रविवार, जून 8, 2025
Home Blog Page 203

कामगार, कष्टकरी वर्गाला  न्याय देणारा अर्थसंकल्प – मंत्री ॲड.आकाश फुंडकर

मुंबई, दि. १० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेला हा अर्थसंकल्प शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करणारा आहे. त्यामुळे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विशेषतः कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी हा अर्थसंकल्प न्याय देणारा असून, त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा ठरेल, असे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले आहे.

महाराष्ट्र आता एका नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे आणि हा अर्थसंकल्प त्या दिशेने बळकट पाऊल असल्याचेही मंत्री ॲड.फुंडकर यांनी म्हटले आहे.

०००

हे तर चॅम्पियन बजेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १०: गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या लोकाभिमुख योजना आणि पायाभूत सुविधा यांचा योग्य तो संतुलन राखणार हे चॅम्पियन बजेट उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मांडले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या अर्थसंकल्पाविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

गेल्या अडीच वर्षांपासून विकासाची घोडदौड सुरू असून महाराष्ट्र आता थांबणार नाही हा निर्धार आजच्या अर्थसंकल्पातून व्यक्त होतो असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवंगत शेषराव वानखेडेंनंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळेस देखील हा अर्थसंकल्प मांडतांना समतोल राखत सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिकेसारख्या प्रगत देशाचा विकास हा रस्त्यांमुळे झाला आहे. आजच्या अर्थसंकल्पात रस्ते, पूल, बंदरे अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चांगली तरतूद केली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात एकही क्षेत्र सोडलेले नाही. औद्योगिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून तो आणखीही पुढे राहील त्याचप्रमाणे गुंतवणुकी मोठ्या प्रमाणावर येईल अशा तऱ्हेने या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत.

मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्राची क्षमता दीड ट्रिलियन डॉलर्स योगदानाची आहे. समृद्धी, अटलसेतू सारखे गेम चेंजर प्रकल्प गेल्या अडीच वर्षांत पूर्ण झाले आहेत.

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना आणखी लाभ होईल. अडीच वर्षांपासून आपण सिंचनाच्या प्रकल्पांना वेग दिला असून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी उचललेली पावलं अतिशय महत्त्वाची आहेत. गरीब, दुर्बल महिलांना केवळ लाडकी बहीण योजनेतून पैसे देऊन आम्ही थांबलेलो नाहीत तर त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असा अपप्रचार विरोधकांनी सुरू केला होता मात्र आम्ही या योजनेसाठी बजेटमध्ये 36 हजार कोटींची तरतूद करून बहिणींना मदत करण्याचा आमचा निर्धार कायम ठेवला आहे असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कुठल्याही प्रकारे या अर्थसंकल्पात योजनांना कात्री लावलेली नाही, उलट पायाभूत सुविधांच्या विकासांना या बजेटमध्ये वेग देण्यात आलेला आहे असे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विकास हाच आमचा अजेंडा असून लोकांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. विकसित भारत घडवण्यामध्ये विकसित महाराष्ट्राचं योगदान अधोरेखित करणारा हा अर्थसंकल्प आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

०००

विकसित महाराष्ट्र साकारणारा, लोकाभिमुख अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १०: विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल, असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधान सभेत सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल उपस्थित होते.

महाराष्ट्राचा विकासदर सर्वाधिक

राज्याचा हा अर्थसंकल्प संतुलित स्वरुपाचा आहे. यात राजकोषीय तूट २.७ टक्क्यांपर्यंत राखण्यात यश आले आहे. सरत्या वर्षात ही तूट २.९ टक्क्यांपर्यंत होती. महसूली जमा आणि खर्च यांचा उत्तम ताळमेळ राखला गेला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाचे आकारमान आता सात लाख कोटींवर पोहचले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आता लोकसंख्येच्य तुलनेत उत्तर प्रदेशचा अपवाद केल्यास, सर्वात मोठा अर्थसंकल्प असणारे राज्य ठरले आहे. महाराष्ट्राची जीएसडीपी (सकल राज्य घरेलू उत्पादन) वाढ चांगली आहे. गेल्या दहा वर्षात हे प्रमाण ७.५ टक्क्यांवर पोहचले आहे. हे उत्पादन पाच ते दहा लाख कोटींनी वाढले आहे. त्यामुळे या प्रमाणात आपली कर्ज घेण्याची मर्यादाही वाढली आहे. त्यामुळे आपण विहीत कर्ज मर्यादेचे उल्लंघन केलेले नाही, हे देखील उल्लेखनीय आहे.

