर्फीने सामावून घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडील 6 शिक्षकांना समायोजनाने सामावून घेण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

 

क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. ११ – क्रीमिलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली असून ही मर्यादा १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

सदस्य राजेश राठोड यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना सर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री सावे बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार क्रीमिलेअरची अट घालण्यात आली असल्याचे सांगून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री सावे म्हणाले की, व्हीजेएनटी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. व्याज परतावा रक्कम १० लाख रुपयांवरून १५ लाख करण्यात आली आहे. गट कर्जाची मर्यादा ५० लाख रुपये करण्यात आली आहे. तांडावस्ती सुधार योजनेत ५६८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. पोहरादेवी देवस्थानच्या विकासासाठी ३२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र आणि जातीचे दाखले लवकर देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येतील. पदोन्नतीमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद आहे. याबाबत राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयात ठामपणे भूमिका मांडण्यात येत असल्याची माहिती श्री सावे यांनी दिली.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

हॉकर्स पॉलिसी अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सुरू– राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबईदि. ११ :  हॉकर्स पॉलिसी प्रभावीपणे लागू करण्याची प्रक्रिया सुरू असून नियोजन करताना पथ विक्रेत्यांना त्रास होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा येणार नाहीयाची खबरदारी घेतली जाणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, १५६ नगरपालिकांचे अधिसूचनेसाठी प्रस्ताव प्राप्त झाले असूनत्यातील तीन प्रस्ताव पुढे पाठवण्यात आले आहेत.

विधानपरिषद सदस्य सर्वश्री सत्यजीत तांबेभाई जगताप यांनी राज्यातील सर्व लहान व मोठ्या शहरातील फेरीवाल्यासंदर्भातील प्रश्न मांडला होतात्यावर राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी उत्तर दिले.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि २०१७ च्या शासन निर्णयानुसार धोरण अंमलबजावणीसाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रक्रियेनुसार ४०८ नगरपालिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यानुसार ४ लाख ३५ हजार ५८६ पथविक्रेते आहे. मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये सन २०१४ मध्ये फेरिवाल्याच्या सर्वेक्षणादरम्यान  १ लाख २८ हजार ४४३ अर्ज वितरित होऊन त्यापैकी ९९ हजार ४३५ अर्ज मुंबई महापालिकेस सादर झालेले आहेत. त्यापैकी २२ हजार ५५ अर्जदार व १० हजार ३६० परवानाधारक असे एकूण ३२ हजार ४१५ मतदार म्हणून पात्र आहेत. तथापिसर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे मतमोतणी व निकाल करता आले नाही. त्यामुळे नगर पथविक्रेता समिती व परिमंडळीय नगर पथविक्रेता समित्या गठीत झाल्या नाहीत. यासंदर्भात न्यायालयाकडून अंतिम निर्णय झाल्यास पथविक्रेते आणि दुकानदार यांच्यात समन्वय साधला जाईलअशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

000

सिंहगड सिटी स्कूल, शाळेसंदर्भतील कार्यवाही शिक्षण उपसंचालक स्तरावर

– नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. ११ : पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील सिंहगड सिटी स्कूल, शाळेने बेकायदेशीर स्थलांतर, बांधकाम केल्याप्रकरणी शाळेच्या मान्यतेसंदर्भात पुढील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य योगेश टिळेकर यांनी सिंहगड सिटी स्कूल शाळेसंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

नगरविकास राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, सीबीएसई बोर्डाच्या या शाळेत २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळेच्या मान्यते संदर्भात योग्य ती कार्यवाही शिक्षण उपसंचालक स्तरावर करण्यात येत आहे. महानगरपालिकेने सुद्धा नोटीस दिलेली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी  शाळेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

म्हाडाच्या संक्रमण शिबिरांची थकित भाडेवसुली आणि घुसखोरी रोखण्यासाठी निश्चित धोरण आणणार

– गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

मुंबई, दि. ११ : झोपडपट्टी पुनर्विकासावेळी तेथील रहिवाशांना संक्रमण शिबिरांमध्ये हलवण्यात येते. या संक्रमण शिबिरांचे भाडेसाठी विकासकांनी थकवलेले आहे. हे थकलेले भाडे वसुल करणे त्याचबरोबर संक्रमण शिबिरात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी शासन निश्चित धोरण तयार करणार असल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानपरिषदेमध्ये दिली.

