शनिवार, जून 7, 2025
Home Blog Page 205

राज्यात खाणपट्टे लिलाव प्रक्रियेला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, दि. 8 :- राज्यातील जे खाणपट्टे लिलावात गेलेले आहेत, ते त्वरित सुरु झाले पाहिजेत. ज्या संबंधित शासकीय यंत्रणा आहेत त्यांनी यासाठी तत्काळ कार्यवाही करावी. नवीन खाणपट्टे मंजुरी प्रक्रियेत ‘गती शक्ती’ प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करावा. राज्यातील खाणपट्टे कार्यान्वित करण्यासाठी लिलाव प्रक्रियेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील प्रमुख खनिजांच्या 40 खाणपट्ट्यांच्या कार्यान्वयनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांना विविध परवानग्यांसाठी लागणारा वेळ कमीत कमी असावा, यामुळे उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रक्रियेत वेग येईल आणि शासनाला महसूल वाढीस मदत होईल. खनिकर्म विभागातील कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. राज्यातील खनिकर्म क्षेत्रातील उद्योजकांनी दिलेल्या सूचनांवर विचार करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. खनिकर्म विभागासाठी पर्यावरण, महसूल, भूसंपादन व वन विभागातील प्रलंबित कामे तातडीने करावी. ही कामे गतीने होण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात. तसेच सगळ्या विभागाचा एक शासन निर्णय काढून विभागाची जबाबदारी निश्चित करावी.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी खाणपट्ट्यांशी संबंधित सुनावण्या तातडीने पूर्ण कराव्यात आणि नियमांची पूर्तता करणाऱ्या उद्योगांना मुदतवाढ देण्यात यावी असे सांगितले. खनिकर्म विभाग, राज्य खनिकर्म महामंडळ आणि केंद्र-राज्य समन्वय आवश्यक आहे. खनिजनिहाय खाणपट्ट्यांचा आढावा घेऊन सुरू, बंद आणि लिलावयोग्य खाणपट्ट्यांवर कार्यवाही करावी. राज्यातील खनिज अन्वेषण वाढवून जास्तीत जास्त खाणपट्टे लिलावासाठी खुले करावेत. तसेच, एकात्मिक खाणपट्टा व्यवस्थापन संगणकीय प्रणाली 2.0 लागू करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

राज्य खनिकर्म महामंडळ व खनिकर्म विभाग, खनिकर्म विभागांतर्गत हाताळण्यात येणारे विषय, खनिजक्षेत्राची ई-लिलाव प्रक्रिया आदींबाबत सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस खनिकर्म विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.इकबाल सिंह चहल, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव राजेशकुमार, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मुंबई, दि. 8 : महिलांच्या सुरक्षेसाठी शासन कडक कायदे करत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच समाजात महिलांप्रति असलेली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. महिलांच्या तक्रारींचे तातडीने निरसन करण्यात येत आहे. समाजमाध्यमांवर मॉर्फिंग आणि डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन ठोस उपाययोजना करीत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जागतिक महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांसोबत साधलेल्या संवादादरम्यान दिली.

जागतिक महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला पत्रकारांना शुभेच्छा देऊन सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधताना महिलांच्या सशक्तीकरणासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे मांडले. महिलांना विविध क्षेत्रांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणी, त्यांच्या सुरक्षेचे मुद्दे आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठीच्या सरकारी उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  यावेळी केले. राज्यमंत्री पंकज भोयरसुद्धा यावेळी उपस्थित होते.

महिला आणि माध्यम क्षेत्रातील आव्हाने

मुख्यमंत्र्यांनी माध्यम क्षेत्रातील महिलांसमोरच्या आव्हानांवर भाष्य करताना सांगितले की, “महिलांना मल्टीटास्किंग करत अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. माध्यम क्षेत्रातील महिलांना तर 24 तास दक्ष राहावे लागते. व्यवसाय, घर आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना प्रत्येक टप्प्यावर अनेक संघर्ष करावे लागतात.