उद्योग क्षेत्राची भरारी

आपल्या उद्योग क्षेत्रानेही भरारी घेतली आहे. कोविड काळाचा अपवाद वगळल्यास हा वाढीचा दर चांगला आहे. आपले राज्य स्टार्टअपमध्ये क्रमांक एकवर आहे. जीसएसटी कर संकलनातही महाराष्ट्र पुढे आहे. राष्ट्रीय कर संकलनाच्या तुलनेत आपण सात टक्क्यांहून अधिक म्हणजे दिड लाख कोटींच्या पुढे आहोत. इतर राज्ये आपल्या मागे आहेत. औद्योगिक वाढ, विदेशी गुंतवणूक आणि स्टार्टअप आणि जीएसटीमुळे महाराष्ट्र यापुढेही अग्रेसर राहील, हा विश्वास आहे.

पायाभूत सुविधांचे प्रभावी नियोजन

राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये रस्ते विकास हा महत्त्वाचा विषय आहे. आपल्या अर्थसंकल्पात रस्त्यांचा विकास हा पुढील वीस वर्षांचा विचार करून, नियोजनबद्धरित्या करण्यावर भर दिला गेला आहे. यामुळे रस्त्यांचा आराखडा गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत एक समान पद्धतीने होणार आहे. या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी आपण बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून निधी उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. वर्ल्ड बँक, एशियन बँक, न्यु डेव्हलपमेंट बँक आणि नाबार्डच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभरले जात आहे. यामुळे आपल्या राज्यात बंदरे, विमानतळांच्या विकासासाठीही मोठी गुंतवणूक येणार आहे.

घर बांधणीत महाराष्ट्रच अग्रेसर..

महाराष्ट्राने घर बांधणीच्या क्षेत्रात मोठी मजल गाठली आहे. या क्षेत्रातही मोठी गुंतवणूक आली आहे. विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेतून आपण आता वीस लाख घरांचा टप्पा गाठत आहोत. यातही केंद्र आणि राज्य यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधीचा ओघ राहणार आहे. यातील घरांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून वीजेसाठी स्वयंपूर्ण केले जाणार आहे. याशिवाय ज्या घरांचा वीज वापर तीनशे युनीटहून कमी असेल, त्यांनाही या योजनेतून वीज देण्याचे सुतोवाच आजच्या अर्थसंकल्पात केली गेली आहे.

शेती, सिंचन क्षेत्रालाही प्राधान्य

या अर्थसंकल्पात कृत्रिम बृद्धिमता- एआय आणि बायोटेक, ड्रोन टेक्नॉलॉजी सारख्या उत्पादन खर्च कमी करणाऱ्या आणि शेतीतील नफा वाढवणाऱ्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. एआयद्वारे माती परिक्षण ते फुल-फलधारणा यापर्यंतच्या टप्प्यांचे नियोजन करता येणारे शक्य आहे. त्याबाबतचे नियोजनही केले गेले आहे. जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि नदिजोड प्रकल्पासाठी भरीव तरतूद केली गेली आहे.

लाडक्या बहिणी ते लखपती दिदी…

लाडक्या बहिणींसाठी निधी कमी पडणार नाही, असे नियोजन केले गेले आहे. याशिवाय या योजनेतून बहिणी आर्थिक स्वावलंबी व्हावेत असे नियोजन आहे. काही बहिणींनी या पंधराशे रुपयांतून सोसायटी स्थापन केल्या. या सोसायट्यांचे जाळे निर्माण करून, राज्यस्तरीय अपेक्स अशी सोसायटी स्थापन केली जाईल. याशिवाय आपल्याला लखपती दीदी या महिलांच्या स्वयंरोजगाराच्या संकल्पनेलाही पुढे न्यायचे आहे. आतापर्यंत आपण २३ लाख लखपती दीदींचे उद्दीष्ट पूर्ण केले आहे. आणखी २४ लाखांचे उद्दीष्ट्य साध्य करून एक कोटी लखपती दीदींचे लक्ष्य गाठायचे आहे.

