शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 204

राज्य राखीव दल अधिक सक्षम करण्यावर भर- पालकमंत्री संजय शिरसाट

छत्रपती संभाजीनगर, दि.९ (जिमाका): राज्य राखीव दलाचा मला अभिमान आहे. या दलाने आपला दरारा आणि शान कायम राखली आहे. राज्य राखीव दलाच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून आपण भरीव निधी उपलब्ध करुन हे दल अधिक सक्षम करण्यावर आपण भर देऊ, असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे दिले.

राज्य राखीव बल गट क्रमांक १४ च्या वर्धापन दिन सोहळ्यात पालकमंत्री  शिरसाट बोलत होते. राज्य राखीव बल कार्य गट क्रमांक १४ चे महासमादेशक विक्रम साळी, पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, राजेंद्र जंजाळ, सिद्धांत शिरसाट व हर्षदा शिरसाट यांच्यासह राज्य राखीव बलातील पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.

शहरात आणीबाणीच्या प्रसंगी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव बलाचे अधिकारी कर्मचारी नेहमीच अभिमानास्पद काम करत आले आहेत. राखीव बलामध्ये अद्यावत साधन सामग्री उपलब्ध करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरीव तरतूद करण्यात येईल. त्यामुळे हे दल अधिक सक्षम करण्यावर आपला भर असेल. राखीव बलाचे कोरोना काळातील यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे,असे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महासमादेशक विक्रम साळी यांनी राज्य राखीव दलाच्या कामगिरीबाबत व राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

राज्य राखीव पोलीस बल वर्धापन दिनानिमित्त निशान सलामी देण्यात आली. त्याचप्रमाणे शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. विविध पुरस्काराचे वितरण देखील या कार्यक्रमात करण्यात आले. महासमादेशक विक्रम साळी वैद्यकीय अधिकारी रमेश कुटे, पोलीस निरीक्षक गणपती खलूली, प्रशांत गायकवाड आणि अनिल पवार यांना सन्मानित करण्यात आले. परेड संचलन प्रशांत गायकवाड यांनी केले. श्रद्धा कुलकर्णी आणि किरण स्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. किशन एरमोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००

उपलब्ध पाण्याचे नियोजन करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. ०९ (जिमाका) : यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र स्वरुपाचा असेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा. नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना पाणी टंचाई जाणवू नये याची दक्षता घेवून धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य ते नियोजन जलसंपदा विभागाने करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात विविध प्रकल्पांचे बांधकाम सुरु आहे तसेच व्यवस्थापनाच्या अनुषंगाने ही बैठक झाली. सध्या जरी पाणी टंचाई जाणवत नसली तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी पूरनियंत्रण काम तसेच कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापन उत्तर व दक्षिणचा आढावा त्याचबरोबर दूधगंगा, वारणा, धामणी, सर्फनाला, नागणवाडी, घटप्रभा आदी ठिकाणी सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.

यावेळी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, एस.आर. पाटील, डी.डी. शिंदे, स्मिता माने आदी उपस्थित होते.

०००

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गतची कामे दर्जेदार करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. ०९ (जिमाका): सध्या जिल्ह्यात विविध विभागांमार्फत विकासकामे सुरु असून ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड नको असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर अंतर्गत शहरात व जिल्ह्यात विविध विभागांकडे सुरु असलेल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला.

मार्च २०२६ पर्यंत सुरु असलेल्या इमारती पुर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने कार्यरत रहावे. मात्र हे करताना गुणवत्तेकडे दुर्लक्ष करु नये. सर्व विभागांनी आपआपसात समन्य ठेवावा. जिल्ह्यातील कामांची संपूर्ण राज्याने दखल घ्यावी, असे आदर्शवत काम व्हावे अशी अपेक्षा त्यांनी बैठकीत व्यक्त केली.

यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे, प्रादेशिक मनोरुग्ण रुग्णालय, सांगाव (कागल) येथील वैद्यकीय महाविद्यालय, श्री क्षेत्र आदमापूर येथील विकास आराखडा, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय इमारत देखभाल व दुरुस्ती त्याचबरोबर शेंडा पार्क येथे उभारण्यात येणारी वैद्यकीय महाविद्यालय इमारत, वसतीगृह, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, शेंडा पार्क येथे उभारण्यात येणारी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तसेच सारथीची इमारत आदींचा आढावा घेतला.

लवकरच बाळूमामाच्या यात्रेला सुरुवात होत असून भाविकांची गैरसोय होवू नये याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता तुषार बुरुड, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, बी. एल हजारे, सी. ए. आयरेकर, महेश कांजर, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, इफ्तेकार मुल्ला, बाळुमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, आदमापूरचे सरपंच विजय गुरव आदी उपस्थित होते.