महिला उद्योजकतेला चालना

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध क्लस्टर्समध्ये महिला उद्योजकांसाठी खास संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच, मायक्रोसॉफ्टच्या सहकार्याने 10 हजार महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचे अभियान हाती घेतले आहे.

भविष्यातील नोकऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित असतील आणि महिलांनी त्यात आघाडीवर राहावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मीडिया मॉनिटरिंग

मॉनिटरिंगचा अर्थ असा आहे की, एक सिस्टम आम्ही उभी करतो ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या बातम्या आहेत, त्याचे विभागीकरण होणार आहे. त्यातल्या ज्या बातम्या नकारात्मक असतील त्याचे जे खरे उत्तर आहे किंवा त्याच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या ज्यांनी अशा बातम्या दिल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंगचे प्रयोजन आहे. माध्यमांवरील तो अंकुश अजिबात नाही.

महिला अधिकाऱ्यांचे कौतुक

प्रशासनात काम करणाऱ्या महिला अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत असून या या कामात त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. राज्याच्या मुख्य सचिवांपासून प्रशासनातील विविध विभागांत महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी आहेत.

महिला सुरक्षिततेसाठी सार्वजनिक सुविधा

महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 50 किमी अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, त्यांचे दीर्घकालीन व्यवस्थापन आणि देखभाल करण्यासाठी ठोस योजना आखण्यात आली आहे.

लैंगिक समानता

शालेय जीवनापासून लैंगिक समानता (जेंडर इक्वलिटी) बिंबवली पाहिजे. स्त्रियांचा आदर करणे, सन्मान करणे या बाबी लहान वयातच रुजवल्या पाहिजेत. ही जबाबदारी त्यांची शाळा, परिवार आणि समाजाचीदेखील आहे.

स्त्रियांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिकार

सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीला तिच्या विचारांना मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मात्र, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना सातत्याने ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. हे दुर्भाग्य आहे. तरीही काही स्त्रिया आपल्या मतांवर ठाम राहतात आणि त्याचा सामना करतात.

लव्ह जिहादविरोधात कठोर भूमिका

लव्ह जिहाद प्रकरणावर मुख्यमंत्री म्हणाले की, “सुरुवातीला अशा घटना एक-दोन अपवाद म्हणून वाटत होत्या, पण तपासानंतर लक्षात आले की हा मोठ्या प्रमाणावर चाललेला प्रकार आहे. अनेक मुली फसवल्या जात असून, त्यावर कठोर कारवाई आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांची विशेष समिती तयार केली असून, त्यांना या प्रकरणांचे सखोल विश्लेषण करण्याचे निर्देश दिले आहेत.

अनेकांना माझ्या राजकीय वारसदारांची चिंता असते, पण मी माझ्या घराण्यातला शेवटचा राजकारणी असेन, असे त्यांनी स्पष्ट केले.

माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, संचालक किशोर गांगुर्डे आणि संचालक दयानंद कांबळे यावेळी उपस्थित होते.

भक्ती शक्तीच्या मिलापातून सश्रद्ध, समतायुक्त समाज निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 8:- भक्ती व शक्तीच्या मिलापातून सश्रद्ध, समतायुक्त समाज निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करून भक्ती शक्ती व्यासपीठाला राज्य सरकारकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सकाळ माध्यम समूहाच्यावतीने श्री गुरु पादुका दर्शनासाठी एनएससीआय डोम,वरळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सकाळ माध्यम समूहाचे अभिजीत पवार, जीवन मिशनचे प्रल्हाददादा पै उपस्थित होते.