सामाजिक न्याय, आदिवासींचाही विकास

सामाजिक न्याय, आदिवासी विभागांच्या तरतुदीत भरीव वाढ करण्यात आली असून ती प्रत्येकी 43 व 40 टक्के एवढी आहे. सामाजिक न्यायाच्या धोरणाला बळ मिळेल. यात वैयक्तीक लाभाच्या योजना राबवल्या जाणार असल्यामुळे अनेक कुटुंबांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासंदर्भातील लाभ निश्चितच होतील.

विकासाकडे जाताना रोजगार संधीवर भर देणारा अर्थसंकल्प आहे. यापुर्वी अर्थमंत्री म्हणून १३ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम दिवंगत शेषराव वानखेडे यांच्या नावावर होता. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. यापुढील वाटचालीत ते देखील हा विक्रम पूर्ण करून, अर्थसंकल्प सादर करतील, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद करून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री पवार आणि वित्त राज्यमंत्री जयस्वाल यांचे अभिनंदन केले.

०००

अर्थसंकल्पात पर्यटन विभागाच्या पायाभूत सोयीसुविधांसाठी भरीव तरतूद – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. १०: ऐतिहासिक वारसा, संस्कृती आणि विविधता यांनी समृद्ध असलेले  राज्याचे पर्यटन क्षेत्र जागतिक पातळीवर पसंतीला उतरत असून आर्थिक विकासाला या क्षेत्रामुळे मोठी चालना मिळत आहे. रोजगाराभिमुख विकासाची या क्षेत्राची क्षमता लक्षात घेऊन २०२५ – २६ च्या  अर्थसंकल्पात पर्यटन विभागाच्या पायाभूत सुविधा सोयीसुविधांसाठी भरीव अशी २ हजार ८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे पर्यटन, खनीकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पुढील दहा वर्षात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, आरोग्य पर्यटन धोरणही आखण्यात आले आहे. शिवाय नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास कळावा यासाठी शिवसृष्टीसारखे विविध प्रकल्प हाती घेऊन त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यातील जल पर्यटनासाठी निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. ठाणे आणि कोयनानगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कायवॉक उभारणीलाही मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्व विभागांना समान न्याय देणारा आहे असे पर्यटन मंत्री देसाई म्हणाले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातील लोकाभिमुख योजनांना चालना देणारा अर्थसंकल्प – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १०: उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा आहे. विकासाची गंगा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविणारा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असा असून अर्थसंकल्पामध्ये रोजगार निर्मितीवर देण्यात आला असल्याचे मत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

मंत्री लोढा म्हणाले की, नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे २५० एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर (इनोव्हेशन सिटी) उभारण्यात येणार आहे. त्यातून हजारो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत १० हजार महिलांना कौशल्य व कृत्रिम  बुध्दिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. AI चे प्रशिक्षण देऊन महिलांना उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी जगभरात उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री अजित पवार

  • शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास  क्षेत्रांसाठी भरीव तरतूद,
  • ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प

मुंबई, दि. १० : ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा अकरावा अर्थंसंकल्प विधानसभेत सादर करताना व्यक्त केला. तसेच विधापरिषदेमध्ये वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजर्षि शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांचे स्मरण केले. शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेगबहादूर यांच्या हौतात्म्याचे हे 350 वे वर्ष आहे. स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे हे त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीवर्ष आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या आपल्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. याचाही कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला.

राज्यात गुंतवणुकीला पोषक वातावरण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प आहे. औद्योगिक विकासात  राज्य सदैव अग्रेसर असून थेट विदेशी गुंतवणूकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे. जानेवारी, 2025 मध्ये  दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाव्दारे एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्‍याव्दारे येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होईल, असा अंदाज आहे. वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्यकर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांनुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्याबाबतची अभय योजना उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली.  अभय योजनेचे नाव “महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यानी प्रदेय असलेल्या) यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत अधिनियम, 2025” असे असून या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून दिनांक ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

ठळक वैशिष्ट्ये :

