बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 224

सर्वांगीण विकासातून राज्यातील अग्रगण्य जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख निर्माण करु- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर दि. २६: जिल्ह्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातून राज्यातील अग्रगण्य जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख निर्माण करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारताच्या ७६  व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजवंदन केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, भारतीय राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणे ही सर्वांच्यादृष्टीने अत्यंत अभिमानाची व प्रेरणादायी बाब आहे. ‘लोकांनी, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य’ हा लोकशाहीचा आत्मा जपतांना, आपल्या देशाची ७५ वर्षांची यशस्वी वाटचाल ही जगासमोर आदर्श लोकशाही व्यवस्थेचे उदाहरण ठरले आहे.

स्वातंत्र्यानंतर देशाने शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणांमध्ये केलेली प्रगती सर्वांना अभिमान वाटावा अशीच आहे.  राज्य घटनेतील समानता, आणि बंधूत्वाचे तत्व स्विकारतांना राज्याच्या विकासात समाजातील सर्व घटकांना सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

‘समृद्ध शेती आणि संपन्न शेतकरी’ हे उद्दिष्ट समोर ठेऊन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमधून शेतकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने स्मारक, नेवासा येथे संत ज्ञानेश्वर महाराज सृष्टी प्रकल्प, पर्यटन विकास, शैक्षणिक संस्थांना एकत्रित करत रोजगार निर्मिती यासह विकास आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे  प्रयत्न करण्यात येत आहेत. या विकासकामामध्ये सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात  पोलीस दलाचे पुरुष आणि महिला पोलीस, गृहरक्षक दल, वाहतूक पोलीस, बँड पथक, श्वान पथक, वज्रवाहन, सायबर सेल जनजागृती वाहन, क्षयरोग दुरीकरण वाहन, बालविवाहास प्रतिबंध जनजागृती वाहन तसेच न्यू आर्टस अँड कॉमर्स, सायन्य महाविद्यालय, त्रिमुर्ती पब्लीक स्कूल, नेवासा, आठरे पब्लिक स्कूल,  वर्का हायस्कुल, कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, दिवटेपाटील पब्लिक स्कूल, स्नेहालय स्कूल, मेहेर इंग्लिश स्कूल या शाळांच्या मुले व मुलींच्या पथकांनी सहभाग घेतला.

यावेळी शहीद नाय‍क एकनाथ कर्डिले यांना पंतप्रधान श्रीमती शेख हसिना गण प्रजातंत्रात्मक बांग्लादेश सरकारद्वारे मिळालेले सन्मानपत्र वीरपत्नी कौशल्याबाई कर्डिले यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवमन यांचा तसेच पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक फौजदार रवींद्र पांडे, पोलीस हवालदार सुरेश माळी, विश्वास बेरड, पोलीस कॉन्स्टेबल फुरकान अब्दुल मुजीब शेख, प्रशांत राठोड यांचाही पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री  विखे पाटील यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठामार्फत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. त्याबद्दल जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी त्यांचा सन्मान केला.

विक्रमी ध्वजदिन निधीचे संकलन करुन जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला. तसेच मतदार जागृती उपक्रमात जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याने अमेरिकन मेरीट कौन्सिलने जिल्ह्याचा गौरव केल्याबद्दल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घर घर संविधान’ कार्यक्रमाअंतर्गत शासकीय विभाग प्रमुखांना भारतीय संविधान उद्देशिकेची प्रतही देण्यात आली.

शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली.

0000

शाश्वत शेतीच्या योजनांमधून जिल्ह्याची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल-पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे

नंदुरबार, दिनांक २६ जानेवारी, २०२५ (जिमाका) :- विविध कृषि योजनांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ  माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

ते आज पोलीस कवायत मैदानावर ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी खासदार ॲड गोवाल पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमूदिनी गावित, डॉ. सुप्रिया गावित, भरत गावीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव (ससप्र), सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, तहसिलदार डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिपक चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे,  विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहा सराफ, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व  विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख-कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. कोकाटे म्हणाले, जिल्ह्याला कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सुधारणा करण्यावर भर दिला आहे. कार्यालयीन संकेतस्थळे अद्ययावत करून, माहिती अधिकारासाठी डिजिटल साधने वापरण्यावर भर आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण आणि सेवा हमी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांना वेळेत सेवा मिळेल.  स्वच्छता मोहीम अंतर्गत कार्यालयांमध्ये स्वच्छता, जुन्या वाहनांचे निर्लेखन व फाईल डिजिटायझेशन करण्यात येत आहे. गुंतवणूकदारांना प्रोत्साहन, त्यांचे तक्रारींचे निराकरण, आणि उद्योगांना अनुकूल वातावरण निर्मितीला प्राधान्य आहे. अंगणवाड्या, शाळा, आणि आरोग्य केंद्रांना भेटी देऊन स्थानिक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वाढवणे आणि नंदुरबार जिल्ह्याला आदर्श प्रशासकीय मॉडेल बनवणे हा आमचा उद्देश आहे. आपण, या १०० दिवसांच्या आराखड्याला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

पुढे बोलतांना ते म्हणाले, जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक ९३८ मिलीमीटर (१२० टक्के) पडला आहे. खरीपानंतर रब्बी हंगामातील पेरणी १०० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. रोजगार व शेती सुधारण्यासाठी मनरेगा, राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना तसेच सूक्ष्म सिंचन, वनराई बंधारे व शेततळ्यांच्या उपक्रमांतून शाश्वत शेतीसाठी योगदान दिले जात आहे. शासनाच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती सुरू असून, नागरी सुविधा केंद्रांच्या मदतीने ही प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने राबवली जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेला हा ओळख क्रमांक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मिळवावा.  आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत शेतीपूरक व्यवसायांना चालना दिली जात आहे. महिला बचत गटांना शेळ्या-बोकड पुरवठा व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी शेळीपालनाचा लाभ दिला जात आहे. महिलांचे सक्षमीकरण, पॉवर विडर यंत्रे, बिगर यांत्रिकी बोटी, मत्स्यजाळे, व जंगली जनावरे पळवणारी यंत्रे या सुविधांद्वारे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनांचा उद्देश आदिवासी समाजाला स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले, नवापूर तालुक्यातील श्री. योहान अरविंद गावीत यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत पिंजऱ्यातील मत्स्यव्यवसायात मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या यशाची दखल घेऊन त्यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील परेड व महामहिम राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. तसेच जिल्ह्यात या वर्षी आठवी आर्थिक गणना राबवून घरोघरी भेट देत व्यवसाय व उद्योगांची माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच राष्ट्रीय नमुना पाहणीच्या ८० व्या फेरीत “कुटुंबाचा सामाजिक उपभोग: आरोग्य” या विषयावर सर्वेक्षण जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांचे १०० टक्के आधार सिडींग पूर्ण झाले असून, जिल्हा नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच ९५ टक्के रेशन कार्डांचे मोबाईल सिडींग पूर्ण झाले आहे.