भक्ती शक्ती व्यासपीठाने आयोजित केलेल्या या उपक्रमात सूक्ष्म रूपाने  पादुकांच्या रुपात उपस्थित असलेल्या गुरु शक्तीला वंदन करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या उपक्रमातून सकारात्मक ऊर्जा, भक्ती आणि अध्यात्माचा संदेश  आपल्या जीवनात घेऊन जाण्याचा प्रत्येकजण संकल्प करूया.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,भक्ती आणि अध्यात्माचा अनोखा संगम साधणारा हा पादुका महोत्सव आहे. या महोत्सवात 21 पवित्र पादुकांचे आगमन झाले आहे. या पादुका त्या महान गुरुजनांच्या होत्या, ज्यांनी समाजाला दिशा, विचार आणि जीवनमूल्य दिली.  हा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असून प्रत्येकाने समाजाच्या कल्याणासाठी  आपापल्या परीने योगदान द्यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.

पादुकांचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  प्रभू श्रीराम आणि भरत यांचे उदाहरण दिले. पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर जणू काही गुरुमहाराजांचेच दर्शन आपल्याला झाले आहे अशा प्रकारची अनुभूती आपल्याला येत असते आणि म्हणूनच आपल्या समाजामध्ये पादुकांचे महत्त्व मोठं असल्याचे ते म्हणाले.

भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल सकाळ समूहाचे अभिजीत पवार यांचे मुख्यमंत्री महोदयांनी अभिनंदन केले. यावेळी सकाळ माध्यम समूहाचे अभिजीत पवार व जीवन मिशनचे प्रल्हाददादा पै यांनी मनोगत व्यक्त केले.

तद्नंतर मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी भक्ती शक्ती महोत्सवात आलेल्या 21 पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण

मुंबई दि 8 –  केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्याच्या योजनांमुळे बचत गटाच्या माध्यमातून महिला उद्यमशील बनत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय समारोप व कन्यारत्न यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले होते त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विभागाचे आयुक्त नयना गुंडे,  एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्य आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले की, कुटुंबासह देशाच्या विकासासाठी महिलांचे योगदान  महत्त्वाचे आहे. आज सन्मानित करण्यात आलेल्या महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत. प्रधानमंत्री यांच्या निर्णयानुसार संरक्षण विभागाच्या तिन्ही दलांमध्ये महिलांना काम करण्याची संधी दिली आहे आणि तिथेही त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.

विकसित भारतासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. 2029 पर्यंत राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे महाराष्ट्र हे ‘महिला राज्य’ होणार आहे.  2047 मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करताना महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरणार आहे.

सामाजिक बंधनातून खडतर प्रवास करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली केली, विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि महिलांसाठी केशवपन प्रथा बंद केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उत्तम प्रशासक होत्या. छत्रपती शिवाजी महाराज घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ होत्या अशा शक्तिरुपी स्त्रियांचा विचार आणि आदर्श घेऊन काम केल्यास प्रगती साध्य करता येईल.

लोकसंख्येत ५० टक्के महिला असून,  महिलांना केंद्रस्थानी ठेवून मानव संसाधन विकसित केल्यास देश विकसित होईल हे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ओळखले आणि म्हणूनच ‘लेक लाडकी’ ते ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘लखपती दीदी पर्यंत योजना सुरू करून त्या प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील बालविवाह बंद झाले आहेत आणि लिंगभेदाचे, भ्रूणहत्येचे प्रमाण कमी झाले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांनी सुरू केलेल्या क्रेडिट सोसायटीचा विस्तार वाढवून उद्योगात आपले अस्तित्व मजबूत करायचे आहे असे सांगून मुख्यमंत्री यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिलांचा प्रशासकीय सहभाग वाढविण्यासाठी विशेष ग्रामसभा

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. मुलींचा जन्मदर वाढावा तसेच महिलांच्या शिक्षणातून त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. ही योजना यशस्वीपणे राबविण्यात महाराष्ट्र हे अव्वल राज्य ठरले आहे, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांचा प्रशासकीय सहभाग वाढविण्यासाठी महिला दिनानिमित्त आज राज्यभर विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या असून, यापुढेही त्याचे आयोजन करण्यात येईल. उच्च शिक्षणात मुलींची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने विभाग काम करीत असून, शिक्षण क्षेत्रात मुलींची संख्या वाढविण्यात राज्य आघाडीवर असेल, असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला. आरोग्य, उद्योग, आर्थिक , सामाजिक क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लाडक्या बहिणीसाठी राज्यस्तरीय क्रेडिट संस्था स्थापणार