  1. राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरले आहे. तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1 टक्क्यापेक्षा कमी राहिली आहे. सन 2025-26 ची राजकोषीय तूट 1 लाख 36 हजार ‍235 कोटी रुपये आहे.
  2. आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून, भांडवली खर्चातील वाढीद्वारे विकासचक्रास चालना देऊन राज्याच्या विकासदरात वाढ करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्याचे प्रयत्न आहेत. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था १४० बिलीयन डॉलर वरुन सन २०३० पर्यंत ३०० बिलीयन डॉलर तर सन २०४७ पर्यंत १.५ ट्रिलीयन डॉलर पर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. मुंबई महानगर प्रदेशात हाती घेण्यात आलेल्या विविध पायाभूत सुविधांची कामे जसे की वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, मल्टीमोडल कॉरीडॉर, भुयारी मार्ग, मेट्रो प्रकल्प यामुळे हे क्षेत्र विकासाचे केंद्र ठरणार आहे.
  3. विकसित भारत- विकसित महाराष्ट्र ही संकल्पना साध्य करण्याकरीता “मेक इन महाराष्ट्र” व्दारे गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्राचे नवीन औद्योगीक धोरण आखण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षाच्या कालावधीत ४० लाख कोटी रुप यांची गुंतवणुक व ५० लाख रोजगार निर्मिती अपेक्षीत आहे.
  4. कृषी क्षेत्राच्या गेल्या वर्षीच्या निराशाजनक 3.3% विकास दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना विविध योजना, कार्यक्रमांच्या माध्यमातुन आर्थिक सहाय्य दिल्यामुळे सन 2024-25 मध्ये कृषी क्षेत्राचा विकास दर 8.7% पर्यंत सुधारला. या विकास दरात सातत्याने वाढ करण्याकरीता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेती उत्पादनात मूल्यवर्धन, सिचंन सुविधा, वीजेची गरज भागविण्यासाठी सौर ऊर्जा इत्यादी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येतील.
  5. केंद्र पुरस्कृत योजनांच्या माध्यमातून राज्यास अधिकाअधिक केंद्रीय निधी प्राप्त व्हावा म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येतील.
  6. वस्तु व सेवा करातुन राज्यास होणाऱ्या उत्पन्नात दरवर्षी सुमारे १२ ते १४ टक्के एवढी वाढ होत आहे.
  7. महत्वाकांक्षी योजनांना निधीचा सुरळीत पुरवठा होण्याकरीता केंद्रीय सहाय्य, आतंरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून सहाय्य , सार्वजनिक मालमत्तेचे मुद्रीकरण, योजनांचे सुसूत्रीकरण तसेच पायाभूत सुविधा गुंतवणूक न्यास सारखे नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
  8. राज्यातील महामार्ग, बंदरे, विमानतळे, जलमार्ग, बस वाहतूक, रेल्वे आणि मेट्रो या सर्व दळणवळण क्षेत्रांसाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे.
  9. दर्जेदार ग्रामीण रस्ते तसेच राज्य महामार्ग व जिल्हा रस्त्यांना सर्वाधिक आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे.
  10. सर्वांसाठी घरे हे उद्दीष्ट येत्या 5 वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ग्रामीण घरकुलांसाठी 15 हजार कोटी तर शहरी आवास योजनांसाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  11. नव्याने जाहीर केलेल्या योजनांसाठी पुरेशा तरतुदी केलेल्या आहेत. राज्याच्या वार्षिक योजनेत 62 हजार 560 कोटीची म्हणजेच सुमारे ३३ टक्के इतकी भरीव वाढ करण्यात आली असून अनुसूचीत जाती घटक योजनेच्या तरतुदीत 42 टक्के, आदिवासी घटक योजनेच्या तरतुदीत 40 टक्के वाढ करण्यात आली आहे.
  12. राज्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या योजनांचे मुल्यमापन करुन त्यांचे सुसूत्रीकरण तसेच साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करुन त्यामध्ये वाढ करण्याचे उपाय सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
  13. थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) सर्व वैयक्तिक लाभार्थी योजनांची अंमलबजावणी गतिमान, कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी डीबीटी पध्दत राबविण्यात येत आहे. दिनांक १ एप्रिल २०२५ पासून अशा वैयक्तिक लाभार्थी योजनांचा लाभ केवळ डीबीटी द्वारे देण्यात येईल.
  14. राज्याच्या सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पाठबळ देण्यात येत आहे अर्थसंकल्पात विविध स्मारके, तीर्थक्षेत्र विकास, पर्यटनस्थळ विकसित करण्याच्या विविध प्रकल्पांना भरीव तरतुद करण्यात आली आहे.
  15. राज्यातील जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत.
  16. क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी धोरणे आणि अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यात आल्या आहेत.
  17. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीत स्मार्ट पीडीएस आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे अधिक पारदर्शकता आणण्यात येणार आहे.
  18. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्रातील महाराष्ट्राचे नेतृत्व अधोरेखित करण्यासाठी विविध महोत्सव व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.
  19. राज्याचे सार्वजनिक आरोग्य धोरण आखण्यात येवून प्रत्येक व्यक्तीला 5 किलोमीटरच्या परिघात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
  20. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार असून मुलींचा व्यावसायीक शिक्षणात सहभाग वाढविण्या करीता शिक्षण व परिक्षा शुल्काची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे.
  21. कायदेशीर खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्यातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.