०००

 

 

स्वच्छ व सुरक्षित कुंभ यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा – मंत्री गिरीश महाजन

  • सर्व यंत्रणांनी कालबद्ध व काटेकोर नियोजन करावे
  • आवश्यक प्रस्तावित कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार

नाशिक, दि. ०९ (जिमाका):  नाशिकला धार्मिक महात्म्य असून जिल्ह्यात २०२७ साली नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. हा कुंभमेळा अधिक स्वच्छ व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांसह लोकसहभाग अधिक महत्त्वाचा आहे,  असे आवाहन जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज कुंभमेळा २०२७ संदर्भात आढावा बैठकीत मंत्री महाजन बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, प्रदीप चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. श्रेया देवचक्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा सुरक्षित व स्वच्छ होण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी नागरिकांना या कामात सहभागी केले पाहिजे. प्रशासनाकडून राबविलेल्या उपक्रमांमध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने कसे सहभागी होतील यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रथम टप्प्यातील जी कामे होण्यास दोन वर्षे लागणार आहेत अशा कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. कालावधी कमी असल्यामुळे कामे जलदगतीने पूर्ण करण्यासह कामे उत्तम दर्जाची होतील याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे. यासाठी कालबद्ध व काटेकोर नियोजन सर्व यंत्रणांनी करावे, असे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले.

सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी ऐन पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकासांठी वाहनतळ व्यवस्था ही शहराच्या नजीक असावी व चिखलामुळे वाहने फसणार नाहीत यासाठी शाश्वत उपाययोजना करण्यासह वाहनतळासाठी स्थळे निश्चित करावी. देशभरातील भाविक येथे येणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळे अधिक विकसित होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येकी 5 किंवा त्यापेक्षा अधिक हेलिपॅड तयार करणे व त्या ठिकाणी वाहन व्यवस्था उभारणीसाठी नियोजन करावे. प्रयागराजच्या तुलनेत नाशिक शहरात रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त या ठिकाणी जागा मर्यादित आहे. मागील कुंभमेळाच्या तुलनेत यावेळी भाविकांची गर्दी जास्त अपेक्षित असल्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री महाजन यांनी दिल्या. येणाऱ्या काळात सिंहस्थ कुंभमेळासाठी साप्ताहिक बैठक घेतली जाणार असून सूक्ष्म नियोजनासह सर्व यंत्रणांच्या सहभागातून कुंभमेळा अधिक सुंदर व यशस्वी करू, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी त्र्यंबकेश्वरे येथील तर महानगरपालिका आयुक्त खत्री यांनी नाशिक शहरासाठीचा सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याचे सादरीकरण करत तातडीने सुरू करावयाच्या कामांची माहिती दिली.

रामकुंड परिसराची पाहणी

तत्पूर्वी मंत्रीमहाजन यांनी रामकुंड परिसर, रामकालपथ, नारोशंकरचे मंदिर, काळाराम मंदिर, सीता गुंफा, निळकंठेश्वर महादेव मंदिर, कपिला – गोदावरी संगम, तपोवन, नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, स्वीय सचिव जयराज कारभारी, महानगरपालिकेचे शहर अभियंता राजेश अग्रवाल, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्यासह उर्जा, महावितरण व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी महानगरपालिका आयुक्त खत्री यांनी महानगरपालिकेतर्फे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती मंत्री महाजन यांना दिली.

०००

वसईत आजपासून बोहाडा आदिवासी गीत नृत्य महोत्सव

मुंबई, दि. ०९ : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची व परंपरेची ओळख होण्यासाठी कोकणातील प्रसिद्ध कोळी गीत नृत्य परंपरा माहिती व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार आणि अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 बोहाडा आदिवासी गीत नृत्य महोत्सवाचे आजपासून आयोजन करण्यात आले आहे. दि. 11 मार्च पर्यंत हा महोत्सव असेल. सायं. 6.30 वा. श्री. अनंतराव ठाकूर नाट्यगृह देशपांडे वाडा, पारनाका, वसई (प.). येथे हा महोत्सव होईल.

महोत्सवात 9 रोजी आई जगदंबा ग्रुप ढोल नाच, घोसाळी, हिरवा देव मोरघा ग्रुप, वनवासी, गावदेवी तारपा नृत्य, घोडीचापाडा यांचे सादरीकरण होईल.