सदस्य ॲड निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री भोयर बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य सचिन अहिर, शशिकांत शिंदे, सुनिल शिंदे, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

थकबाकी वसुलीसाठी कडक पावले उचलणार असल्याचे सांगून राज्यमंत्री भोयर म्हणाले की २०१६ ते २०२५ या कालावधीत २७४ कोटी रुपये भाडे वसुल करण्यात आले आहे अजूनही १७२ कोटी रुपये थकबाकी असून त्यावर १२० कोटी रुपयांचा विलंब आकार आहे. भाडे थकवलेल्या काही विकासकांना “स्टॉप वर्क” नोटिसा दिल्या आहेत. तसेच, ठाणे, मुंबई, पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत थकबाकीदार विकासकांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

खनिकर्म, मंत्री शंभूराज देसाई यांनी संक्रमण शिबिरातील समस्या सोडवण्यासाठी आणि झोपडपट्टी पुनर्विकासात घुसखोरी रोखणे याविषयी धोरण ठरवण्यासाठी अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलिसांकडे थकबाकीदारांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, काही जणांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. तसेच, भाडे वसुलीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येणार आहे आणि प्रत्येक १५ दिवसांनी अहवाल सादर करावा लागेल. थकबाकीदार विकासकांची यादी जाहीर केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 

गुंतवणुकदारांना सेवा-सुविधा पुरविण्यास तत्पर – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगर, दि. १० (जिमाका): शासनाच्या गुंतवणूक धोरणास गुंतवणुकदारांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. राज्यात गुंतवणुकीत सध्या छत्रपती संभाजीनगर विभाग अग्रेसर आहे. गुंतवणुकदारांना विविध सेवा- सुविधांची आवश्यकता असते, त्या देण्यासाठी प्रशासन तत्पर असेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे केले.

छत्रपती संभाजीनगर विभागीय गुंतवणूक परिषद हॉटेल रामा येथे पार पडली. उद्योग विभागाचे सहसंचालक बी. टी. यशवंते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, मैत्री चे नोडल अधिकारी तथा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बी. एम. औटी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, मसीआ चे अध्यक्ष चेतन राऊत आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त गावडे म्हणाले की, या परिषदेत राज्यातील आणि विभागातील गुंतवणुकदार सहभागी झाले आहेत. गुंतवणुकीत वाढ होत आहे, हे एक चांगले लक्षण आहे. आपल्या विभागात वाहन उद्योगात गुंतवणूक वाढत आहे. बीड, धाराशिव या भागात पवन ऊर्जा, सौर ऊर्जा क्षेत्रात वाढ होत आहे. सर्व गुंतवणुकदारांना शासनाचे विविध विभाग सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. त्यासाठी प्रशासन क्षमता बांधणी करत आहेत. सर्व उद्योजकांचे स्वागत करतांना उद्योग उभारणी सुकर करण्यासाठी प्रशासन बांधील आहे. याशिवाय गुंतवणुकदार वाढल्यामुळे औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अर्धनागरी भागात निर्माण होणारे रस्ते, पाणी, घन कचरा व्यवस्थापन असे नागरी प्रश्न सोडविण्यासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरून त्या त्या भागात रहिवासास असणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना चांगल्या नागरी सुविधा मिळाव्या. आपल्या सर्व प्रश्न, समस्यांवर चर्चा, समन्वयातून मार्ग काढु असेही गावडे यांनी सांगितले.