ते पुढे बोलतांना म्हणाले, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्याने ३४२ टक्के उद्दिष्टपूर्ती केली असून, पुरुष नसबंदीमध्ये महाराष्ट्रात पहिले स्थान मिळवले आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत सोनोग्राफी, सिजेरियन सुविधा, तसेच नवापूर येथे ट्रामा केअर व डायलिसिस युनिट सुरू झाले आहेत. नंदुरबारच्या महिला रुग्णालयात राज्यातील पहिले मोफत आय.व्ही.एफ. क्लिनिक सुरू झाले असून, ७६ जोडप्यांची तपासणी झाली आहे. या उपक्रमांमुळे “छोटे कुटुंब, सुखी कुटुंब” संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे. तसेच सिकलसेल निर्मूलन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ० ते ४० वयोगटातील ८ लाख नागरिकांची तपासणी मोहिम आजपासून सुरू होणार आहे. आतापर्यंत ३ लाख ९० हजार तपासण्या पूर्ण झाल्या असून १०० रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. लवकरच सर्व रुग्णांना अपंग प्रमाणपत्र व मोफत रक्तसुविधा कार्ड दिले जाईल. नागरिकांनी या तपासणी मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यांचा झाला सन्मान

ध्वजनिधी संकलनात १०० टक्के इष्टांक वसूल केल्याबद्दल स्मृतिचिन्ह.

  • जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी.

रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे वर्ष २०२४ या वर्षी ५ हजार पेक्षा जास्त  रक्त पिशव्या संकलनाचा नवीन उच्चांक झाला. त्यानिमित्त प्रतिनिधीक स्वरूपात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकारी-कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

  • महेश कुंवर आयसीटीसी समुपदेशक,
  • कपील पवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • जयेश सोनवणे रक्तपेढील वैज्ञानिक अधिकारी,
  • डॉ. रमा वाडीकर रक्तसंक्रमण अधिकारी.

केंद्र शासनाच्या ॲग्री स्ट्रॅक या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रंमाक प्रमाणपत्र/सन्मान पत्र यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात वितरीत करण्यात आले.

  • दिपक मोहन जोशी, खोंडामळी
  • चंद्रशेखर रावसाहेब पाटील, खोंडामळी.
  • विजयाबाई सुरेश पाटील, खोंडामळी.
  • चितांमण स्त्रुजन भोई, कोपर्ली.
  • प्रल्हाद भाईदास शिरसाठ, कोपर्ली.
  • अशोक भिका पवार, कोपर्ली.
  • कौस्तुभ कांतीलाल पटेल, बांभळोद.
  • अनिल नाना पाटील, बाभंळोद.
  • हसरत शांताराम जाधव, बाभंळोद.
  • प्रमोद नतेश्वर पाटील, सातुर्खे.
  • अंबिकाबाई नतेश्वर पाटील, सातुर्खे.
  • दिलीप भिमसिंग गिरासे, अमळथे.
  • देवचंद सुका कोळी, अमळथे.

जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२४-२५ निधीतून खरेदी केलेल्या नवीन १३ वाहनांचे लोकार्पन पालकमंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

यावेळी डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, एस. ए. मिशन हायस्कुल, अँग्लो उर्दू हायस्कूल व नवोद्यय विद्यालय, श्रावणी या विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी राष्ट्रभतीपर गीतावर योगासन, मल्लखांब व समूह नृत्यू सादर केले.

0000

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा

रायगड जिमाका दि.२६–  भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

मुख्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या शानदार संचलन द्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात  पोलीस दल पुरुष, महिला, गृहरक्षक दल, वाहतूक विभाग दुचाकीस्वार,  वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका, अंमली पदार्थ शोधक, श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर सविता गर्जे यांनी केले.

यावेळी शुभेच्छा देतांना कु. आदिती तटकरे यांनी सांगितले राज्याच्या विकासाचा अध्याय नव्याने सुरू झाला असून महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात विकासाची कास धरली आहे. देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये, महाराष्ट्राचे १४ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान आहे. थेट परकीय गुंतवणुकीसाठी राज्याला अधिक पसंती देण्यात येते. नुकत्याच दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने अधिक विक्रमी सामंजस्य करार केले आहेत.औद्योगिक आणि पर्यटन जिल्हा म्हणून रायगडने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. औद्योगिकीकरण आणि पर्यटनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे.

महामुंबईचा विस्तार रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नवे जाळे या परिसरात विणले जात आहे. आज जिल्ह्यात दीड हजारांहून अधिक औद्योगिक प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यातून ३ लाखांहून अधिक लोकांना रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत.येत्या काळात नवी मुंबई विमानतळ, गेल, आरसीएफ,  जेएसडब्लूच्या प्रकल्पांचा विस्तार होणार आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या कक्षा अधिक रुंदावणार आहेत. जिल्ह्यात औद्योगिकीकरणाला पोषक वातावरण आहे. पायाभूत सुविधाही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. भविष्यात रायगड जिल्हा उद्योग नगरी म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास वाटतो असे सांगून त्या म्हणाल्या  राज्याच्या निर्यात  क्षेत्रात जिल्ह्याचा वाटा ९.३ टक्के आहे. निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे ५ लाख ५६ हजार कोटी एवढे योगदान असून त्यात जिल्ह्याचे ५२ हजार कोटीचे योगदान आहे असल्याचेही त्यांनी सांगितले.

पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाला असलेले महत्त्व आज डेटाला प्राप्त झाले आहे. डेटाचे हब म्हणून रायगड आणि नवी मुंबई बनले आहे. जेएनपीटी आणि दिघी पोर्टमुळे रायगडमध्ये फायनान्शिअल इकोसिस्टिम तयार झाली आहे असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

रायगडमधील जलवाहतुकीचे नियोजन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या बंदरांच्या विकासाचे नियोजन केले होते. रेवस बंदराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला होता. रायगडमधील करंजा बंदराच्या विकासाबरोबरच करंजा ते रेवस यादरम्यान रो-रो बोट सेवा सुरु करण्यास  सरकारने मान्यता दिली आहे. करंजा बंदरावर ही सेवा सुरू करण्यासाठी यापूर्वी १९ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रेवस बंदरावरही अशीच कामे सुरू करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर रायगडमधील सावित्री नदीवरील दासगाव येथे नवीन पूल बांधण्यासाठी, तसेच दादली पुलाजवळ नवीन पुल उभारण्यासाठी जवळपास १४० कोटी रुपयांचा निधी  सरकारने उपलब्ध करून दिला आहे.

अलिबागला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या सांबरकुंड धरणासाठी  तातडीने बैठक आयोजित करून या प्रकल्पाची कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे सांगून कु तटकरे म्हणाल्या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायती मधील १८३० गावांपैकी १५४५ गावे मॉडेल व्हिलेज झाली आहेत.

रायगडमधील मासेमार कुटुंबाच्या कल्याणासाठी ५० कोटींचा मत्स्यविकास कोष विमा आणि डिझेल अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसान भरपाईसाठी धोरण प्रथमच घोषित केले. अशाप्रकारचे धोरण राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यायी इंधनाचा स्रोत म्हणून बांबूची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी ‘मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती दलाची’ स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर हरित आच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात ५ कोटी बांबू रोपे तयार करण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून कार्यवाही सुरु आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदी साठी पुढाकार घ्यावा. आपले सर्व सण, उत्सव पर्यावरण पूरक साजरे करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपली सर्व गावे, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे हि स्वच्छ, सुंदर ठेवावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केली.

राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” राबवित आहे. या योजनेंतर्गत,  जुलै ते जाने २०२५ पर्यंत सात मासिक हप्ते प्रदान करण्यात आले आहेत. ही योजना अशीच यापुढेही चालू राहील.अशी मंत्री कु. तटकरे यांनी ग्वाही दिली.

शासन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.  आपण सर्वानी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावा. असे आवाहन कु. तटकरे यांनी या निमित्ताने केले.

बेटी बचाव बेटी पढाव ही प्रतिज्ञा

यावेळी बेटी बचाव बेटी पढाव ही प्रतिज्ञा मंत्री कु तटकरे यांनी उपस्थिताना दिली. प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे मुलगा मुलगी यांना समान मानेल. स्त्री भ्रूण हत्येचा आणि असे कृत्य करणाऱ्यांचा विरोध करेन. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहीन. बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन अभियानाच्या यशस्वीते साठी सदैव प्रयत्नशील राहीन.