तर सोमवार 10 मार्च 2025 रोजी आदिवासी बोहाडा नंदी नृत्य, घोसाळी, आदिवासी जगदंबा माता बोहाडा, घिवंडा व आदिवासी कंणसरी तारपा नृत्य खांड, नालीपाडा या पथकाचे सादरीकरण होणार आहे. या महोत्सवाचा समरोप मंगळवार 11 मार्च 2025 रोजी होणार असून या महोत्सवात जय आदिवासी तूर नाच, डोलारी बुद्रुक, हिरवा देव ढोलनाच, वांगणपाडा, आदिवासी तारपा नृत्य, मोडध्याचापाडा यांच्या कला सादरीकरणाने होईल.

बोहाडा हा आदिवासी गीत नृत्य महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य आहे. रसिक, प्रेक्षकांनी याचा आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

०००

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उद्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर

  •  अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

 मुंबई, दि. ०९: उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार हे उद्या १० रोजी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा ११ वा अर्थसंकल्प असणार आहे.

उपमुख्यमंत्री पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. विकासयोजनांना निधी उपलब्ध करुन देण्यात तसेच पायाभूत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवण्यात ते सातत्याने यशस्वी ठरले आहेत. कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे.

शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 2021 चा अर्थसंकल्प 8 मार्च जागतिक महिला दिनी जाहीर करताना त्यांनी तो राज्यातील महिला शक्तीला समर्पित केला होता. 2022 चा अर्थसंकल्प स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीदिनी 11 मार्च रोजी सादर केला होता. तो छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग, समर्पण, स्वराज्यनिष्ठेला समर्पित होता. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा आहेत.

अजित पवार विक्रमाच्या वाटेवर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या त्यांचा ११ वा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर ते शेषराव वानखेडे (१३ वेळा) यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक (११) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील.

जयंत पाटील (१० वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (९ वेळा) अर्थसंकल्प सादर केला आहे.

(आतापर्यंत विधानसभेत अर्थसंकल्प सादर केलेल्या मंत्र्यांची यादी)

https://mahasamvad.in/wp-content/uploads/2025/03/अर्थसंकल्प-मांडणारे-मंत्री.pdf

०००

आयआयएम नागपूरची नेट झिरोकडे वाटचाल होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ९ : भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूर मध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे या संस्थेसाठी लागणारी ऊर्जा निर्मितीची गरज पूर्ण होऊन संस्थेची नेट झिरो उद्दिष्टाकडे वाटचाल होणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. वर्ष २०३० पर्यंत राज्यात एकूण ऊर्जा निर्मितीपैकी ५२ टक्के ऊर्जा अपारंपरिक स्त्रोतांपासून निर्माण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

येथील मिहान परिसरात स्थित आयआयएममध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण झाले, यावेळी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देखमुख, राज्य शासनाच्या विद्युत पारेषण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, आयआयएमचे संचालक डॉ. भिमराय मैत्री आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी ऊर्जा संक्रमणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक व नैसर्गिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मितीचे कार्य देशात सुरु आहे. आयआयएम नागपूरनेही यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. या प्रकल्पाची पायाभरणी  होत असतांना ‘नेट झिरो अर्थात आपली ऊर्जा गरज आपली भागवणे’ त्यातही अपारंपरिक ऊर्जा निर्मितीद्वारे स्वत:ची ऊर्जा गरज भागविण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. यात कमीत कमी वा शून्य कार्बन उत्सर्जन हे पण उद्दीष्ट असते.

राज्य शासनानेही ऊर्जा संक्रमणाचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. राज्य शासन अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. वर्ष २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के ऊर्जा निर्मिती ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून करण्याचे उद्दिष्ट आहे आणि ते पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आयआयएम परिसरातील गोल्फ अकॅडमीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ.आशिष देशमुख, आयआयएमचे संचालक डॉ. भिमराय मैत्री आदी उपस्थित होते. गोल्फ अकॅडमीद्वारे या संस्थेचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा झाला असल्याच्या भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

०००

मीडिया मॉनिटरिंगविषयक शासन निर्णयाबाबत महाराष्ट्र शासनाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. ०९: महाराष्ट्र शासनाने आज मीडिया मॉनिटरिंगविषयक निर्गमित शासन निर्णयाबाबत सविस्तर स्पष्टीकरण देत मुंबई प्रेस क्लबने व्यक्त केलेल्या शंकांचे निरसन केले आहे. या उपक्रमाचा उद्देश माध्यमांवर देखरेख ठेवणे किंवा टीकेला आळा घालणे नसून, चुकीच्या माहितीचे विश्लेषण करून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे हा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

देखरेख नव्हे, तथ्य तपासणी:

हा उपक्रम केवळ प्रसिद्ध झालेल्या माहितीमधील तथ्यांची पडताळणी करेल. पत्रकार किंवा वृत्तसंस्थांवर कोणतीही देखरेख ठेवली जाणार नाही. सार्वजनिक हितासाठी चुकीच्या माहितीचे निराकरण केले जाईल.