०००

उपग्रह व ड्रोनच्या माध्यमातून राज्यात ई-पीक पाहणी करण्याचे शासनाच्या विचाराधीन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा प्रश्नोत्तरे

उपग्रह व ड्रोनच्या माध्यमातून राज्यात ई-पीक पाहणी करण्याचे शासनाच्या विचाराधीन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १०: राज्यात ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या सातबारावरील पिकांच्या नोंदी अचूक होण्यासाठी ई-पीक पाहणी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र शासनाकडून मदत देताना ई-पीक पाहणी अट शिथिल करण्यात येते. भविष्यात पीक पाहणीत अधिक अचूकता आणण्यासाठी एमआरसॅक (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर) च्या सहकार्यातून उपग्रहाच्या व ड्रोनच्या माध्यमातून पीक पाहणी करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

ई पीक पाहणी बाबत सदस्य कैलास पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ज्या भागांमध्ये नेटवर्क नसल्याने किंवा तांत्रिक अडचणीमुळे ई पीक पाहणी करणे शक्य होत नाही, अशा भागात ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी करून नंतर ती ऑनलाईन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासन वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करते, अशा मदतीवेळी ई-पीक पाहणीच्या सक्ती मधून सूट देण्यात येते.

गावपातळीवरील यंत्रणेमार्फत ई-पीक पाहणी झाली नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे महसूल, कृषी व पदूम विभागाच्या गाव पातळीवरील यंत्रणांमध्ये समन्वय करून पीक पाहणी करण्याबाबतची कार्यवाही करण्याचा शासनाचा विचार आहे. पीक पाहणीत अधिक अचूकता आणत पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ज्यामुळे खऱ्या पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल. जिल्हा परिषदेतील कृषी विभाग व राज्य शासनाच्या कृषी विभाग एकत्र आणण्यासाठी किंवा याबाबत धोरण ठरवण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नाच्या उत्तरात महसूल राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, ज्या डोंगरी भागामध्ये नेटवर्क नाही, अशा ठिकाणी तलाठ्यांमार्फत पीक पाहणी करण्यात येऊन मंडळ अधिकारी स्तरावर अधिकृत करण्यात येईल. ज्या भागामध्ये नेटवर्क नसल्याने पीक पाहणीत अडचण निर्माण होते, अशा ठिकाणी ऑफलाईन पीक पाहणी करण्याच्या सूचना देण्यात येतील.

या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य प्रताप अडसड, सत्यजित देशमुख, भास्कर जाधव, रणधीर सावरकर अमीत झनक यांनी सहभाग घेतला.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

समृद्धी महामार्गावर अणु ऊर्जा आधारित कांदा विकिरण प्रक्रिया साठवणूक केंद्रे उभारणार – उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे

मुंबई दि. १०: राज्यामध्ये देशाच्या ४० टक्के कांदा उत्पादन होते. कांदा साठवणूक करून तो पुरवठा साखळीमध्ये उपलब्ध ठेवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समृद्धी महामार्ग लगत अणुऊर्जेवर आधारित कांदा विकिरण प्रक्रिया केंद्र उभारून कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत सदस्य छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री रोहित पवार, रणधीर सावरकर, सिद्धार्थ खरात, हेमंत ओगले, दिलीप बनकर, राहुल कुल, सरोज अहिरे, आशिष देशमुख यांनी सहभाग घेतला.

या संदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कांदा उत्पादन राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.

अणु ऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणूकीमुळे पिकाची नासाडी होणार नाही व शेतकऱ्याच्या पिकास चांगला भाव मिळेल. कांद्यावरील  निर्यात शुल्काबाबत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच कांदा चाळ वाढवून त्यावरील अनुदान वृद्धीसाठी  कृषी विभागाच्या समन्वयातून प्रयत्न केले जातील.

निर्यात शुल्क आणि साठवणुकीसाठी उपाययोजना – पणन मंत्री जयकुमार रावल

या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर देताना पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले, राज्य सरकार शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा, यासाठी केंद्र सरकारशी सतत पाठपुरावा करत आहे. कांद्याचे योग्य नियोजन होऊन बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना विकसित करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. केंद्र सरकारने यापूर्वी कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के लावले होते. मात्र, राज्य सरकारच्या सततच्या पाठपराव्यानंतर  हे शुल्क २० टक्के करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, कांदा नाशवंत पीक आहे.  ते दीर्घ काळ टिकवून ठेवण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर कार्यवाही करीत असते.  कांदा चाळींच्या क्षमतावृद्धी करीत त्यावरील अनुदान वाढविण्यासाठी शासन निश्चितच सकारात्मक कार्यवाही करणार आहे. पणन मंडळाच्या माध्यमातून  कांदा भाव प्रणाली करण्याचा शासनाचा मानस आहे.

महाराष्ट्रातील कांद्याला सर्वत्र चांगली मागणी असल्याचे सांगून मंत्री रावल यांनी सांगितले की, कांदा निर्यातीस देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. तसेच कांदा पिकासाठी भाव व अनुषंगिक प्रश्नासंदर्भात राज्यस्तरावर बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

०००

एकनाथ पवार/विसंअ/

प्रत्येक विद्यार्थ्याला शुद्ध पेयजल उपलब्ध करून देणार– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १०: राज्यातील शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर काम करीत आहे. सर्व शाळांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एमआरसॅक (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशन सेंटर)च्या सहकार्याने राज्यातील शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या भौतिक सुविधा, आवश्यक असलेल्या सुविधा याबाबत आराखडा तयार करण्यात येत आहे. प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला शुद्ध पेयजल उपलब्ध करून देणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सदस्य मोहन मते यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री श्री. भुसे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात सद्य:स्थितीत यू डायस वर २०२४ -२५ नुसार सर्व व्यवस्थापनाच्या एकूण ३,९८० शाळा असून त्यापैकी २,४५१ शाळात आर ओ वॉटर ची सुविधा सुस्थितीत उपलब्ध आहे. राज्यात ज्या ठिकाणी शुद्ध पाणी सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल.

या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य भास्कर जाधव, डॉ. नितीन राऊत यांनी सहभाग घेतला.

0000

बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विधानपरिषद प्रश्नोत्तरे 

बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि.१० :गोरेगाव, बोरीवली, मालाड, अंधेरी, बांद्रा, विलेपार्ले, चेंबुर आणि कुर्ला या भागात बनावट नकाशांच्या आधारे सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि एनडीझेड (नॅचरल डिफेन्स झोन) क्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे उभारलेल्या बांधकांमांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच बनावट नकाशे तयार केल्या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य विक्रांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, भाई जगताप, अनिल परब यांनी सहभाग घेतला.

महानगर पालिकेच्या उपआयुक्त परिमंडळ कार्यालय 7,5,4 आणि 3 मध्ये अशा प्रकारे बनावट नकाशे तयार करण्यात आल्याचे सांगून मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, बनावट नकाशे तयार करण्याचा हा प्रकार गंभीर असून या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील शंभूराज बाभळे आणि मीना पांढरे या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबीत करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली असून त्यामार्फत चौकशी करण्यात येत आहे. एकूण 102 बनावट नकाशांच्या अधारे या संपूर्णी क्षेत्रामध्ये 320 मिळकतींमध्ये अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्यातील 20 ते 22 मिळकत धारकांनी दिवानी न्यायायलयातून कारवाईस स्थगिती मिळवली आहे. उर्वरीत बांधकामांचे तोडकाम करण्यास कोणतीही हरकत नाही. याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून तातडीने पाडकाम करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याबाबत कठोर कारवाईच्या सूचनाही बृह्नमुंबई महापालिकेला देण्यात आल्या आहेत.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात

सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई,  दि. १० :सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय आणि आदिवासी विकास विभागामार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरिय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी या संस्थांचे प्रशिक्षण ऑनलाईन घेण्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत, भाई जगताप, शशिकांत शिंदे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय आणि आदिवासी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट करूनसामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, वित्त विभागाचेअपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून ही समिती प्रशिक्षण संस्थांच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवेल. तसेच विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळवून देण्यावर भर देण्यात येईल. राज्यात १७६ संस्थांची गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात आली असून कोणत्याही संस्थेमध्ये प्रवेश घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना आहे. काही वेळा प्रशिक्षण कालावधी तीन ते पाच वर्षांचा असला तरी तो सात ते आठ वर्षांपर्यंत वाढतो. यासंदर्भात अभ्यास करण्यात येत असून सभागृहातील सदस्यांच्या सूचनांचाही समावेश करण्यात येत आहे. सदस्यांचा समावेश असलेली नवीन समितीस्थापन करण्याचाही शासनाचा विचार असल्याचे श्री. शिरसाट यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

जात वैधता पडताळणीप्रकरणांचा गतीने निपटारा होणारसामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

वडिलांचे जात प्रमाणपत्र वैध असल्यास पाल्यांनाही मिळणार

मुंबई,दि.१०: राज्यातील जात पडताळणी प्रकरणांच्याप्रक्रियेला वेग देण्यासाठी शासनामार्फत महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. वडिलांचे जात प्रमाणपत्र वैध असल्यास पाल्यांनाही  वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे. त्याचबरोबर रिक्त पदांच्या भरतीला गती देण्यात येत असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय मंत्री शिरसाट बोलत होते.

सध्या राज्यात एकूण 36 जात पडताळणी समित्या कार्यरत असून, त्यातील 30 समित्यांच्या अध्यक्षपदावर अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती महसूल विभागामार्फत केली जाते. उर्वरित सहा पदे समाज कल्याण विभागातील अतिरिक्त आयुक्त व मंत्रालयातील सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत भरली जातात. यापूर्वी काही पदे रिक्त असल्यामुळे अतिरिक्त जबाबदारी काही अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली होती.  सध्या २९ अपर जिल्हाधिकारी यांची  नियुक्ती केली आहे. यातील 16 अधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारला असून, उर्वरित काही दिवसांत रुजू होतील, असेही श्री.शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

जात पडताळणी प्रक्रियेत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठीही विशेष प्रयत्न सुरू आहेत. सध्या बहुतांश प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.   नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रलंबित प्रकरणे ही लवकरच निकाली काढली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक न्यायमंत्री श्री.शिरसाट म्हणाले की, पूर्वी एकाच अधिकाऱ्याकडे अनेक प्रकरणे असल्याने नागरिकांना विलंबाचा सामना करावा लागत असे. मात्र, आता 29 अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल.गृहचौकशी आवश्यक असलेल्या प्रकरणांत ती तातडीने केली जाईल, मात्र प्रत्येक प्रकरणात गृहचौकशी बंधनकारक नाही. जात पडताळणी समित्यांमध्ये सध्या ४० टक्के जागा रिक्त असून, त्या लवकरच भरल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

पदोन्नतीसंदर्भातही निर्णय घेतला जाईल. तसेच, वडिलांचे जात प्रमाणपत्र वैध असल्यास मुलाला किंवा मुलीला ते थेट वितरीत करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यातयेईल.

जात पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी शासन ठोस पावले उचलत असून, भविष्यात आणखी सुधारणा केल्या जातील, असे सामाजिक न्यायमंत्री श्री.शिरसाट यांनी सांगितले.

यावेळी विरोध पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य अनिल परब अभिजीत वंजारी,भाई जगताप, सदाभाऊ खोत यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

भारतीय क्रिकेट संघाच्या आयसीसी चॅम्पियन करंडक २०२५ मधील विजयाबद्दल विधानपरिषदेत अभिनंदन प्रस्ताव मंजूर

मुंबई,दि.१० :आयसीसी चॅम्पियन करंडक २०२५ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावल्याबद्दल विधानपरिषदेत अभिनंदनाचा ठराव सभागृहनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला.