 

बी.टी. यशवंते यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, आतापर्यंत २१८ गुंतवणुकदारांनी ६०३८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील गुंतवणुकीचा समावेश केल्यास ६०६८ कोटी रुपये गुंतवणूक आहे.

बी. एम. औटी यांनी सांगितले की, मैत्री २ या पोर्टलद्वारे गुंतवणुकदारांना ११९ प्रकारच्या सेवा ऑनलाईन आणि ‘एक खिडकी’ द्वारे देण्यात येत आहेत. त्यामुळे विविध परवानग्या मिळवणे अगदी सुकर झाले आहे. त्याचाही गुंतवणुकदारांनी लाभ घ्यावा. याप्रसंगी सामंजस्य करार केलेल्या उद्योजकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

०००

 

अमरावतीत विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद

अमरावती, दि. ११ (जिमाका): उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र मंच उपलब्ध करून देण्यासाठी विभागस्तरीय गुंतवणूक शिखर परिषद हॉटेल ग्रँड महफिल येथे आज पार पडली.

विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र सिंह कुशवाह, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, विभागीय कार्यालयाचे उद्योग सहसंचालक निलेश निकम यावेळी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सिंघल तसेच जिल्हाधिकारी कटियार यांच्या हस्ते यावेळी उद्योजकांसमवेत 32 सामंजस्य करार करण्यात आले. गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत नवउद्योजकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

आपल्या जिल्ह्याची बलस्थाने ओळखून गुंतवणुकीच्या नवनवीन संधी शोधा. उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी अमरावती जिल्ह्याचे वातावरण, येथील भौगोलिक परिस्थिती, दळणवळणाची साधने पूरक आहेत. या बाबींचा लाभ घ्या.अन्य क्षमता असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत माहिती घ्या व उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्या. उद्योजकांना जेथे निकड आहे, तेथे प्रशासन मदतीसाठी तत्पर असल्याचे सिंघल म्हणाल्या.

अमरावती जिल्हा हा ‘ट्रेडिंग हब’ म्हणून उदयास यावा यासाठी प्रशासन विविध उपक्रम राबवित आहेत. येथील टेक्सटाइल पार्क ही जिल्ह्याची ओळख आहे. सर्व गुंतवणूकदारांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. जिल्ह्यांना विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्यांच्या व राज्याच्या विकासाला चालना देण्याचा परिषदेचा उद्देश आहे. नवोद्योजकांनी याचे महत्त्व जाणून गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कटियार यांनी केले.

जिल्ह्यातील ७४२ ज्येष्ठ नागरिक आज अयोध्येला रवाना होणार

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत निवड

यवतमाळ, दि.११ (जिमाका) : राज्यातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य व राज्याबाहेर तीर्थ दर्शन करता यावे यासाठी शासनाने तीर्थ दर्शन योजना सुरु केली. योजनेतून ५८ सहाय्यकांसह ७४२ जेष्ठ नागरिक उद्या अयोध्या दर्शनासाठी रवाना होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने योजनेतून पहिली फेरी रवाना होत असून सहभागी सर्व जेष्ठांना त्यांनी दर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पालकमंत्री राठोड यांनी या योजनेच्या जिल्ह्यात उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी दोनदा आढावा घेतला होता. जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांची नोंदणी करुन तीर्थ दर्शनाचा लाभ देण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्याप्रमाणे नियोजन करुन यापूर्वीच अयोध्या दर्शनासाठी जेष्ठ नागरिक जाणार होते. परंतु, आचारसंहितेमुळे बदल होऊन आता हे दर्शन दि.१२ ते १६ मार्च या चार दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