तसेच यावेळी बेटी बचाव बेटी पढाव संदेश देण्यासाठी उभारण्यात आलेल्या फलकावर मंत्री आणि अन्य मान्यवरांनी स्वाक्षरी करून संदेश दिला.

भारतीय संविधान उद्देशिका प्रतीचे वितरण

घरघर संविधान निमित्ताने प्रातिनिधीक स्वरुपात संविधान उद्देशिका प्रतीचे वितरण मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड डॉ. भरत बास्टेवाड पोलिस अधिक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांना करण्यात आले.

विविध पुरस्कार व सत्कार समारंभ

सर्वोत्कष्ट गुन्हे तपासासाठी केंद्रीय गृहमंत्री पदक २०२३ हे जाहीर करण्यात आल्या बद्दल अपर पोलीस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथरे यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

गुणवंत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील एक बहुउद्देशिय पुरूष कर्मचारी व पनवेल महानगरपालिके अंतर्गत एक कर्मचारी अशा १६ गुणवंत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

लेक लाडकी योजना लाभार्थी

अन्वी नितिकेश पाटील

(ग्रामपंचायत नाव – भाल) आणि शिवन्या अविनाश पिंगळे

(ग्रामपंचायत नाव – ताडवागळे)यांना धनादेश वितरण करण्यात आले.

कुष्ठरोगा संबंधित भौगोलिक माहिती प्रणाली (GIS Atlas) पुस्तकाचे प्रकाशन

राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्था, पनवेल नवी मुंबई व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या कुष्ठरोगा संबंधित भौगोलिक माहिती प्रणाली (GIS Atlas) पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतुन रायगड पोलीस दलास देण्यात आलेल्या वाहनांचे व ड्रोन चे हस्तातरण यावेळी मंत्री कु तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमानंतर  मंत्री कु. तटकरे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

0000

शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत जिल्ह्यातील महत्त्वाची विकासकामे गतीने पूर्ण करणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

  • लातूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन उत्साहात
  • नागरिकांना जलदगतीने सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न

लातूर, दि. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासनिक विभागांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे. या अंतर्गत १५ एप्रिल २०२५ पर्यंत जिल्ह्यातील महत्त्वाची विकासकामे गतीने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासोबतच नागरिकांना जलदगतीने सेवा-सुविधा उपलब्ध करुन देणे, हा देखील या उपक्रमाचा भाग असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आज येथे सांगितले.

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी, वीरपिता, माजी सैनिक, पत्रकार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानच्या टप्पा दोनमध्ये १२८ गावांमध्ये जलसंधारणाची १४३ कोटी ५९ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापैकी २ हजार १४२ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानातून होत असलेल्या कामांमुळे तलावांच्या साठवण क्षमतेत लाखो लिटरची भर पडली आहे. जिल्ह्यात सुरु असलेली जलसंधारणाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे पालकमंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा जलद आणि सोप्या पद्धतीने लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी केंद्र शासनाने अॅग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरुपात शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे पालकमंत्री ना. भोसले म्हणाले. तसेच जिल्ह्यात जवळपास १ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री वीज सवलत योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनेचीही त्यांनी माहिती दिली.

महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या इतिहासात लातूर जिल्ह्याचे विशेष महत्त्व आहे. विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याचा मनस्वी आनंद आहे. सामाजिक सलोखा, वैचारिक अधिष्ठान व सांस्कृतिक श्रीमंती ही जिल्ह्याची ओळख आहे. आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी सर्वजण एकत्र येवून करूया, असे आवाहनही पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आदर्श असे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आले, हा इतिहासातील सुवर्णक्षण आहे. भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते आपल्या लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे. संविधानाच्या रचनेमागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी, अजोड बुद्धीमत्ता आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आपण एका आदर्श संविधानाने समृद्ध झालो आहोत, अशी भावना पालकमंत्री श्री. भोसले यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ पासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करून संविधानाचे महत्त्व जनमानसात पोहोचवण्याची प्रेरणा दिली असल्याचे मंत्री श्री. भोसले यावेळी म्हणाले.

पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी पोलीस परेडचे निरीक्षण केले. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सागर खर्डे यांनी पोलीस परेडचे नेतृत्व केले. पोलीस पथकांसह गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना, पोलीस बॅण्ड पथक, श्वान पथक, वज्र वाहन, बॉम्ब शोधक पथक, जलद प्रतिसाद पथक, रुग्णवाहिका, यासह विविध शासकीय विभागांचे १६ चित्ररथ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस, सामाजिक वनीकरण विभागाचा आकर्षक देखावा असलेला रथ या पथसंचालनात सहभागी झाला होता.

प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांची पालकमंत्री श्री. भोसले यांनी भेट घेवून त्यांचा सत्कार केला, तसेच त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशासनाच्या विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

हर घर संविधान अभियान अंतर्गत समाज कल्याण विभागाच्यावतीने नागरिकांना प्रातिनिधिक स्वरुपात भारतीय संविधानाची प्रत वितरीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सदानंद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे सादरीकरण केले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

०००

विकसित आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी सर्वांचे योगदान आवश्यक-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि.२६ जानेवारी, २०२५ (जिमाका वृत्तसेवा):  देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी नागरिकांचे योगदान, सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी पोलिस संचलन मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) विक्रम देशमाने,  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरीष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानिमित्त मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते विविध पुरस्कार, शहरातील उड्डाण पुलावर द्वारका सर्कल येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेल्या निधीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. मंत्री श्री. महाजन यांनी संचलनाची पाहणी केली. सहाय्यक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने संचलन केले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की,  तीन वर्षापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखाली भव्य- दिव्य प्रमाणात साजरा केला. तेव्हापासून ते भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन २०४७ पर्यंतचा हा २५ वर्षांचा अमृत काळ असणार आहे. या कालावधीत विकसित राष्ट्राचे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे. ही स्वप्नपूर्ती होऊन बलशाली, समृद्ध आणि सशक्त भारताची निर्मिती आणि ‘सबका साथ सबका विकास’करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील.

शेतकरी हा राज्याचा मुख्य कणा आहे. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत जिल्ह्यातील ४ लाख ३२ हजार ८०२ शेतकऱ्यांना ९०.६४ कोटी रुपयांचा १९ वा हप्ता देण्यात येईल. जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात सरासरीच्या तुलनेत १०२ टक्के पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा ६ लाख ५७ हजार ५७४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १०० टक्के पेरा झाला आहे. जिल्ह्यात ७ मोठे आणि मध्यम १७ सिंचन प्रकल्प आहेत. त्यांच्यात आज अखेर ८१ टक्के जलसाठा आहे. असे असले, तरी सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जिल्ह्यात नदी जोड प्रकल्पांना चालना देत सिंचनाचे जाळे व्यापक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. शासनाने ग्रामीण रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड वापरण्यास सक्षम करून योजनेने त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वामित्व योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील रहिवाश्यांना होणार आहे. या योजनेमुळे बँक कर्ज, सावकारांवरील अवलंबित्व कमी करणे व अत्याधिक व्याजदरापासून लोकांचे संरक्षण करण्यास करण्यास उपयुक्त ठरणार आहे.