महिलांचे शिक्षण व समाजातील स्थान सुधारणे यासाठी ‘लेक लाडकी’, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ यासारख्या सक्षमीकरणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी सांगितले. नागपूरच्या लाडक्या बहिणींनी नागपूर महिला सन्मान क्रेडिट सोसायटी सुरू केली, ज्याच्या माध्यमातून या महिला उद्योग सुरू करीत आहेत आणि इतर महिलांनाही सहकार्य करीत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या साहाय्याने राज्यस्तरीय क्रेडिट सोसायटी स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या ‘रूपे कार्ड’चे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले ‘रूपे कार्ड’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट एक्सेस त्यात उपलब्ध आहे. याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि इन्शुरन्ससुद्धा मिळणार आहे. तसेच पेमेंट करण्यासाठी क्यूआर कोडही देण्यात आला आहे. या कार्डचे यावेळी अनावरण करण्यात आले. देशात ‘रूपे कार्ड’ देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.

राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव यांचा सन्मान

राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती केया हाटकर यांना कला व साहित्यसाठी, विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व केलेली प्रियंका इंगळे, राज्यातील पहिल्या महिला फायटर पायलट अंतरा मेहता, पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला अपूर्वा अलाटकर, डिझेल इंजिन चालवणारी पहिली महिला मुमताज काझी, महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडल्जी , पत्रकारिता क्षेत्रासाठी रूपाली बडवे,  70 वर्षीय सोशल मीडिया स्टार सुमन धामणे, नागपूरमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लभार्थ्यांनी एकत्र येऊन  महिला सन्मान क्रेडिट सोसायटी स्थापन केली. सोसायटीच्या अध्यक्ष संगीता चव्हाण, उपाध्यक्ष सचीता सोनी या महिला रत्नांचा  यावेळी सत्कार करण्यात आला.

‘पालकमंत्री कक्षा’ मुळे जनतेचे प्रश्न जलद गतीने सुटतील – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी दिनांक 8 (जिमाका) :- सामान्य जनतेची प्रशासनाकडे अनेक कामे प्रलंबित असतात. सामान्य नागरिक जिल्हा मुख्यालयात कामानिमित्त आल्यावर त्याचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविण्यासाठी ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आलेली आहे. जनतेची कामे अधिक गतीमान पद्धतीने व्हावीत हा या पालकमंत्री कक्ष स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे.  हा कक्ष प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करणार असून या कक्षामुळे जनतेचे प्रश्न जलद गतीने सुटणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये ‘पालकमंत्री कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरातील कार्यालयांमध्ये सामान्य जनतेची अनेक कामे असतात. या कक्षाच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारी आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पालकमंत्री म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस या कक्षामध्ये उपलब्ध राहणार असून त्याबाबत जनतेला वेळोवेळी कळविण्यात येणार आहे. जेणेकरुन नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्याकडे  येतील आणि त्यांची प्रलंबित कामे मी पूर्ण करुन देईन. नागरिकांची अनेक कामे राज्य शासनाकडे देखील प्रलंबित असू शकतात त्या कामांचा पाठपुरावा देखील या कक्षाच्या माध्यमातून घेतला जाईल. जनतेची कामे अधिक गतिमान पद्धतीने व्हावीत हा या पालकमंत्री कक्ष स्थापनेमागचा मुख्य उद्देश असल्याचेही ते म्हणाले .