वस्तुनिष्ठ विश्लेषण

‘नकारात्मक’ वृत्तांत म्हणजे केवळ चुकीची, दिशाभूल करणारी किंवा जाणीवपूर्वक विकृत केलेली माहिती, असे यात अभिप्रेत आहे. तथ्यांवर आधारित रचनात्मक टीका कधीही नकारात्मक म्हणून वर्गीकृत केली जाणार नाही. स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित ही वर्गीकरण प्रणाली आहे. तसेच माध्यमांमधून प्रसिद्ध झालेली वस्तुनिष्ठ माहिती, तथ्यांवर आधारित रचनात्मक टीका, शासनापर्यंत पोहोचवण्यासाठीही याद्वारे पूर्वीप्रमाणेच कामकाज करण्यात येईल.

शासनाची भूमिका

* नागरिकांना अचूक माहिती पुरवणे हे शासनाचे कर्तव्य

* चुकीच्या माहितीचे वेळीच निराकरण करण्यासाठी यंत्रणा

* घटनात्मक मर्यादांचे पालन करणारी कार्यपद्धती

पारदर्शकता आणि संवाद

* केंद्राच्या कार्यपद्धतीनुसार संपूर्ण पारदर्शकता

* निष्कर्षांची सार्वजनिक उपलब्धता

* माध्यम संस्थांशी सकारात्मक संवादाची तयारी

नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांबाबत आमची बांधिलकी अढळ आहे. चुकीच्या माहितीमुळे सार्वजनिक समज दूषित होऊ नये यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील, असे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन माध्यम संस्थांशी संवाद साधून या उपक्रमात आवश्यक त्या गुणात्मक सुधारणा करण्यास तयार आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना शासकीय योजना व कार्यक्रमांबाबत अचूक माहिती मिळण्यास मदत होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

०००

‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेसाठी ए.टी.ई.चंद्रा फाउंडेशनसोबत सामंजस्य करार

मुंबई. दि. ०९ : राज्यात ‘जलयुक्त शिवार योजना २’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणांमधील पाणीसाठा वाढण्यासोबतच शेतीची सुपिकता वाढण्यासही मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. या योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फाउंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभागात मंत्रालयात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनच्या अमित चंद्रा यांना पत्र लिहून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेमध्ये सक्रीयपणे सहकार्य करण्याविषयी विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीस मान देऊन ए.टी.ई.चंद्रा फाउंडेशनने या योजनेसाठी हा सामंजस्य करार केला आहे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही मुख्यमंत्री फडणवीस यांची एक महत्वाकांक्षी योजना असून या योजनेमध्ये ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशन सक्रीय सहभागी होणार असल्यामुळे राज्यातील पाण्याची उपलब्धता वाढवण्यासोबतच जमिनीची सुपिकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही चांगली वाढ होण्यात मदत होणार आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मृद व जलसंधारण विभागाने फाउंडेशनला सर्वते सहकार्य करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागाला दिल्या आहेत.

या सामंजस्य करारानुसार या योजनेसाठी ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशन तांत्रिक सहाय्यासह, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्वरुपात मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. फाउंडेशनच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने योजनेतील कामांच्या डेटाचे संकलन आणि नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच फाउंडेशनमार्फत स्वयंसेवी संस्थांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवीनी ग्रामीण ॲप संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना हा राज्यातील जलसंधारण प्रकल्प आहे. यामध्ये धरणे व तलाव गाळमुक्त करुन तो गाळ शेत जमिनीमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे जलसाठ्यामध्ये वाढ होते आणि जमिनीची सुपिकताही वाढते. गेल्या दोन वर्षात राज्यात दीड हजारपेक्षा जास्त जलस्त्रोतातून सुमारे साडेचार कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून सुमारे चाळीस हजार शेतकऱ्यांनी हा गाळ वाहून नेला आहे.

राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सुमारे ९ कोटी घनमीटर गाळ उपसण्याची क्षमता असून १.८ लाखांहून अधिक शेतकरी गाळ वाहून नेणार आहेत. हे काम सध्या वेगाने सुरू आहे. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही एक अभिनव योजना असून फिलॅन्ट्रॉपीक संस्था, शासकीय विभाग आणि स्थानिक समुदाय यांना एकत्र आणते, हा एक मोठा सहभागात्मक उपक्रम आहे.