सरकारने महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. जिल्ह्यात १५ लाख तीन हजार ९२५ अर्ज मंजूर करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील एक हजार महिलांना पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ देण्याचे निश्चित केले असून लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विकसित करणे या योजनेच्या धर्तीवर सन २०२३- २०२४ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या १२८ शाळांची निवड करून त्या शाळा आदर्श शाळा अर्थात मॉडेल स्कूल म्हणून विकसित करणारी योजना राबविण्यात आली. सन २०२४- २०२५ मध्ये ५२२ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेत २ हजार ८३५ टन गहू व ३ हजार ३६६ टन तांदळाचे, तर प्राधान्य कुटुंब योजनेत ६ हजार ४६टन गहू, तर ९ हजार ६९ टन तांदळाचे नियतन मंजूर करून दरमहा मोफत वितरण करण्यात येत आहे. शिवभोजन योजनेत एकूण १२४ केंद्रांच्या माध्यमातून १४ हजार ९२६ थाळी वाटपाचा इष्टांक मंजूर आहे.
शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न, महिलांचे सक्षमीकरण, मुलांना शिक्षण आणि भुकेल्या व्यक्तीस पोटभर जेवण देण्याबरोबरच नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून विविध उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.  राज्यस्तरीय आरोग्य निर्देशांकात नाशिक जिल्हा अग्रस्थानी आहे. सरकारने नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षी ५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकविले जात आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हा महत्वांकाक्षी योजनेंतर्गत शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये ९ हजार ८१५ उमेदवारांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उमेदवारांना डीबीटीद्वारे १४.५३ कोटी रुपयांचे विद्यावेतन अदा केले आहे.

प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेंतर्गत सन २०२४- २०२५ मध्ये ५३ हजार ६५७ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे, तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत ६० हजार २४९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील १ लाख १३ हजार २२७ महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दीष्ट असून डिसेंबर २०२४ अखेर ६९ हजार ९८७ महिला लखपती झाल्या आहेत. ६५ वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणांच्या खरेदीसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत मदत केली जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत ४८ हजार ७१९ अर्ज मंजूर झाले आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सन २०२४- २०२५ या वर्षासाठी सर्वसाधारण योजनेत ८१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ३२७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत ५२ टक्के निधी विकास कामांवर खर्च झाला आहे. आदिवासी उपयोजनेत ३४९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी १४६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ८९ टक्के निधी विकास कामांवर खर्च झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजनेत ३३३ कोटी रुपये प्राप्त झाले असून आतापर्यंत विकास कामांवर ३१२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. कुंभमेळ्यातील विकास कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. आगामी महाकुंभ हा सुरक्षित, स्वच्छ व दुर्घटनारहीत कुंभ करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते यांना झाले पुरस्कारांचे वितरण
 उत्कृष्‍ट ध्वजनिधी संकलन (सन २०२३-२४) कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना सन्मानित करण्यात आले
केंद्र सरकारच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी केल्याबद्दल एक्सलन्स ॲडमिनिस्ट्रेशन या उपक्रमांतर्गत हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल  जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना Police medal for Distinguished service पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले
पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण विशेष अभियान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक २०२४ जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
पोलीस आयुक्तालय, नाशिक येथील सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, संदीप मिटके, अंकुश चिंतामण यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्याकडून अतिउत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक २०२४ जाहीर झाल्याबद्दल सन्मान
सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन येवला येथील उमेश बोरसे यांना उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी बद्दल केंद्रिय गृहमंत्री दक्षता पथक-२०२४ जाहीर झाल्याबद्दल सन्मान
वीरपत्नी मनीषा मोहिते यांना एन हवालदार संदीप भाऊसाहेब मोहिते ऑपरेशन स्नो लिओपार्ड लेह लडाख मध्ये कर्तव्य बजावत असतांना विरमरण आले त्यांचे शौर्यपदक त्यांच्या पत्नी मनीषा माहिते यांना १ कोटी रूपयांचा धनादेश प्रदानØ
कर्नल राकेश माधव बिरार यांना भारतीय सैन्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारत सरकारने सेना मेडल देवून सन्मानित केल्याने महाराष्ट्र शासनातर्फे रुपये १ लाख ५० हजार रूपयांचा पुरस्कार
कर्नल विलास सोनवणे यांना सन २०२३-२४ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत विविध योजनेतंर्गत पाच कोटी त्रेसष्ट हजार पाचशे सत्यात्तर इतक्या निधीचे वाटप तसेच जिल्ह्याला मागील वर्षी ध्वजनिधी संकलनासाठी रू. १ कोटी ३८ लाख ६७ हजार चे उद्दिष्ट देण्यात आले होते जिल्ह्याने रूपये २ कोटी १७ लाख ४८ हजार इतके उद्दीष्ट साध्य केले.
जल संवर्धनातनू जल समृद्धी वाटचाल या उद्देशाने जिल्हा परिषद नाशिक च्या मिशन भागिरथ या संकल्पनेतून नरेगाअंतर्गत सिंमेंट बंधारे / केटी वेअर कामे मोहीम स्वरूपात एकूण ५२६ पैकी ३२७ कामे प्रत्यक्षपणे सुरू करून त्यापैकी ३०८ कामे पूर्ण करण्यात आल्याने जिल्हा परिषद नाशिकला राष्ट्रीय स्तरावर स्कॉच पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना सन्मानित करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी गटातील मोडाळे ग्रामपंचायतीलस पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टॅक प्रकल्पाची अंमलबजावणी जिल्ह्यात मोहीम स्वरूपात १६ डिसेंबर २०२४ पासून सुरू असून, त्याद्वारे शेतकरी त्यांच्या शेताची माहिती आधार क्रमांकाशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याचा ओळख क्रमांक (Farmers ID) तयार करण्यात येत आहेत. प्रातिनिधीक स्वरूपात सहा शेतकऱ्यांना आयडी वाटप करण्यात आले. यात सुभाष पोपटराव देशमुख,आंबेबहुला, पंढरीनाथ कचरू चव्हाण, विल्होळी, राजराम कारभारी मते, शिंदे, सुरेश महादू चौधरी, पळसे, मनिष चंद्रकांत पवार, मोहगाव, विजय केरू आडके, नाणेगाव.
बेटी बचाव बेटी पढाव योजनेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र
तृप्ती दत्तात्रय सोनवणे, पोलीस निरीक्षक पोलीस आयुक्तालय,नाशिक
मनिषा सुरेश कांबळे, महिला पोलीस अमलदार, पोलीस आयुक्त
पुष्पा चंद्रकांत आरणे, सहा.पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण
विजया प्रकाश पवार, उप. निरिक्षक पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण
समाजकल्याण कल्याण विभाग, सामाजिक न्याय विभागातर्फे वीरपत्नी मनिषा संदिप मोहिते, कर्नल राकेश माधव बिरार, कर्नल विलास सोनवणे यांचा सत्कार
पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस ठाणे/ शहर वाहतूक शाखा/ इतर विभाग शाखा येथील बीट मार्शल कर्तव्य, ११२ गस्त, समन्स, टपाल कर्तव्य करीता निकामीकरण झालेल्या वाहनांचे बदली सन २०२४-२५ मध्ये एकूण ६२ होंडा शाईन, १२५ सीसी गाड्यांचे वाटप करण्यात आले
आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी मिनी फायर अँण्‍ड रेसेक्यू व्हेईकल नगरपालिका / नगरपरिषद मनमाड, ओझर व सिन्नर यांना वाटप करण्यात आले.