सभागृहात भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयावर गौरवोद्गार काढण्यात आले आणि संपूर्ण देशासाठी हा विजय अभिमानास्पद असल्याचे सांगण्यात आले.

अभिनंदन ठरावावर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत एकही सामना न गमावता अंतिम सामना जिंकत चॅम्पियन करंडकावर आपले नाव कोरले. विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासह संपूर्ण संघाने उल्लेखनीय योगदान दिले. संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने १२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर तिसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा करंडक पटकावला आहे.

सभागृहात नेत्यांनी भारताच्या सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजयाचे विशेष कौतुक केले. आठ महिन्यांपूर्वी टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारताने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले आहे. हा विजय भारतीय क्रीडा क्षेत्राच्या नव्या युगाचे प्रतीक असल्याचे सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले

यावेळी भारतीय क्रिकेट संघाला भविष्यातही अशाच उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य भाई जगताप, शशिकांत शिंदे, मनीषा कांयदे यांनी अभिनंदन प्रस्तावाचे समर्थन केले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

जनतेच्या तक्रारींसाठी शासकीय कार्यालयांमध्ये आठवड्यातून दोन दिवस निश्चित करा – विभागीय आयुक्त बिदरी

नागपूर, दि. 10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांना दिलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत जनतेच्या तक्रारी ऐकूण घेण्यासाठी प्रत्येक शासकीय विभागामध्ये आठवड्यातून दोन दिवस निश्चित करावे. तसेच कार्यालयांमध्ये स्वच्छता, अभ्यागतांना बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, उन्हाळ्याच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी विभागीय लोकशाही दिनासाठी आलेल्या विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज दिले.

सर्व सामान्य जनतेला आपल्या प्रश्नांसंदर्भात व समस्यांबाबत समाधान करून घेण्याकरिता विविध शासकीय कार्यालयांमध्ये जावे लागते. जनतेचे म्हणने ऐकूण घेण्याकरिता व त्यांचे समाधान करण्याकरिता संबंधित शासकीय कार्यालयाच्या प्रमुखाने आठवड्यातून दोन दिवस निश्चित करून भेटावे. संबंधित अधिकारी कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहू न शकल्यास त्यांच्या ऐवजी अन्य अधिकाऱ्यांनी जनतेला भेटावे. भेटीच्या वेळांसंदर्भात कार्यालया बाहेर ठळक अक्षरात व दर्शनी भागात फलक लावावे, अशा सुचनाही श्रीमती बिदरी यांनी केल्या.  यामुळे थेट मंत्री व मंत्रालयात जनतेला आपल्या समस्या घेवून जाव्या लागणार नाहीत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रितसर मार्गदर्शन होवून  त्यांचे समाधान होईल असेही त्या म्हणाल्या.

नागपूर सूधार प्रन्यास, विशेष पोलीस महानिरीक्षक, महा नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, ऊर्जा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महिला व बालविकास, कृषी, परिवहन आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

0000

ताज्या बातम्या

प्लास्टिकचे वापर टाळा, कापडी पिशवी वापर करा, पर्यावरणाचे संरक्षण करा -पंकजाताई मुंडे

0
सोलापूर, दि. ७ - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट येथे पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन प्लास्टिक बंदी बाबत सर्व भक्तांना आवाहन...

नवउद्योजकांसाठी डॉ.प्रमोद चौधरी यांचे पुस्तक प्रेरक ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. ७ : भारताची भविष्यातील  वाटचाल आणि कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक वाटचालीचा रोडमॅप डॉ. प्रमोद चौधरी यांच्या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. पुस्तकात...

मॉडेल सोलर व्हिलेज योजना

0
सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती... आपला भारत देश‌ पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि...

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांना वेळेत पूर्ण करा -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

0
नागपूर, दि.७ : ज्यांना निवारा नाही त्यांना साध्या दोन खोलीच्या घराची अपेक्षा असते. गावठान व गावठाणांच्या बाहेर घरकुलांसाठी समान न्यायांची भुमिका शासनाची आहे. घरकुलासाठी...

सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर

0
मुंबई, दि. ७ जून : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, राज्यातील एकूण...