या सामंजस्य करारावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, उपसचिव हरीभाऊ गीते, अवर सचिव प्रकाश पाटील यांच्यासह ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशनचे गायत्री नायर लोबो, अमृता के आदी उपस्थित होते.

०००

पतंजली प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल
  • पतंजली व राज्य शासन या प्रकल्पात आधुनिक नर्सरी उभारेल

नागपूर, दि. ०९ :  पतंजली फुड व हर्बल पार्कच्या माध्यमातून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करून तो बाजारपेठेत जाणार आहे. संत्र्याची ग्रेडींग, साठवणही येथे होणार असून हा प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. या प्रकल्पास राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून पतंजली व राज्य शासन संयुक्तपणे सर्व सोयींनी सज्ज अशी नर्सरी येथे उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

येथील मिहान प‍रिसरात स्थित पतंजली फुड आणि हर्बल पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. योगगुरु स्वामी रामदेव बाबा, पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री डॉ. आशिष देशमुख, समीर मेघे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ९ वर्षांपूर्वी मिहानमध्ये पतंजलीने पाया रचला. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या तरीही न डगमगता त्यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. पतंजली उद्योग समुहाला नागपुरात मिहानमध्ये आमंत्रित केले, त्याचवेळी विविध राज्यातून या समुहाला त्या-त्या राज्यांमध्ये उद्योग उभारण्यास बोलावण्यात येऊ लागले. मात्र, मिहानमध्येच हा प्रकल्प उभारण्याचा संकल्प घेऊन व राज्य शासनाच्या रितसर निविदा प्रक्रियेचा अवलंब करुन आज हा प्रकल्प उभा राहिला.

या प्रकल्पासाठी आवश्यक माल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून पुरविला जाईल. यामुळे शेतकऱ्यांचा मालही विकला जाईल. या प्रकल्पात संत्र्यावर प्रक्रिया केली जाईल. तसेच संत्रा साठवणुकीसाठी अत्याधुनिक शीतगृहेही येथे उपलब्ध आहेत. याचा फायदाही शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. याठिकाणी संत्र्यासाठी आवश्यक असणाऱ्या दर्जेदार कलमे तयार करण्याकरिता पतंजली आणि राज्य शासन संयुक्तपणे सर्व सुविधांनीयुक्त आधुनिक नर्सरी उभारेल, असेही त्यांनी सांगितले.

पतंजली प्रकल्पामुळे रोजगार व संत्र्याला बाजारपेठ – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

पतंजलीच्या मिहानस्थित फुड आणि हर्बल प्रकल्पासाठी दिवसाला जवळपास ८०० टन संत्र्यांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला आपसुकच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. या प्रकल्पास शेतकऱ्याचे पूर्ण सहकार्य लाभेल व लिंबुवर्गीय फळांचा पुरवठाही करण्यात येईल. या प्रकल्पाद्वारे शेतकरी समृद्ध होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. उत्तम संत्रा बीज आणि कलम निर्मितीसाठी आधुनिक नर्सरी उभारण्याची मागणी त्यांनी यावेळी राज्य शासनाकडे केली.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पतंजली फुड आणि हर्बल पार्कच्या कोनशिलेचे अनावरण आणि प्रकल्पाचे विधीवत उद्घाटन झाले.

०००

              

ताज्या बातम्या

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली पुरंदर तालुक्यातील पालखीतळांची पाहणी

0
पुणे, दि. ७: ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील पालखीतळ आणि पालखी विसाव्यांची पाहणी केली. पालखीतळांवर...

आदर्श जीवनशैलीतून मधुमेह टाळता येणे शक्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. ७:  पारंपारिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणून कमी वयात विविध आजार बळावत आहेत. आदर्श...

 प्रत्येक व्यक्तीला निरोगी आयुष्य जगण्यासाठी “अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान” या संकल्पनेला पुढे नेण्याची गरज -अन्न...

0
मुंबई,दि.७ :  प्रत्येक व्यक्तीला निरोगी  आयुष्य जगण्यासाठी चांगल्या आहाराची आवश्यकता असते.सुरक्षित अन्न व औषध प्रत्येक व्यक्तीला मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने "अन्न सुरक्षा:...

शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा...

0
मुंबई, दि. ७ :- राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्काची परतफेड, निर्वाह भत्ता यांसारख्या योजना प्रभावीपणे पोहोचण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी म्हणून प्राध्यापकांकडे...

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि. ७ :  महिला सक्षमीकरणात शिक्षण हा अत्यंत मोलाचा घटक असून यासाठी मुलींना प्रोत्साहित करणाऱ्या अनेक योजना राज्य शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीएलच्या...