१२ जानेवारी २०२५ रोजी नाशिक-मुंबई महामार्गावर द्वारका उड्डाण पुलावर झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्यामुळे मा. मुख्यमंत्री महोदयांनी मृताच्या वारसांना प्रत्येकी रूपये 5 लाख प्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर केले त्या अनुषंगाने मृतांच्या वारसांना रकमेच्या धनादेशाचे वाटप जलसंपदा मंत्री महाजन यांच्या हस्ते झाले.
१. कै. यश उर्फ शिवम चंद्रकांत खरात, वय १७ वर्षे  यांची आई अनिता चंद्रकांत खरात यांना धनादेश प्रदान
२. कै. संतोष तुकाराम मंडलिक, वय ५५ वर्षे यांची पत्नी दीपाली संतोष मंडलिक यांना धनादेश प्रदान
३. कै. अतुल संतोष मंडलिक, वय २२ वर्षे यांची आई दीपाली संतोष मंडलिक यांना धनादेश प्रदान
४. कै. विद्यानंद समाधान कांबळे, वय १७ वर्षे यांचे वडील समाधान बाणाजी कांबळे यांना धनादेश प्रदान
५. कै. राहुल प्रभाकर साबळे, वय १८ वर्षे यांची आई वर्षा प्रभाकर साबळे यांना धनादेश प्रदान
६. कै. अनुज सुनील घरटे, वय १६ वर्षे यांची आई मधुमती सुनील घरटे यांना धनादेश प्रदान
७. कै. दर्शन सुनील घरटे, वय १७ वर्षे यांची आई मधुमती सुनील घरटे यांना धनादेश प्रदान
८. कै. आरमान शाहरूख खान, वय १६ वर्षे यांची आई अफसाना शाहरूख खान यांना धनादेश प्रदान
९. कै. चारूदत्त उर्फ चेतन पवार, वय १६ वर्षे यांचे वडील दिनेश रघुनाथ पवार यांना धनादेश प्रदान

यावेळी शायनिंग स्टार इंग्लिश मीडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मेरा रंग दे बसंती’ नवरचना विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘अलवारी पे सर’ या देशभक्तीपर गीतावर नृत्ये सादर केली. भोसला मिलिटरी स्कूच्या विद्यार्थ्यांनी अश्व दलाच्या कसरतीचे सादीकरण केले. विश्व जिज्ञासा स्पोर्टस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली.

000

पथदर्शी प्रकल्प, नाविण्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वागिण विकास साधणार-पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दिनांक २६ जानेवारी, २०२५ (जिमाका वृत्त) : केंद्र व राज्य सरकारच्या सहाकार्याने धुळे जिल्ह्यास अधिक विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी अपूर्ण प्रकल्पांना गती देण्यात येईल. तसेच नाविन्यपूर्ण योजना व पथदर्शी प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वागिण विकास साधणार असल्याचे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताकाचा ७६ व्या दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपवनसंरक्षक नितीन सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार, मनपा आयुक्त अमिता दगडे- पाटील, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील चंद्रशेखर देशमुख, सीमा अहिरे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार शरद पाटील, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी, जयश्री अहिरराव, चंद्रकांत सोनार यांच्यासह स्वातंत्रसैनिक, लोकप्रतिनिधी, नागरीक, खेळाडू, विद्यार्थी, माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार रावल पुढे म्हणाले की, धुळे जिल्ह्याला सुजलाम, सुफलाम बनविण्यासाठी सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेद्वारे तापी नदीचे पाणी जामफळ धरणात आणून ते ‘बंदिस्त नलिका वितरण प्रणाली’ च्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्यातील ५४ गावांना भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरविण्यात येणार आहे. बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रिया पुर्ण झाली असून रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. तर मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. या रेल्वेमार्गांमुळे मध्य व पश्चिम रेल्वे जोडली जाणार असून जिल्ह्यातून जाणाऱ्या रेल्वे व राष्ट्रीय महामार्गामुळे उपलब्ध होणाऱ्या दळणवळणाच्या सुविधांमुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळून मोठया प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

ते पुढे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यासाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे, साक्री तालुक्यातील बारीपाडा येथील वनसंवर्धक चैत्रामजी पवार यांच्या जल, जंगल, जमीन या क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेऊन केंद्र सरकारने त्यांना पर्यावरण व वनसंवर्धन या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर केला याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले तर पद्मश्री चैत्राम पवार यांचे राज्य शासनाच्यावतीने तसेच संपूर्ण जिल्हावासियांच्यावतीने अभिनंदन केले

महायुती सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात ५ लाख २७ हजारापेक्षा अधिक अर्ज मंजूर करण्यात आले. पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयेप्रमाणे जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ पर्यंतच्या सात हप्त्यांची रक्कम खात्यावर जमा केली आहे. राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यात २ हजार ८१९ उमेदवांराची निवड करुन त्यांना आतापर्यंत ३ कोटी ७८ लाख रुपये मानधन दिले. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यातील ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहायक साधने खरेदीकरीता प्रत्येकी ३ हजार रुपये देण्यात येत असून जिल्ह्यात १४ हजार अर्जांना मंजुरी दिली आहे. राज्यातील सर्व धर्मियांच्या ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. या योजनेत शहरी व ग्रामीण भागातील १ हजार लाभार्थ्यांना लवकरच तीर्थक्षेत्र भेटीचे नियोजन आहे. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ३ गॅस सिलेंडर मोफत भरुन मिळणार आहे. राज्यातील उच्च शिक्षणासाठी प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ योजनेत शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पुढील ५ वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे.

बळीराजासाठी हिताचे निर्णय

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ योजनेत धुळे जिल्ह्यातील ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या ९१ हजार शेतकऱ्यांना १०६ कोटी रुपयांची वीज बिल सवलत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यंदाच्या खरीप हंगामात २ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसानीबाबत 1 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ३० कोटी रुपये विमा रक्कम नुकसानीपोटी वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना २ हजार रुपये प्रति हप्त्याप्रमाणे आतापर्यंत १८ हप्ते, तर नमो शेतकरी महासन्मान योजनेत ५ हप्ते वितरीत केले आहे. जिल्ह्यात कापूस व सोयाबीन उत्पादक १ लाख ७० हजार शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपयाप्रमाणे ६६ कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. कापूस व सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेतंर्गत ६ हजार ३७० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर स्वंय संचलित बॅटरी फवारणी पंपाचे तसेच १५ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना नॅनो युरीया व नॅनो डीएपी नि:शुल्क वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेत अनुसूचित जातीच्या ९८ शेतकऱ्यांना नवीन विहिरीकरीता १ कोटी ६७ लाख तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत अनुसूचित जमातीच्या २२३ शेतकऱ्यांना ४ कोटीपेक्षा अधिक अनुदान वितरीत केले आहे. खरीप हंगामात केंद्र शासनाच्या हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात ५ केंद्र सुरु करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत ३९९ विद्यार्थ्यांना १ कोटी ६८ लाख इतकी रक्कम वितरीत केली आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजनेत जिल्ह्यातील १ हजार ९४१ मुलींना प्रती ५ हजार रुपयाप्रमाणे पहिल्या हप्त्याची ९७ लाखाची रक्कम वितरीत केली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतंर्गत नियमित मुदतीत कर्जफेड करणाऱ्या २७ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना ६ कोटी रुपये वितरीत केले.