एनसीपीए येथे रंगली बहुभाषिक काव्यसंध्या…

  • मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांच्या काव्य वाचनाने रसिक तृप्त

मुंबई, दि. ०७ : ‘अज्ज आखाँ वारिस शाह नूं, कितों कबरां विच्चों बोल’ या कवयित्री अमृता प्रीतम यांची ही कविता 1947 मध्ये झालेल्या फाळणीची प्रतिकात्मक रचना मानली जाते. फाळणीसारख्या हिंसाचाराचे बळी ठरलेल्या लोकांचा आवाज ही कविता (नज़्म) बनली, इतिहासाच्या एका महत्त्वाच्या क्षणी लिहिली गेली आणि स्वतःच इतिहासाचा एक भाग बनली. अशा अत्यंत लोकप्रिय कवितेने ‘चौराहा’ – एक बहुभाषिक काव्यसंध्ये’ ची सुरुवात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केली.

नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला स्त्रीशक्तीची क्षितीजे रुंदावणारा ‘चौराहा’ – एक बहुभाषिक काव्यसंध्या’ हा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात मुख्य सचिव सुजाता सौनिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी कविता सादर केल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी आपले अनुभव, विचार आणि संवेदना व्यक्त करणाऱ्या कविता सादर केल्या. वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिलांचे अनुभव शब्दांत गुंफताना समाजातील वास्तव, स्त्रीशक्तीचा उलगडा आणि पुढील वाटचाल यावर प्रकाश टाकण्यात आला. या काव्यवाचनाने श्रोत्यांना एक वेगळी आत्मनुभूती दिली.

मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी सागरी किनारी एनसीपीए येथे अत्यंत रम्य वातावरणात हा कार्यक्रम होत आहे आणि कार्यक्रमात कविता सादर करण्यासाठी आपल्याला बोलावलं याबद्दल आभार मानले.

कवितांमधून उमटले स्त्रीजीवनातील संघर्ष, स्वप्ने, आत्मनिर्भरता आणि समाजातील बदलांचे प्रतिबिंब

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, यांनी सादर केलेली अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव लिखित ‘टपाल’ या कवितेला सर्वांनी दाद दिली. आठवडी टपालने अहवाल पाठवा, बैठकीसाठी हवा आहे तात्काळ पाठवा, पाठविले तरी मिळाले नाही म्हणून पाठवा, बाबूनी हरविले आहे म्हणून पाठवा, मिळाले तरी सापडले नाही पुन्हा पाठवा, प्रपत्र भरून जोडले नाही पुन्हा पाठवा ऑनलाईन, फॅक्स पाठवा रजिस्ट्री पाठवा ई-मेल पाठवा, शिपाई पाठवा मेल किंवा फीमेल पाठवा,पाठवा पाठवा पाठवा पाठवा पाठवा, अहवाल पाठवा अहवाल पाठवा अहवाल पाठवा या कवितेने कार्यालयातील वातावरण रसिकांसमोर उभे केले.

कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी ‘अभिव्यक्ती’ ही कविता सादर केली. तसेच कठीण प्रसंगी अनुभवल्या जाणाऱ्या परिस्थितीशी अनुरूप कविताही सादर केल्या. ‘आयुष्य हे मुक्तपणे जगा’ ही कविता इंग्रजी भाषेत सादर केली.

मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी आधुनिक स्त्रीच्या संवेदना असलेल्या कवयित्री नीरजा यांची कविता सादर केली. सिंधूताई सपकाळ यांची ‘ किती बंडखोरी वसे आत माझ्या निघाले पुन्हा मी विरोधात माझ्या, जरा त्या सुखाची कमी कौतुके कर, कधी वेदनाही म्हणाव्यात माझ्या’ या कविता उपस्थितीतांची दाद मिळवून गेल्या.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी  धैर्यवान असलेल्या लडाखी महिलेची कविता सादर केली.

 

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी यांनी स्वरचित कविता सादर केल्या. मृत्यूविषयक कविताही त्यांनी सादर केली. क्षणभंगुर आज हूँ कल नहीं,शायद अगले पल नहीं,फिर भी कर्मों में बंधी,अपने धर्मों में धंसी,

जीवन को लेना चाहूँ समेट,अपनी बाहों में लपेट,मृत्यु को नकार कर,जीवन को पुकार कर,जीना चाहूँ अनेक वर्ष,

जीवन मृत्यु के खेल में,सुख-दुःख की रेलमपेल में,

मैं क्षणभंगुर! मैं क्षणभंगुर! कवितेने वातावरण भारावून गेले.

 

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची

सुनो द्रौपदी ! शस्त्र उठालो अब गोविंद आएंगे…

छोड़ो मेहंदी खड्ग संभालो, खुद ही अपना चीर बचा लो

द्यूत बिछाए बैठे शकुनि,.मस्तक सब बिक जाएंगे

सुनो द्रौपदी! शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे ही कविता सादर केली.

 

‘एनसीपीए’च्या पहिल्या महिला संचालक विजया मेहता यांनी २० वर्षांपूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात केली. या ऐतिहासिक साहित्य उपक्रमाची आज पुन्हा सुरुवात करण्यात आली. ‘चौराहा’ या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशासकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून साहित्य क्षेत्रातही योगदान दिले. त्यांच्या कवितांमधून स्त्रीजीवनातील संघर्ष, स्वप्ने, आत्मनिर्भरता आणि समाजातील बदलांचे प्रतिबिंब उमटले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एनसीपीएचे टेक्निकल मुख्य अधिकारी नयन काळे तसेच मंत्रालयातील अधिकारी व श्रोते कार्यक्रमाला उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाच्या लीना संखे, उपसचिव अजित कवडे यांनी आभार मानले.

०००

संध्या गरवारे/विसंअ

महाराष्ट्र राज्य लॉटरी मासिक व साप्ताहिक सोडत

मुंबई, दि. ०७ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. महाराष्ट्र सह्याद्री, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती विशेष, महाराष्ट्र गौरव, महाराष्ट्र तेजस्विनी व महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतीमध्ये ज्या तिकीट खरेदीदारांना बक्षीस जाहीर झाली आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रुपये दहा हजारावरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांच्या कार्यालयाकडे करावी, असे उपसंचालक (वित्त व लेख) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

महाराष्ट्र सहयाद्री या लॉटरीची सोडत ११ फेब्रुवारी २०२५ रोजी, महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती विशेष  लॉटरीची सोडत १५ फेब्रुवारी २०२५,  महाराष्ट्र गौरव लॉटरीची सोडत १९ फेब्रुवारी २०२५ रोजी, महाराष्ट्र तेजस्विनी लॉटरीची सोडत २१ फेब्रुवारी २०२५ रोजी तर महाराष्ट्र गजराज लॉटरीची सोडत २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता काढण्यात आल्या.

महाराष्ट्र सह्याद्री तिकीट क्रमांक MS-२५०२ D /४१३८९१ या सिद्धी समर्थ एजन्सी, दादर, मुंबई यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.११ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती तिकीट क्रमांक GS०१ / ७१९१ या प्रिंन्स लॉटरी सेंटर, कल्याण यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२२ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र तेजस्विनी तिकीट क्रमांक TJ-०८ / ५७०४ या कोमल एजन्सी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.२५ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. महाराष्ट्र गजराज तिकीट क्रमांक GJ००/४२०० या सिद्धी समर्थ एजन्सी, दादर, मुंबई यांच्याकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम रू.१४ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर झाले आहे. तसेच महाराष्ट्र सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाचे प्रथम क्रमांकाचे एकूण ९ बक्षिसे जाहीर झाली आहेत.  याशिवाय फेब्रुवारी २०२५ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून १४८५६ तिकीटांना रू. १,०७,०३,०००/- व साप्ताहिक सोडतीतून ५४,२६१ तिकीटांना रू. २,१७,४२,६००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत.

सर्व तिकीट खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम रूपये १० हजार वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाय, ए-वन,अतिरिक्त शॉप कम गोडाऊन, एपीएमसी मार्केट, सेक्टर -१९ बी, वाशी, नवी मुंबई या कार्यालयाकडे सादर करावी. दहा हजार रुपयांच्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असेही प्रसिद्धी पत्रकात उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

०००

गजानन पाटील/स.सं

चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ‘स्टॅचू ऑफ वुमन एम्पॉवरमेंट’ उभारावा – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दि. ०७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी येथील जन्मस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गुजरात मधील ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ प्रमाणे चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ‘स्टॅचू ऑफ वुमन एम्पॉवरमेंट’ पुतळा उभारण्याबाबत तसेच त्यांच्या प्रेरक जीवन कार्याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी, या दृष्टीने संग्रहालय बनविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी सांगितले.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज सभागृहात जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचे औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाचे उद्दीष्टे व महिला सक्षमीकरण संदर्भातील प्रस्ताव मांडला.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, आजची महिला स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजे, यादृष्टीने महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये माता भगिनी कर्तृत्वाची गरुडभरारी घेत आहेत, असे सांगून त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिलांसाठी प्रत्येक विभागाचे विशेष धोरण असणे गरजेचे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील प्रत्येक विभागाचे महिलांसाठी विशेष धोरण असले पाहिजे, जेणेकरून महिलांविषयीच्या कायद्यांची, नियमांची आणि त्यांच्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करता येईल, असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, 2030 ला शाश्वत विकास उद्दिष्टांबद्दल शासनाने जबाबदारी घेऊन 15 वर्ष होत आहेत. या जबाबदारीनुसार 2030 मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% महिला असतील असा हेतू ठरलेला आहे. केंद्राने आणि राज्यांनी आणलेल्या योजनांमुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला आहे. आज विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी प्रगती केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांची धार्मिक निष्ठाही मोठी होती. त्यांनी अनेक घाट बांधले, मंदिरांचा जिर्णोद्धार केला. अनेक लोककल्याणकारी कामे केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या या कार्यातून त्यांच्या समाजसेवेचा आणि धार्मिक कार्याचा वसा दिसून येतो. राज्यातील प्रजेला सुखी करणे हे पहिले कर्तव्य त्यांनी मानले होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शासकीय योजना स्त्रीच्या उन्नतीसाठी – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजची स्त्री ही जबाबदार असून तत्व, स्वत्व आणि महत्त्व कधीही सोडत नाही. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या डोक्यावरील घागर काढण्याचा उद्देश सफल झाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजना ह्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी आहेत. स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासन करीत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे यासाठी त्यांना शिक्षण गरजेचे आहे. शालेय जीवनापासूनच नैतिकतेचे आणि स्वरक्षणाचे धडे देण्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, सभागृहात महिलांची संख्या वाढणे गरजेचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यांनी देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा जिर्णोद्धार केला. त्याठिकाणी सोयी सुविधा उभारल्या, घाट बांधले.

या प्रस्तावावरील चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सदस्य सदस्य प्रज्ञा सातव, चित्रा वाघ, डॉ.मनिषा कायंदे, उमा खापरे, अमोल मिटकरी, भावना गवळी, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनीही विचार मांडले.

०००

संजय ओरके/विसंअ

महिला दिनानिमित्त अडीच कोटी लाडक्या बहिणींना मिळणार लाभ – मंत्री आदिती तटकरे 

  • विधानसभा इतर कामकाज
  • राज्यात महिला सशक्तीकरणाला गती
  • आईचे नाव प्रथम लावण्याचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई, दि. ०७ : राज्यात महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी विविध महत्त्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. महिला आज सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत असून, शिक्षण, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, सहकार, मनोरंजन, प्रशासन, अर्थकारण आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांत आपल्या क्षमतेला न्याय देत आहेत. महिला सशक्तीकरण हा केवळ चर्चेचा विषय न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने प्रभावी पावले उचलली असून महिला दिनानिमित्त अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ मिळणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रि शताब्दी जन्मवर्षानिमित्त विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव मांडला होता. यावर महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत उत्तर दिले.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना

राज्यातील माता-भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत अडीच कोटींहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे.

आईचे नाव प्रथम लावण्याचा ऐतिहासिक निर्णय

मे 2024 पासून जन्मलेल्या बालकांच्या नावाच्या आधी आईचे, नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आई आणि वडील हे समान आहेत, हा संदेश समाजात रुजवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

महिला विशेष ग्रामसभा

महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने यावर्षीपासून 8 मार्च रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक गावात महिला विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष ग्रामसभेत महिलांचे प्रश्न, स्थानिक विकास आणि विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.

महिलांसाठी आरोग्य आणि सुरक्षेच्या उपाययोजना

सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण

9 ते 14 वयोगटातील मुलींना ही लस मिळावी यासाठी 50 ते 55 लाख मुलींना लसीकरण करण्याचा प्रस्ताव आरोग्य व महिला आणि बाल विकास विभागाने तयार केला आहे. महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम राबवण्याचीही घोषणा करण्यात आली.

लाडक्या बहिणींसाठी आरोग्य तपासणी शिबिरे

अंगणवाडी सेविकांसाठी सुरू केलेल्या हेल्थ चेकअप कॅम्पच्या धर्तीवर महिलांसाठी परमनंट हेल्थ कार्ड आणि आरोग्य तपासणी शिबिरे राबवण्यात येणार आहेत.

महिलांसाठी महामार्गावर स्वच्छतागृहे

महिला प्रवाशांची सुरक्षितता आणि सुलभता लक्षात घेऊन महामार्गांवर दर 25 ते 50 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी शौचालये उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केला आहे.

महिलांसाठी रोजगार आणि निवास सुविधा

पिंक ई-रिक्षा योजना

पिंक ई-रिक्षा योजनेसाठी 4 ते 5 हजार अर्ज प्राप्त झाले असून, यंदाच्या वर्षात 10,000 महिलांना ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळणार आहे.

वर्किंग वुमन हॉस्टेल्स

सध्या राज्यात वर्किंग वुमन हॉस्टेल्स 74 कार्यरत असून, आणखी 50 नवीन हॉस्टेल मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महिला सशक्तीकरणासाठी ‘आदिशक्ती समिती’

प्रत्येक गावात महिला ग्रामपंचायत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती महिला आणि मुलींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करेल.

हे शासन महिला सशक्तीकरणासाठी पूर्णतः कटिबद्ध असून, महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी भविष्यातही महत्त्वपूर्ण निर्णय घेत राहील, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

 

०००

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा मंत्रालयातील दालनात प्रवेश

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई, दि. ०७: राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती. राज्यमंत्री पदाचा कार्यभार राज्यमंत्री नाईक यशस्वीरीत्या पार पाडतील, अशा शुभेच्छा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग, सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विभाग, पर्यटन, मृद व जलसंधारण या विभागाचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे.

मंत्रालयात  सातव्या मजल्यावर विस्तार इमारतीत दालन क्रमांक  ७२२, ८२२ अ, ७२४ या ठिकाणी त्यांचे दालन आहे.

०००

ताज्या बातम्या

व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ६ :- भारतीय संस्कृती आणि संत वाङ्मयाचे वैभव आपल्या लेखनातून, व्याख्यानातून दृग्गोचर करणारा व्यासंगी परंपरेचा एक मोठा दुवा निखळला आहे, अशा शोकभावना...

वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि. ६ :  संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक...

“पालखी सोहळ्याचे काटेकोर नियोजन; महिलावर्गाची विशेष काळजी घेणार” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
जळगाव, दि. ६ – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या...

बकरी ईद म्हणजे त्याग, प्रेम बंधुभावाचे प्रतीक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, ६ : बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आपल्या जीवनात शांतता, समृद्धी,...

‘ईद-उल-अज़हा’ तथा ‘बकरी ईद’ निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ०६ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना ‘ईद-उल-अज़हा’ अर्थात ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून, या पर्वाच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, सलोखा, सौहार्द...