अयोध्या दर्शनासाठी जाणाऱ्यांमध्ये यवतमाळ व कळंब तालुक्यातील प्रत्येकी १०८ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. नेर तालुक्यातील ५८, दारव्हा ९, बाभूळगाव ४१, दिग्रस ८६, पुसद ४०, उमरखेड ९३, महागाव ५७, आर्णी २५, घाटंजी ११३, राळेगाव ५१, पांढरकवडा १५, वणी २ याप्रमाणे तालुकानिहाय ७४२ जेष्ठ नागरिकांचा यात समावेश आहे. तर ५८ सहाय्यक सोबत जाणार आहे. हे सहायक जेष्ठ नागरिकांना त्यांच्या आवश्यक्तेप्रमाणे मदत करतील.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत अयोध्या जाणाऱ्या जेष्ठांचे पूर्णपणे विनामूल्य दर्शन होणार आहे. यासाठी प्रती लाभार्थी ३० हजार इतका खर्च शासन करणार आहे. त्यात प्रवास, निवास व भोजनाचा देखील समावेश आहे. शासन नियुक्त संस्थेद्वारे लाभार्थ्यांना ही यात्रा घडविण्यात येणार आहे. अयोध्येसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी दि.१२ मार्च रोजी सकाळी ९ वाजता धामनगाव रेल्वे येथे स्टेशनवर स्वखर्चाने उपस्थित रहावयाचे आहे.

जास्तीत जास्त जेष्ठांना दर्शन घडविणार : संजय राठोड

तीर्थ स्थळांना भेटी देण्याची इच्छा असतांना देखील ती पूर्ण होत नाही. ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांची दर्शनाची मनोकामना पुर्ण करण्यासाठीच तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली. या योजनेतून जिल्ह्यातील ७४२ नागरिकांची पहिली टिम अयोध्या जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून दर्शन घडविण्याचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे पालकमंत्री राठोड यांनी सांगितले.

०००

 

प्रशासनाच्या सूचना पाळा… उष्माघातापासून आपला बचाव करा..!

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून दि. १३ मार्च २०२५ पर्यंत ठाणे जिल्ह्यात काही भागात उष्णतेची लाट येण्याबाबत हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मार्च ते मे 2025 या कालावधीत ठाणे जिल्ह्यात संभाव्य उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यानुषंगाने उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आल्या आहेत. या लेखाच्या माध्यमातून, नागरिकांनी उष्माघाताच्या स्थितीत काय करावे व काय करू नये याबाबत जाणून घेवू या…

उष्णतेची लाट: काय करावे व काय करू नये

उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण निर्माण होऊन मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेदरम्यान परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्मघातामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील उपाय करू शकता.

  1. उष्णतेच्या लाटेची माहिती देण्याकरिता रेडिओ, टि.व्ही., सोशल मिडीया व स्थानिक वृत्तपत्रे प्रसारमाध्यमांचा वापर करावा.
  2. जिल्हा नियंत्रण कक्ष/ महानगरपालिका नियंत्रण कक्ष/ विभागीय स्तरावरील नियंत्रण कक्ष व स्थानिक संस्था आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रित कार्य करावे.
  3. सर्व संबंधित विभाग, स्थानिक पुढारी व सामाजिक संस्था यांनी या कार्यात सामील व्हावे.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करावे

  • तहान लागलेली नसली तरीही अधिकाधिक पाणी प्यावे.
  • हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
  • बाहेर जातांना गॉगल्स, छत्रो/टोपी, बुट व घपलाचा वापर करावा.
  • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
  • उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा.
  • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • गुरांना छावणीत ठेवावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
  • घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
  • पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
  • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
  • सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करावे.
  • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा.
  • बाहेर कामकाज करीत असताना अधून मधून विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
  • गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी.
  • रस्ताच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
  • जागोजागी पाणपोईची सुविधा करावी.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय करू नये

  • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.
  • दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे.
  • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वरील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांनी केले आहे.