कामगार, विद्यार्थी, दिव्यांगांसाठी विविध उपक्रम

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिल्ह्यातील १६ हजारापेक्षा अधिक बांधकाम कामगारांना ११ हजारापेक्षा अधिक सुरक्षा व अत्यावश्यक संचाचे वाटप केले आहे. आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लीअस बजेट योजनेअंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नि:शुल्क जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र काढुन देण्यात आले. नृत्यपथकांना साहित्य खरेदी, पारधी समाजाला मोफत जातीचे दाखले, शासकीय आश्रमशाळेतील 3 हजार विद्यार्थ्यांना बौद्धीक क्षमतेच्या विकासासाठी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन, स्वंयरोजगारासाठी डीजी स्मार्ट सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २८३ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. दिव्यांगासाठी जिल्हा परिषदेमार्फत २१ प्रकारानुसार दिव्यांगाचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून या सर्व्हेक्षणानुसार विविध विकास योजना राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा दोन मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या. यात खाजगी व्यवस्थापन गटातून पिंपळनेर येथील कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे ३१ लाखाचे तर शासकीय व्यवस्थापन गटातून शासकीय विद्यानिकेतन, धुळेस विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचे २१ लाखाचे पारितोषिक मिळाले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ३० हजार घरकुलांना मंजुरी

राज्यात १ जानेवारी ते १० एप्रिल, २०२५ या १०० दिवसाच्या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ३० हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली. तसेच शबरी आवास योजनेत १२ हजारापेक्षा अधिक, रमाई आवास योजनेत २ हजारापेक्षा अधिक तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतंर्गत ६४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आतापर्यंत ६० हजार ७२ घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत जिल्ह्यात १४ हजार ६०० महिला बचतगटांच्या माध्यमातून जवळपास २ लाख कुटूंबे जोडली गेली आहेत. या बचतगटांना गेल्या पाच वर्षांत बॅकांमार्फत ५५० कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. पंतप्रधान महोदयांच्या लखपती दिदी या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत यावर्षी जिल्ह्यात ४८ हजार महिला लखपती झाल्या असून ६१ हजार महिला लखपती करण्याचे नियोजन आहे.

नागरिकांचे जीवन सुकर करण्यासाठी १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम

सामान्य नागरीकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. निर्णय प्रक्रिया अधिक गतीमान करण्यासाठी शासनाने ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरु केला आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय ते तालुका स्तरापर्यंत ई ऑफिस प्रणालीचा वापर सुरु असून आतापर्यंत ३८ हजार फाईल्स तयार केल्या असून संपूर्ण कामकाज ई ऑफिसद्वारे सुरु आहे. नागरिकांच्या सोईसाठी लवकरच पालकमंत्री संपर्क कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेतंर्गत जिल्ह्यात ८४ अतिक्रमित व पाणंद रस्त्यांचा शोध घेण्यात आला असून ३९ रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले असून उर्वरित कार्यवाही सुरु आहे. आपल्या जिल्ह्यात ४५८ तलाठी व मंडळ कार्यालये अस्तित्वात आहे. पैकी स्वत:ची इमारत नसलेल्या १८७ कार्यालय बांधकामास गतीमान प्रशासन योजनेतंर्गत बांधकामास मान्यता मिळाली असून ३१ कार्यालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे तर १३२ कार्यालयांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेत प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात २ हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी आपली नोंदणी लवकरात लवकर करुन घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री रावल यांनी यावेळी केले.

यांचा झाला सन्मान….

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने ध्वज निधी संकल्प योजनेतंर्गत उत्कृष्ट ध्वज निधी संकलन करुन १०० टक्के इष्टांक साध्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.

सन २०२३-२०२४ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव पुरस्काराबद्दल श्री. कैलास वाघ, श्री.अविनाश पाटील, श्री.उमाकांत गुरव यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात राज्यात द्वितीय आल्याबद्दल कर्मवीर आ. मा. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे तसेच नाशिक विभागस्तरावर प्रथम आल्याबद्दल शासकीय विद्या निकेतन, धुळे यांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान केला.

जिल्हा आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र बोरीस, ता. धुळे यांना राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार तसेच नितीन जाधव, पोलीस पाटील, रा. बभळाज, ता.शिरपूर यांना राज्यपाल पुरस्कारासाठी उल्लेखनिय शौर्य पुरस्काराकरिता अंतिम निवड झाल्याबद्दल  सन्मानित करण्यात आले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे  द्वारा सन २०२२ या वर्षांसाठी जिल्हा गुणवंत खेळाडु (पुरुष) पुरस्कार परेश अनिल पाटील यांना तर जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून जितेंद्र संतोषराव ठाकरे यांना प्रत्येकी १० हजार रुपये, सन्मान चिन्ह व गौरवपत्र देऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. युतिका विशाल भामरे यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. महसुल विभागामार्फत ॲग्रीस्टॅक योजनेतंर्गत शेतकरी माहिती संच निर्मितीमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविल्याबद्दल जिल्ह्यातील निमगुळ येथील शेतकरी अजय नथ्थु मराठे, विजय दयाराम मोरे, होळ, ता. शिरपूर येथील विजयकुमार नागोसिंग सिसोदिया, मालपुर, ता. शिंदखेडा येथील सुरेश हरचंद सावंत आणि पाटण येथील शेतकरी अभिजित ज्ञानेश्वर पवार या शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात आले.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक ६, धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल (पुरुष), धुळे जिल्हा पोलीस दल (महिला), पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे, होमगार्ड (पुरुष व महिला), छत्रपती शिवाजी सैनिक विद्यालय, मोराणे, एस.पी.सी बॉईज शासकीय विद्यानिकेतन, धुळे, न्यु सिटी हायसकुल, धुळे, ऍथनी कॉन्व्हेट हायस्कुल, एनसीसी पथक, कनोसा कॉन्व्हेट हायस्कुल, केंद्रीय माध्यमिक निवासी आश्रमशाळा, जो.रा.सिटी हायस्कुल, धुळे, कमलाबाई शंकर कन्या हायस्कुल, राष्ट्रीय सेवा योजना, धुळे पोलीस व एसआरपीएफ संयुक्तीक बँड पथक, श्वान पथक (सॅम) तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरीकांना होण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध योजनांची माहिती देणारा चित्ररथ आदीनी संचलनात सहभागी झाले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण

यानंतर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यात बालन सर मुलींचा गटांने शिव तांडव, भरत नाट्यम नृत्य, एस.व्ही.के.एम. शाळा, धुळे यांच्यावतीने शहिद जवान नाट्यावर आधारीत नृत्य, आंबेडकर शाळेच्यावतीने आदिवासी संस्कृती दर्शन व लोकनृत्य, जे.आर.सिटी हायस्कुल, धुळे विद्यार्थ्यांनी मलखांब, चावरा इंगलीश मेडीयम स्कुल, धुळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्य, कै.मो.ता.पाटील हायस्कुल, वारकुंडाणे यांनी वारी नृत्य, तसेच राहुल मंगळे व ग्रुपने देशभक्तीपर गीत व पंजाबी भांगडा नृत्य सादर केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धुळे आकाशवाणीच्या पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.

३१ तलाठी तर १० मंडळ कार्यालयांचे पालकमंत्र्याच्या हस्ते ई-लोकार्पण

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन पालकमंत्री तथा पणन व राजशिष्टाचार मंत्री मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज शिंदखेडा तालुक्यातील १९ तलाठी कार्यालय, ७ मंडळ कार्यालय व शिरपूर तालुक्यातील १२ तलाठी कार्यालय व ३ मंडळ कार्यालयांचे ई-लोकार्पण करण्यात आले.

जिल्ह्यात ४५८ तलाठी व मंडळ कार्यालये अस्तित्वात आहे. पैकी स्वत:ची इमारत नसलेल्या १८७ कार्यालय बांधकामास गतीमान प्रशासन योजनेतंर्गत मान्यता मिळाली आहे.  शिरपूर तालुक्यातील २० तलाठी कार्यालय बांधकामासाठी ६ कोटी ४९ लाख तर शिंदखेडा तालुक्यातील ५० तलाठी कार्यालय बांधकामासाठी १५ कोटी रुपयांचा निधी, तर शिरपूर तालुक्यातील ५ मंडळ कार्यालय बांधकामासाठी २ कोटी तर शिंदखेडा तालुक्यातील १० मंडळ कार्यालयासाठी ४ कोटी निधी खर्च करण्यात आला आहे.

या गावातील कार्यालयांचे झाले ई-लोकार्पण

शिरपूर तालुक्यातील मांडळ, गिधाडे, जातोडे, हिंगोणी (बु), भटाने, मांजरोद, होळनांथे, उंटावद, वाठोडा, सावळदे, आढे(पिंप्री), करवंद,  तसेच शिंदखेडा तालुक्यातील  मालपुर, देगाव, कर्ले, चौगाव (बु), खर्दे (बु), देवी, चिलाने, निमगुळ, टाकरखेडा, गोराणे, तामथरे, दराने, पाटण, दभाषी, झोतवाडे, मुडावद, पढावद, वारुड भडणे या नवीन तलाठी कार्यालयांचे तसेच शिरपूर तालुक्यातील अर्थे, जवखेडा, बोराडी तसेच शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा, शेवाडे, विखरण, विरदेल, विखरण, शिंदखेडा व खलाणे या नुतन मंडळ कार्यालयांचे ई-लोकार्पण संपन्न झाले.

00000

बीडची विकसित जिल्हा अशी ओळख घडवू – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे

बीड, दि. २६ (जिमाका): बीड जिल्ह्यात अधिकाधिक सर्वांगीण विकास कामे करून विकसित बीड जिल्हा अशी ओळख प्राप्त करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

पोलीस मुख्यालय मैदानावर 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा मंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्यात पोलिसदल, होमगार्ड, एन.सी.सी. तसेच  स्काऊट गाईड आदींच्या 19 पथकांनी संचलन केले. या परेडचे नेतृत्व बीडचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी केले. ध्वजारोहणा नंतर भरणे यांनी परेडची पाहणी केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

देशाला पाचवी अर्थसत्ता बनविल्याबद्दल प्रधानमंत्र्याचे त्यांनी आभार मानले. राज्यात ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेला नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला आहे. त्याबद्दल त्यांचे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. आद्यकवी मुकुंदराज यांच्या जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो असे मंत्री श्री. भरणे यावेळी म्हणाले.

खोखो विश्वचषक जिंकून देणारी बीडची कन्या प्रियंका इंगळे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारे बीडचे अविनाश साबळे तसेच राहुल आवारे आणि नवनाथ फरताडे यांचे त्यांनी कौतुक केले.

बीड जिल्हावासियांचे रेल्वेचे स्वप्न केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नामुळे साकार होत आहे. यामुळे बाजारपेठ जवळ होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यासह सर्वांनाच फायदा होणार आहे असे सांगत मंत्री श्री. भरणे यांनी सेंद्रिय शेती तसेच रेशीम शेतीत जिल्हाला प्रथम क्रमांकावर आणल्याबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्ह्यात क्रीडा सुविधासाठी 8 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून माजलगाव, वडवणी, गेवराई, केज, अंबाजोगाई आणि धारूर या 6 ठिकाणी तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येईल असेही क्रीडामंत्री यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात होणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी 900 कोटीहून अधिक खर्च करण्यात येत आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीसह इतर 51 कामासाठी 321 कोटी 50 लाखांचे कामे प्रगतीपथावर आहेत याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

कार्यक्रमानंतर जिजाऊ मल्टीस्टेट गुन्ह्याचा तपास लावणारे पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे व तुळशीराम जगताप यांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते शहीद जवान पांडुरंग वामन तावरे यांच्या वीरपत्नी गोदावरी तावरे यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला. यावेळी शाळांच्या पथकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

पोलीस दलाचे अनिल शेळके यांनी सूत्रसंचालन केले.

०००

प्रत्येक भारतीयासाठी संविधान महत्त्वाचे – राज्यमंत्री इंद्रनिल नाईक

अमरावती, दि. 26 : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना घटनात्मक अधिकार दिले आहे. संविधान प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने देश स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतीय संविधानाच्या रूपाने देशाला अमूल्य देणगी मिळाली आहे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला अधिकार मिळाला असल्यामुळे प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे. संविधानाचा आदर राखून राज्य शासन विविध घटकांसाठी कार्य करीत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि वाजवी दरात बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रूपयात विमा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात 1464 कोटी, तर रब्बीमध्ये 148 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे.

कृषीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यात 840 एकर शासकीय जमिनीवर सौर प्रकल्प उभारणी करण्यात येत आहे. यातून 184 मेगावॅटचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेतून 78 हजार रूपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पानपिंपळी आणि हरभरा पिकांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे.

महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्यात येत आहे. बचतगट उत्पादित वस्तूंच्या ब्रँडींग, पॅकेजिंगवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 600 महिलांना रोजगाराचे साधन देऊन स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अनुदानावर पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ 7 लाख महिलांना होत आहे. 99 टक्क्याहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 5 हजार युवकांना 14 कोटी रूपयांचे विद्यावेतन देण्यात आले आहे. तसेच नांदगावपेठ अतिरिक्त एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल्स पार्क निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी 13 मोठे उद्योग सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरवातीला ध्वज वंदनानंतर श्री. नाईक यांनी परेडचे निरीक्षण केले. सामाजिक न्याय विभागातर्फे संविधानाची प्रत आणि उद्देशिकेची भेट त्यांना देण्यात आली. यावेळी पोलिस, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईड पथक यांनी संचलन केले. यावेळी सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग, कौशल्य विकास विभाग, जलद प्रतिसाद पथक, दामिनी पथक, अग्निशमन,परिवहन महामंडळ, श्वान पथक, शिवाजी संस्था, सामाजिक वनीकरण आदी विभागांच्या चित्ररथाने संचलन केले. मान्यवरांनी ॲग्रीस्टॅक चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली. तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या खासदार निधीतून दिव्यांगांना तीनचाकी वाहनाचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत आणि उल्लेखनीय यश मिळविणाऱ्यांचा राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडला.

जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रयत्न करून 126 टक्के निधी संकलित केल्याबद्दल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. योगेश निर्मळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी अपर्णा निर्मळ यांनी पुरस्कार स्विकारला. प्रवीण आखरे यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, योगेश पानझाडे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरविकास शाखेचे सहआयुक्त सुमेध अलोणे, महसूल सहायक एस. एम. काशीकर, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, डॉ. सुरजकुमार मडावी, पोलीस विभागातील राम नागे, इक्बाल सैय्यद, सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ टोकसे, जिम्नॅस्टिक हिमांशू जैन, वुशु क्रीडा प्रकारासाठी वैष्णवी बांडाबुचे, मध्यवर्ती कारागृह शिपाई सुधाकर मालवे, ॲग्रीस्टॅक प्रकल्पातील रमेश खुलसांजे, मिथून अंबाडकर, रमेश माहेकर, पंकज चकुले, सिद्धार्थ खडसे, मधुकर अंबाडकर, नाना यमगर, गजानन भुरे, प्रविण मेंढे, चंदन दातीर, रामराव इंगोले यांना गौरविण्यात आले.