०००

  • मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

 

शासनाच्या सर्व विभागांची माहिती ‘सीएम डॅश बोर्ड’वर लवकरच उपलब्ध- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. ११ : शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला ‘सीएम डॅश बोर्डवर’ लवकरच उपलब्ध होईल यामध्ये न्यायालय,रेरा तसेच कायदा व सुव्यवस्था या सेवांचाही समावेश करावा, ‘स्वॅस’ (SWaaS) या माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकृत प्रणालीमध्ये ३४ विभागांच्या संकेतस्थळाच्या सेवांबरोबर शासनाच्या सर्व विभागांचाही लवकर समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे सीएम डॅशबोर्ड सादरीकरणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, संचालक अनिल भंडारी यासह आयटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सीएम डॅश बोर्ड’ संकेतस्थळ आणि ‘स्वॅस’ माहिती प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,जनतेला कोणत्याही योजनांची माहिती तात्काळ एकाच संकेतस्थळावर मिळावी यासाठी सीएम डॅश बोर्ड जनतेला उपयुक्त ठरावा. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती आणि सद्यस्थिती, अद्ययावत माहिती, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज भासू नये. यामध्ये न्यायालय, कायदा व सुव्यवस्था तसेच रेराची देखील माहिती असावी. https:// cmdashboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जनतेला शासनाच्या सर्व विभागांची माहिती लवकरच  उपलब्ध होणार आहे. हे संकेतस्थळ दिव्यांगानाही सहज हाताळता येणार असून  माहितीचा अधिकार देखील यावर उपलब्ध असेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान विभागातंर्गत राष्ट्रीय सूचना केंद्राची ‘स्वॅस'(S३WaaS) ही प्रणाली आहे.या प्रणालीमध्ये  राज्यातील ३४ संकेतस्थळांचा समावेश आहे यामध्ये इतर विभागांच्या संकेतस्थळांचाही समावेश वाढवा.ही प्रणाली सुरक्षित असून सहजरित्या एकाच ठिकाणी उपलब्ध असून स्मार्ट फोन व संगणकावरही नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटिया यांनी माहिती तंत्रज्ञान विभाग हा ‘सीएम डॅश बोर्ड व ‘स्वॅस'(SWaaS)  ही प्रणाली सातत्याने अद्यावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान महत्त्वपूर्ण – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि. ११ (जिमाका):  नाशिक शहरात ९० च्या दशकानंतर  मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. राज्यातील प्रमुख औद्योगिक शहरांमध्ये नाशिक शहर महत्त्वाचे ठरले असून नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

राज्याच्या उद्योग संचालनालयातर्फे हॉटेल द गेट वे येथील आयोजित इन्व्हस्टमेंट समीट नाशिक २०२५ मध्ये डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी ‘मैत्री’च्या समन्वय अधिकारी प्रियदर्शिंनी सोनार, उद्योग विभागाच्या सह संचालक वृषाली सोने, नाशिक डाकघरचे प्रवर अधिक्षक प्रफुल्ल वाणी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे सचिन सोनटक्के, ‘निमा’चे अध्यक्ष ललित बूब, आयडीबीआय बँकेचे न्यू इंडिया इन्शोरन्सचे सहाय्यक व्यवस्थापक अनुप चव्हाण, एमसीसीआयए चे चेअरमन सी.एस.सिंग, इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन कांउन्सिलचे प्रादेशिक संचालक सी.एच.नादीगर यांच्यासह अधिकारी व उद्योजक उपस्थित होते.

डॉ. गेडाम म्हणाले की, नाशिकला व वायनरी उद्योग व पर्यटनक्षेत्रात अधिक संधी आहे. येणाऱ्या दोन वर्षात नाशिकच्या विकासाला निश्चित चालना मिळणार आहे. यात नाशिक ते पुणे व मुंबईपर्यंत जाणारा समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. पुणे शहराच्या धर्तीवरच नाशिकलाही याचा लाभ होणार आहे. नाशिक येथे सुरू झालेल्या विमानतळामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विमानतळाचा विस्तार होणे गरजेचे आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिक शहरासाठी पायाभून सुविधांसाठी अनेक प्रकल्प विचाराधीन आहेत. यात रस्ते, मेट्रोसह विविध प्रकल्पांचा समावेश आहे. उद्योगांचे लहान प्रश्नांचे स्थानिक पातळीवर निराकरण होणे गरजेचे असून मोठे धोरणात्मक प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवून ते कसे सोडविण्याच्या दृष्टीने नियोजन उद्योग विभागाने करावे. कुंभमेळ्याच्या दृष्टीन नाशिकचे ब्रँडिंग करण्याची मोठी संधी आहे. यामुळे उद्योगांना गुंतवणुकीस मोठा मंच उपलब्ध होणार आहे. सर्व क्षेत्रातील उद्योगांनी आपली क्षमता ओळखून विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकणे गरजेचे असून नाशिकचे नाव अग्रेसर करण्यात सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे.

आज झालेल्या गुंतवणूक बैठकित नाशिक 2025 मध्ये 142 उद्योगांचे  सामंजस्य करार झाले. यातून 6 हजार 404 कोटी रूपयांची गुंतवणूक झाली असून 14 हजार 403 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

०००

विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा लक्षवेधी 

विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भोंग्यांबाबत तक्रार येऊन कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षक जबाबदार

मुंबईदि. ११ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रार्थनास्थळावर भोंगे वाजविण्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. रात्री १० ते सकाळी ६  या वेळेत भोंगे बंद असले पाहिजे.  विनापरवानगी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या भोंग्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबतीत असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य देवयानी फरांदे यांनी अनधिकृत भोंगे लावून ध्वनी प्रदूषणा बाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.

सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेपोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या भोंग्यांची परवानगीनियमांच्या पालनाबाबत  तपासणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्यावर राहील. याबाबत तक्रारी आल्यास व कारवाई न केल्यास संबंधित पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येईल.

राज्यात ध्वनी प्रदूषणाबाबत एकसूत्रीपणा येण्यासाठी पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ व ध्वनी प्रदूषण (विनियम व नियंत्रण) अधिनियम २००० अन्वये कार्यवाही करताना प्रमाणित कार्यप्रणाली निर्गमित करण्यात आली आहे. या कार्यप्रणालीनुसार सर्व प्रार्थनास्थळांवर तसेच इतर ठिकाणी भोंगे वाजविण्याबाबत ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमाप्रमाणे दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री दहा वाजेपर्यंत ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.

आवाजाची मर्यादा तपासण्याचे मशीन सर्व पोलीस स्टेशनला उपलब्ध करून देण्यात आले आहे.  तसेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे वापर करण्यावर बंदी आहे. याबाबत असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे भोंगे जप्त करण्यात येतील. भोंग्याबाबत ध्वनी प्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांबाबत कारवाई करण्याचे तक्रार अर्ज पाहणी अहवालासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतील. प्राप्त अहवालाची पडताळणी करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नियमानुसार संबंधित न्यायालयात खटला दाखल करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

गडचिरोलीतील निकृष्ट आणि अनियमित तांदूळ पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई– उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईदि. १ : गडचिरोली जिल्ह्यात अनियमित आणि निकृष्ट दर्जाच्या तांदूळ पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, यासंदर्भात अहवाल मागवून दोषींवर कठोर कारवाई केली जाईलअसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य नाना पटोले आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कीया प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवून दोषींवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेचलोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून  तांदळाच्या पुरवठा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणली जाईल. आवश्यकता भासल्यास या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमले जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईलअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

इचलकरंजी पाणीपुरवठा प्रकल्प वेगाने पूर्ण करणार– उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबईदि. १ : इचलकरंजी शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या पंचगंगा आणि कृष्णा नदीतून ४५ दललिटर (MLD) पाणी उपसा केला  जात आहे. तसेचजुनी आणि जीर्ण झालेली पाईपलाइन बदलण्याचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात  आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक घेऊन  इचलकरंजी पाणीपुरवठा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात येईलअशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

सदस्य राहूल आवडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की,  कृष्णा नदी मजरेवाडी उद्भव योजना शहरापासून १८.३३ किमी वर सन २००१ पासून आहे. पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन जुनी झाल्याने वारंवार गळती होत होती. त्यामुळे तीन टप्प्यात पाईपलाइन बदलण्याचे काम सुरू असूनत्यासाठी ५४.५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत १८.३३५ किमी पाईपलाइन  पैकी १६.४० किमी पाईपलाइन बदलण्यात आली आहेतर उर्वरित १.९३५ किमी काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर महानगरपालिकेकडून ४५ MLD पाणी उपसा करून शहरातील नागरिकांना नियमित पुरवठा करण्यात येईल.

इचलकरंजी शहराची भविष्यातील पाणीपुरवठा गरज लक्षात घेऊन केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत दूधगंगा नदी (सुळकुड उद्भव) येथून नवीन पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १६०.८४ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पास स्थानिक नागरिकांचा विरोध होता  तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीया समितीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.पुढील कार्यवाही सुरू असून. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासंदर्भात लवकर मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक घेण्यात येईल, असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

पुणे शहरात सुरळीत वाहतुकीसाठी ‘एआय’ वर आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबईदि. ११ :-  पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पुणे शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित वाहतूक सिग्नल प्रणाली विकसित करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी दिली.

सदस्य चेतन तुपे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

ड्रंक अँड ड्राईव्ह संदर्भातीला  कायदा अधिक कडक केला जाणार असल्याचे  सांगून राज्यमंत्री श्री. कदम म्हणालेया गुन्ह्यातील अपराधीवर  कठोर कारवाई केली जाणार आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींची  लवकर सुटका होऊ नये यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिस यंत्रणेचा समन्वय वाढविला जाईल. शहरातील वाहतूक नियमनस्पीड ब्रेकरअपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) ठिकाणांवर उपाययोजना व अपघात होत असलेल्या ठिकाणी स्पीड ब्रेकरसिग्नल सिस्टिम आणि अन्य सुरक्षात्मक उपाय करण्यावर भर देण्यात येईल. पुणे शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातही निर्णय घेतला जाईल अशी माहिती दिली.

राज्यमंत्री कदम म्हणालेलक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून. अशा घटना घडू नयेत म्हणून महापालिका व पोलिस यंत्रणेने आवश्यक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

विधानसभा प्रश्नोत्तरे 

रस्ते अपघात रोखण्यासाठी ‘अल्कोहोल’ सोबतच आता ‘ड्रग्स’ सेवन तपासणीही करणार– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. ११ : राज्यामध्ये रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवून अपघाती मृत्यू रोखण्यासाठी शासन विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करीत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी पोलिसांमार्फत नियमितपणे वाहन चालकांची अल्कोहोल सेवन तपासणी करण्यात येते. मात्र यापुढे आता ‘अल्कोहोल’ सोबत ड्रग्स सेवनाची तपासणीही करण्यात येईल. ड्रग्स सेवन तपासणीच्या मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

राज्यात होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणाबाबत सदस्य काशिनाथ दाते यांनी प्रश्न उपस्थित केला होता

या प्रश्नाच्या उत्तरात परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, देशभरात रस्ते अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. मात्र राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण .०२ टक्क्यांनी कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अपघाती मृत्यूच्या प्रमाणातही मागील वर्षाच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून येते. शासनाने जिल्हा नियोजन समितीचा एक टक्का निधी रस्ता सुरक्षेसाठी राखीव ठेवला आहे. या निधीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षाविषयक विविध उपाययोजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत.

वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी विभागाने 263 इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली आहे. चालक परवान्यांमध्ये अधिक कडक नियमावली अमलात आणण्यात येत आहे. राज्यात 38 ठिकाणी ऑटोमॅटिक ड्राइविंग टेस्ट सुरू करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 70 टक्के परवानाधारक अपात्र ठरले आहेत. यापुढे चालक परवान्यांमध्ये अचूकता येण्यासाठी ऑटोमॅटिक टेस्ट ट्रॅकचा उपयोग करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी दंड करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचाही उपयोग करण्यात येईल.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, रस्ते सुरक्षिततेसाठी राज्यातील ९ राष्ट्रीय महामार्गांवर आणि २१,४०० किमी महत्त्वाच्या रस्त्यांवर अपघातप्रवण क्षेत्रावर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारण्याचे प्रस्तावित आहे. ही आयटीएमएस प्रणाली पीपीपी पद्धती राबविण्यात येईल. नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी व रस्ता सुरक्षा विषय जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. मुंबई शहरातील रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला किंवा बसशी संबंधित झालेल्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. वन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने अपघातप्रवण स्थळे दुरुस्त करण्यात येतील. वाहतूक नियमांविषयी शालेय अभ्यासक्रमात यांसदर्भातील घटक समाविष्ट करण्याबाबत तपासणी करून कार्यवाही करण्यात येईल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य अतुल भातखळकर, योगेश सागर, ज्योती गायकवाड, सुधीर मुनगंटीवार, गोपीचंद पडळकर, डॉ नितीन राऊत, अभिमन्यू पवार, आदित्य ठाकरे, विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातील भूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार – खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ११ :- खाण क्षेत्रातील नियंत्रित स्फोट (कंट्रोल ब्लास्टिंग) आणि त्याचा जलस्रोतांवर होणारा परिणाम याबाबत खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातील भूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी दिली.

खनिकर्म मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यात सध्या २७ खाणींना परवानगी आहे, त्यापैकी १७ खाणी कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांत झालेल्या १२ विहिरींच्या निरीक्षणानुसार भद्रावती आणि बल्लारशाह या भागांमध्ये पाणीपातळी वाढलेली आहे, तर काही भागांत अंशतः घट झाली आहे.

खाणीमधील ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे जात असल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अशी निवेदने प्राप्त झाली असल्यास यासंदर्भात महसूल व खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सर्व्हे केला जाईल. तसेच खाणपट्ट्यातील समस्यांबाबत लवकरच बैठक घेतली जाईल, असेही श्री. देसाई यांनी  उत्तरात सांगितले.

खाणपट्ट्यातील लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात खाण मंजुरीच्यावेळी अटी आणि शर्तींमध्ये पुनर्वसनाचा समावेश असल्यास, संबंधित खाण कंपन्यांना याबाबत सूचना दिल्या जातील. खाणीमुळे बाधित झालेल्या गावातील रस्ते खराब झाल्यास अशा रस्त्यांना पर्यायी मार्ग देण्यात येऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल व याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.

सदस्य किशोर जोरगेवार यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विजय वडेट्टीवार, संजय देशमुख, आशिष देशमुख, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

मुंबईदि. ११ : चर्चगेट येथील एच. आर महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असून कार्यान्वित असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सुनिल शिंदे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला. 

महाविद्यालयाने नवीन आर्किटेक्टची नेमणूक केली असल्याचे सांगून नगरविकास राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या कीमहाविद्यालयाने आता बांधकामाचा प्रस्ताव नव्याने सादर केला आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. याठिकाणी केलेल्या पाहणीमध्ये काही बांधकामे अनधिकृत असल्याचे दिसून आले आहे. या अनधिकृत बांधकामांसंदर्भात चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

यासंबंधी सदस्यांनी बृह्नमुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला असता त्याचे उत्तर इंग्रजीमध्ये देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले कीमराठी ही राज्यभाषा असून इंग्रजीमध्ये उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक समज देऊन उत्तर मराठीमध्ये देण्याविषयी आदेश देण्यात येतील.

0000

ताज्या बातम्या

“आमची प्रक्रिया पारदर्शक आणि उत्तरदायित्वपूर्ण आहे” – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, ८ :  भारत निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांच्या उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि...

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...