00000

 

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला

सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार

जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या 

प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार

पालकमंत्री यांच्याकडून सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

सोलापूर, दिनांक २६ (जिमाका):- विकासाच्या   दिशेने   वाटचाल   करणारा   आपला  सोलापूर   जिल्हा  उद्योग, सामाजिक,  शैक्षणिक, आर्थिक,   वैद्यकीय, सांस्कृतिक  आणि पर्यटन क्षेत्रात  चौफेर  प्रगती   करत  असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी  सहकार्य  केले  जाईल, अशी  ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा समारंभानिमित्त पोलीस आयुक्त मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी 9.15 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली,  शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. आपण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारुन ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आणली. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ज्या समितीने तयार केली, त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान निर्मितीमध्ये त्यांचं बहुमोल योगदान लाभलं. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे आपण सर्व भारतीय नागरिक हा दिवस देशभरात अत्यंत उत्साहानं साजरा करतो.

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज रोजी पर्यंत सोलापूर जिल्ह्यात  एकूण ११ लाख २० हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १० लाख ५५ हजार अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रोजी पर्यंत लेक लाडकी योजनेअंतर्गत ६ हजार १४४ लाभार्थी बालिकांना लाभाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम प्रति बालिका ५ हजार रुपये प्रमाणे ३ कोटी ७ लाख २० हजार लाभार्थी बालिका व मातेच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिली.

सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल, तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबण्यास मदत होणार आहे.  राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी एकूण २८२.७५ कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. परंतु भाविकांना दर्शनासाठी खूप वेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे दर्शन मंडप व दर्शन रांग याकरिता १२९.४० कोटीचा आराखडा शासनाने मंजूर केला असून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. पंढरपूर देवस्थान मंदिर विकासाकरिता ७३.८५ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून या अंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा लाभ भाविकांना मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री गोरे यांनी सांगितले.

सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसात उद्दिष्ट पुर्ती कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच केंद्र व राज्य शासन बेघरांना स्वतःचे घरकुलाचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य सर्व आवास योजनेचे अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२४-२५ आर्थिक वर्षात ७०२ कोटी निधी मंजूर आहे. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली आहेत. बेटी बचाओं बेटी पढ़ाओ ही योजना राबविण्यात येते. या योजनेला दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात दिनांक २२ जानेवारी २०२५ ते ०८ मार्च २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. गोरे यांनी केले.

जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून संपूर्ण जिल्हा पाणीदार करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री श्री गोरे यांनी देऊन कृषी क्षेत्रातील कृषी विषयक माहिती आणि डिजिटल सेवा देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सुचित केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात एक लाख मराठा उद्योजक बनवण्याचे संकल्प पूर्ती झालेली आहे. प्रत्येक घरावर सौर ऊर्जा पॅनल बसून प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. गोरे यांनी केले.

पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी परेड कमांडर परिविक्षा दिन पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा वी. एस. यांचे समवेत परेड संचलन केले.  त्यानंतर पतसंचलन झाले. यावेळी भारतीय उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच पालकमंत्री महोदय यांनी सर्व उपस्थित नागरिकांना तंबाखू विरोधी दिन व कुष्ठरोग मुक्त भारत बाबत शपथ दिली. त्यानंतर पोलीस विभाग, कृषी विभाग, सैनिक कल्याण विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, क्रीडा विभागाचे पुरस्कार वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, ज्येष्ठ नागरिक अन्य मान्यवर नागरिक यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

0000

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री मेघना बोर्डीकर 

परभणी, दि.२६ (जिमाका) : परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे यासह नागरिक, शेतकरी, महिला, तरुण, आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम येथे भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी ध्वजवंदन केले. यावेळी शुभेच्छापर संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी,  पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, 15 ऑगस्ट, 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.  26 जानेवारी, 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली.  आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय.

परभणी विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या की, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. आपल्या जिल्ह्यात हा कृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जाईल, अशी खात्री आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याकरीता विविध यांत्रिकी कृषी औजारांसाठी केंद्र व राज्यशासन पुरस्कृत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेव्दारे मागील तीन वर्षांत 7 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना रुपये 45 कोटी इतके अनुदान महाडीबीटी पोर्टल प्रणालीव्दारे अदा करण्यात आले आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत सन 2023-24 या वर्षात 282 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झालेली असून 127 लाभार्थ्यांना रुपये एक कोटी 90 लाख अनुदान अदा करण्यात आले आहे. मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात परभणी जिल्हा अग्रेसर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत चालू वर्षात नवीन विहिरीसाठी 231 लाभार्थी व इतर बाबींकरीता 546 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत नवीन विहिरीसाठी 18 आणि इतर बाबींकरीता 67 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक सौरउर्जेला महत्त्व देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली प्रधानमंत्री सौर कृषी पंप व कुसुम घटक योजनेतंर्गत परभणी जिल्हयातील 9 हजार 882 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अन्य शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेऊन आपले कृषी उत्पन्न वाढवावे. परभणी जिल्हयात रुग्णांना चांगल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्त संकलनात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा रुग्णालयात नवीन कॅथलॅबचे काम प्रगतीपथावर असून भविष्यात रुग्णांना ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी इत्यादी सुविधा मोफत मिळणार आहे. सेलू येथे 50 बेडचे नवीन स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरु आहे. लवकरच हे रुग्णालय कार्यान्वित होईल. जिल्ह्यात सुमारे 5 लाख 47 हजार लाभार्थ्यांना ई-हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. मागील वर्षात या विभागाने वसुलीचे शंभर टक्के उद्दीष्ट्य पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ॲग्रिस्टॅक योजनेची सध्या अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. यासाठी 635 पथकांची गावनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री म्हणाल्या की, विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यच्या औद्योगिक विकास साधण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या औद्योगिक समूह विकास योजनेतंर्गत सेलू येथे केशवराज कॉटन क्लस्टर सुरु झाले आहे. 185 लघुउद्योजकांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरु केला आहे. महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळाला आहे. मागासवर्गीयांच्या  कल्याणासाठी  सामाजिक न्याय  विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जातीच्या एकूण 3 हजार 100 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी गंगाखेड, पालम, सोनपेठ येथे 6 वसतीगृह सुरु करण्यात आले आहेत. रमाई आवास योजने अंतर्गत 24 हजार 979 लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे क्रीडा सुविधा निर्मितीसाठी नव्याने रुपये 123 कोटींची प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळालेली आहे. लवकरच सुविधा निर्मितीचे कामे पूर्ण करण्यात येईल.  पुर्णा, जिंतूर, सेलू  व गंगाखेड  येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत’ शासकीय व खासगी आस्थापनांवर सुमारे 1 हजार 744 रूजू झाले आहेत.  ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’मार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे एक हजार 594 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये 12 कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सन 2023-24 अंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील 4 हजार 403 लाभार्थींना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. तर मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत इतर व विशेष मागास प्रवर्गातील 13 हजार 596 लाभार्थींना मान्यता देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी  पोलीस यंत्रणा सदैव  सक्रीय असते. आपल्या जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता जनतेनेही पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, पृथ्वीराज देशमुख सैनिक शाळा धर्मापूरी, जवाहर नवोदय विद्यालय, गांधी विद्यालय, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक वाहन, श्वान पथक, दंगा नियत्रंण पथक,  अग्निशमन दल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे पथक संचलनात सहभागी झाले होते.

यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, उपस्थित नागरिकांची भेट  घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  तत्पूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते सन 2023-24 जिल्हा क्रीडा पुरस्कार, शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान, सन 2024-25 या वर्षातील पदक विजेते राष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि मान्यवरांना पुरस्कार व प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.

०००

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे वाणिज्यदूतांसाठी चहापान

0
मुंबई, दि. २९  : दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा मुंबई, २८: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने...

खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करावी – सभापती...

0
मुंबई दि. २९ :- राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी...

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसात नव्याने प्रस्ताव सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. २९ : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात...

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश...

0
मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो...