मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 238

शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय

मुंबई, दि. 21 : वृद्ध रूग्णांना एकाच ठिकाणी सर्व सेवा प्रदान करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालयाच्या तळमजल्यावर ‘जेरियाट्रिक डेंटल केअर युनिट’चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, कृत्रिम दंतशास्त्र विभागाच्या डॉ. आरती गांगुर्डे, अधिष्ठाता डॉ. वसुंधरा भड – पाटील, प्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त श्री. निवतकर म्हणाले, रुग्ण जागरूकता, विद्यार्थ्यांमध्ये स्वारस्य तसेच मौखिक आरोग्यामध्ये कृत्रिम दंतशास्त्राच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिवस साजरा केला जातो.

इंडियन प्रोस्टोडोन्टिक सोसायटीच्या पुढाकाराने कृत्रिम दंतशास्त्र दिन साजरा करण्याकरिता विविध कार्यक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रांगोळी स्पर्धा, क्रॉसवर्ड कोडे, सर्जनशीलता, स्लोगन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यांचे कौशल्य प्रदर्शित केले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून दंत चिकित्सामध्ये कृत्रिम दंतशास्त्रांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रुग्ण जागरुकतेसाठी कृत्रिम दंतशास्त्र विभागातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या विविध उपचारांबद्दल माहितीपत्रकांचे प्रकाशन करुन ज्येष्ठ नागरिकांना त्याचे वाटप करण्यात आले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे अध्यात्म, वैदिक तत्वज्ञानातील तेजोमय दीपस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २१:- ‘अध्यात्म, वैदिक ज्ञान परंपरेचा निस्सीम साधक म्हणून गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांची कार्यसाधना पुढील कित्येक पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखी तेजोमय राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ निरूपणकार, संत साहित्य आणि अद्वैत वेदांत तत्वज्ञानाचे श्रेष्ठ अभ्यासक गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘गुरूवर्य डॉ. किसन महाराज यांनी साधकाश्रमाच्या माध्यमातून सुरू केलेले कार्य महत्त्वपूर्ण असे आहे. वेदांत तत्त्वज्ञान आणि संत विचारांची त्यांनी सांगड घालून त्याच्या प्रचार-प्रसारासाठी जीवन समर्पित केले. महाराष्ट्रातील संताची साहित्य संपदा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी कीर्तन- निरुपणातून अविरत प्रयत्न केले. यासाठी आधुनिक ज्ञान- शिक्षण साधनांचा त्यांनी प्रभावी वापर केला. याच ध्यासातून त्यांच्याकडून अनेकविध मौलिक ग्रंथ निर्मिती झाली. या सगळ्या गोष्टी भावी कित्येक पिढ्यांसाठी तेजोमय दीपस्तंभ म्हणून ज्ञानप्रकाश देत राहतील. महाराष्ट्र एका अलौकिक ज्ञानसाधकास, तत्वचिंतकास मुकला आहे. त्यांचा साधक परिवार, तसेच कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ब्रम्हलीन गुरूवर्य डॉ. किसन महाराज साखरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

भारतीय राज्यघटनेमुळेच भारताची जागतिक स्तरावर शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख – सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई, दि. 21 : जागतिक स्तरावर भारताने एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त केली आहे.आपल्या राज्यघटनेने त्यादृष्टीने भक्कम आधारशिला प्राप्त करून दिली असल्यानेच हे शक्य झाले. लोकशाही संस्था बळकट करणे, सकारात्मक सहभाग नोंदवून संसद आणि राज्य विधानमंडळे यांचे  वैभव टिकवणे आणि त्यायोगे लोक कल्याणाच्या प्रति प्रतिबद्धता सुनिश्चित करणे, कर्तव्य आपण चोखपणे बजावले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. पाटणा येथे लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली येथे आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत ते बोलत होते. “भारतीय राज्यघटनेची ७५ वर्षे : घटनात्मक मूल्यांच्या बळकटीकरणासाठी संसद आणि राज्य विधान मंडळे यांचे योगदान” या विषयावर या परिषदेमध्ये विचारमंथन होत आहे.

विचार व्यक्त करतांना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, आपली राज्यघटना पुरेशी लवचिक असून ती आणखी सामर्थ्य प्राप्त करीत आहे. आपल्या संसदीय लोकशाहीने राज्यघटनेच्या या शक्तिमुळेच संकटांचा यशस्वी सामना केला. घटना दुरुस्तीच्या संदर्भात काहींनी हेतूता गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न केले, मात्र अलीकडच्या निवडणुकांमध्ये जनतेने त्यांना नाकारून योग्य जनादेश दिला आहे.

“लोकशाहीत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांना अत्यंत महत्त्व आहे. एकाला सोडून  दुसऱ्याचा विचार देखील करता येणार नाही. तसे झाल्यास लोकशाही  संदर्भातील मूळ संकल्पनेलाच बाधा पोहोचेल” या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना परिषदेसमोर दिलेल्या भाषणातील सावधानतेकडे सभापती प्रा. शिंदे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले आणि सर्वांनी या मूल्यांप्रती कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.

सर्वसमावेशिता आणि सर्वांना समान संधीची उपलब्धता हे आपल्या राज्यघटनेचे महत्वाचे वैशिष्ट्य त्यांनी यावेळी अधोरेखित केले. कोणतीही राजकीय, आर्थिक अशी कौटुंबिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आपल्या उल्लेखनीय कार्यकर्तृत्वाच्या आधारावर तिसऱ्यांदा योगदान देत देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेत आहेत. हे स्वयंस्पष्ट उदाहरणच यासंदर्भात पुरेसे आहे, असेही सभापती प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संसदीय कारकीर्दीचा प्रारंभ तेव्हाच्या बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल सदस्यत्वापासून झाला आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाद्वारे लोककल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेही त्यांनी यावेळी स्मरण केले.

0000

राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दैनंदिन साजरा

मुंबई, दि. २१ : आपण स्वतः तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. नेत्रदानातून अनेक दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते. यास्तव अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या अंध व्यक्तींच्या शिक्षण, पुनर्वसन व रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा ७४ वा स्थापना दिवस संस्थेच्या वरळी मुंबई येथील सभागृहात सोमवारी (दि. २०) संपन्न झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

झारखंड येथे आपण राज्यपाल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसाला ७३ लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता, तर २०२४ साली महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपल्या आवाहनानुसार ७४० व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला. यंदा होणाऱ्या पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसाला ७५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करून घेण्याचे लक्ष्य आपण ठेवले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

नॅब संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचे योगदान होते हे समजल्यामुळे आपला त्यांच्याप्रती असलेला आदर शतपटींनी वाढला आहे, असे सांगून नॅब ही संस्था अंध तसेच दृष्टिबाधित व्यक्तींकरिता आशा जागवणारी व सक्षमीकरणाची हमी देणारी संस्था ठरली आहे असे राज्यपालांनी सांगितले.

आपले पूर्ववर्ती राज्यपाल रमेश बैस यांनी ‘नॅब’ला ब्रेल प्रिंटिंग प्रेस खरेदी करण्यास अर्थसहाय्य केले असल्याचे नमूद करून यापुढे देखील राजभवन नॅबच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या ब्रेल प्रिंटिंग प्रेस, टॉकिंग बुक्स, परफ्युमरी प्रशिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नॅब दृष्टीहीन व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सक्षम करीत असल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, मानद महासचिव हरिंदर कुमार मल्लिक, कार्यकारी महासचिव डॉ विमल देंगडा, कार्यकारी संचालक पल्लवी कदम, संस्थेचे आश्रयदाते व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध पारितोषिके वितरण करण्यात आली.

0000

Governor attends 74th Foundation Day Celebration of NAB;

presents awards to Young Achievers

Maharashtra Governor C. P. Radhakrishnan presided over the 74th Foundation Day of the National Association for the Blind (NAB) India at its premises in Worli, Mumbai on Mon (20 Jan.) The Governor presented various awards and Young Achievers awards on the occasion.

The Governor lauded NAB India’s initiatives, including the Braille Printing Press, Talking Books, Perfumery Training, and Teacher Training, which equip visually impaired persons with essential skills and opportunities for a dignified life.

The Governor congratulated the award recipients and Young Achievers for their extraordinary contributions, stating that their achievements are a source of inspiration.

President of NAB India Hemant Takle, Honorary Secretary General Harinder Kumar Mallik, Acting Honorary Secretary General Dr. Vimal Dengla, Executive Director Smt. Pallavi Kadam, and others were present.

००००

ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 21:- संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात, डॉ. किसन महाराज साखरे यांनी संत साहित्याचा गाढा अभ्यास करून कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजाचे आध्यात्मिक प्रबोधन केले. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत यांसारख्या ग्रंथांवर भाष्य करत संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.

ज्ञानेश्वरीच्या प्रचार व प्रसारासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून संत विचारांची प्रभावी मांडणी केली. श्रीमद्भगवद्गीता व संत साहित्य प्रचारासाठी देशभरात त्यांनी ज्ञानयज्ञाचे आयोजन केले. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे महाराष्ट्राने एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व गमावले आहे. साखरे महाराज यांच्या निधनामुळे अध्यात्म, शिक्षण आणि संत साहित्य क्षेत्राची अपरिमित अशी हानी झाली आहे. साखरे महाराजांच्या स्मृती आणि विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

000

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.20 (जिमाका): दूधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा. झालेल्या कार्यवाहीबाबत पुढील महिन्यात आढावा बैठक घेण्यात येईल, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण, कागल -राधानगरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता अशोक पवार, तहसीलदार अमरदीप वाकडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दूधगंगा प्रकल्पातील सर्व धरणग्रस्तांच्या जमिनींची स्वामित्व योजनेअंतर्गत प्राधान्याने मोजणी करुन घेवून त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्या. जमिनीची मागणी व भूखंड वाटपाच्या अनुषंगाने जमिनीची मागणी असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी अर्ज सादर करावा. पात्रता तपासून याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. संकलन रजिस्टर मध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांना सुनावणीची संधी देऊन संकलन रजिस्टर अद्ययावत करा. प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या जमिनीबाबत निर्णय घेण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच अतिरिक्त वाटप झालेल्या जमिनी सरकारजमा करण्याबाबतचा निर्णय घ्या. तसेच दूधगंगा प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करुन द्या, अशा सूचना देवून पाण्याच्या पातळीच्या बाहेर राहिलेल्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्याबाबत वनविभागासोबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तसेच मौजे मुडशिंगी पैकी न्यू वाडदे येथील डावा कालव्याची पाहणी करुन सुरक्षा भिंतीबाबत योग्य ती कार्यवाही करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींची मोजणी संबंधित भूमी अभिलेख विभागाकडून करवून घेवून या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत कार्यवाही केली जाईल. आतापर्यंत वाटप झालेल्या जमिनींचा सातबारा देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन घेतली जाईल, असे सांगून पुनर्वसनाच्या अनुषंगाने तक्रार असल्यास याबाबत अर्ज सादर करा. यावर चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण यांनी आतापर्यंत केलेल्या व सध्या करण्यात येत असलेल्या कार्यवाही बाबत माहिती दिली.

0000

दहावीच्या विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” उपक्रम

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावी चा विद्यार्थी प्रसाद संजय जाधव याने आज “डे विथ कलेक्टर” उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले…. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकांमध्ये प्रसादने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतल्याचे पाहून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे कौतुक केले.

वयाच्या मानाने प्रसादची उंची सर्वसामान्य मुलांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. याचा उपचार भारतामध्ये होत नसून परदेशात होत असल्याची माहिती त्याच्या शिक्षिका स्वाती कोकीतकर यांनी दिली. यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसादच्या उंची वरील उपचारासाठी त्याला परदेशात पाठविण्याबाबत सहकार्य करण्यात येईल,असे सांगितले.

शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी. तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि ‘जिल्हाधिकारी’ यांच्या करिअर व कार्याची माहिती घेवून यातून त्यांना प्रेरणा मिळावी. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून  “डे विथ कलेक्टर” हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत. उत्सुक, प्रज्ञावंत आणि विशेष मुलांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे.

या उपक्रमाची पहिली संधी मिळालेला प्रसाद जाधव हा दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो. प्रसादने मागील 3 वर्षामध्ये भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच त्याने वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रसादला भावी जीवनात जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न आहे. आजच्या “डे विथ कलेक्टर” उपक्रमात त्याने आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.

शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार यादव, पर्यवेक्षिका सुरेखा रोकडे, आई-नम्रता व वडील संजय जाधव यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले आहे. तसेच विज्ञान शिक्षिका स्वाती विनायक कोकीतकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने तिन्ही वर्षी विज्ञान उपकरणे तयार करुन ती प्रदर्शनात सादर केली होती.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून  “डे विथ कलेक्टर” या उपक्रमाबरोबरच जिल्ह्यातील शालेय स्तरावरील शिक्षकांसाठी “कॉफी विथ कलेक्टर” हा अभिनव उपक्रमही राबविण्यात येणार आहे.  दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात निवड केलेल्या शाळेतील शिक्षकांसोबत जिल्हाधिकारी श्री. येडगे संवाद साधणार आहेत.

*****

आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर; पाच महिन्यांत दुप्पट वाढ

मुंबई, दि.२० : ‘आधार’द्वारे सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार संवाद या कार्यक्रमाला BFSI, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रातील ५०० हितधारक उपस्थित होते. या कार्यक्रमात आधारच्या विविध उपयोजनांवर चर्चा करण्यात आली.

फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांचा ऐतिहासिक उच्चांक

आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांनी १०० कोटींचा टप्पा ओलांडला, केवळ पाच महिन्यांत ५० कोटींवरून दुप्पट वाढ झाली. २०२१ मध्ये सुरू झालेली ही AI/ML आधारित प्रणाली विविध क्षेत्रांमध्ये सुरक्षित आणि सुलभ ओळख पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे.

हितधारकांचा सहभाग : बँकिंग, एनबीएफसी, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रांतील तज्ज्ञांनी आधारच्या वापरासाठी चार पॅनल चर्चासत्रांमध्ये भाग घेतला. या सत्रांमध्ये आधारच्या माध्यमातून सेवा सुधारण्यासाठी उपाययोजना व धोरणांवर विचारमंथन करण्यात आले.

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील आधारची भूमिका : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी आधारच्या लोकसंख्याशास्त्रीय वापराबद्दल सांगताना ‘आधार’ने डिजिटल व्यवहारांवरील विश्वास वाढविण्यासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले.

फेस ऑथेंटिकेशनचा वापर: आधार फेस ऑथेंटिकेशन प्रणालीला सध्या ९२ सरकारी आणि खासगी संस्था वापरत आहेत. ही प्रणाली सुरक्षित, संपर्कविहीन आणि कुठेही, कधीही वापरण्यास सोयीस्कर आहे. 

भविष्यातील उद्दिष्टे

UIDAI चे सीईओ भुवनेश कुमार यांनी आधारद्वारे सेवा वितरण अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने UIDAI च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या कार्यक्रमाने वित्त, दूरसंचार, फिनटेक आणि सार्वजनिक सेवांमध्ये आधारच्या वापराचा विस्तार करण्याचा उद्देश ठेवला आहे.

आधार संवाद कार्यक्रमाचा दुसरा टप्पा मुंबईत यशस्वीरित्या पार पडला. पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये बेंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आला होता.

ग्रामविकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

पुणे,दि.२० : राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याची ग्राम विकास विभागावर मोठी जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये अंमलबजावणी करण्यात येते. मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेल्या १०० दिवसांचा विशेष कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या ग्राम विकास विभागाच्या योजनांची आणि कृती कार्यक्रमाची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी आणि ग्रामीण भागातील लोकांचे जीवन सुकर करावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

विधान भवन सभागृहात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, अपर आयुक्त कविता द्विवेदी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी, संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण प्रकल्प डॉ. राजाराम दिघे,महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान संचालक सुभाष इंगळे, पेसा योजना राज्याचे संचालक शेखर सावंत, सचिव श्री.कवठेकर, ग्रामविकास विभागाचे उपसचिव सुभाष इंगळे,  उपायुक्त (विकास) विजय मुळीक यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.गोरे म्हणाले, ग्रामविकास विभाग राज्य शासनाची ग्रामीण विकासाची महत्वाची यंत्रणा आहे. ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.  महा आवास योजनेद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुले देण्यात येतात व भूमिहिन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जमीन उपलब्ध करुन देण्यात येते. विशेष मोहिम पध्दतीने या योजनेतील उद्दीष्टांची पूर्तता करुन जनतेला घरकुले उपलब्ध करुन द्यावी. राष्रीगरय ग्राम स्वराज्य योजना, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमासोबत पर्यटन विकास, आपले सरकार सेवा केंद्र योजनेसह विविध योजनांच्या उद्दीष्टपूतीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.

लोक प्रतिनिधींनी सूचविलेली कामे या जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी  विमानतळ परिसरात विक्रीसाठी केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, लखपती दिदी योजनेद्वारे महिलांना सक्षम करणे व त्यांचा आर्थिक विकास साधणे, महिलांना व्यक्तिगत व्यवसायासाठी कर्ज पुरवठा या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि दिलेले उद्दीष्ट पूर्णपणे साध्य करावे अशी सूचना मंत्री श्री.गोरे यांनी केली.

‘महाआवास योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांना होण्यासाठी तसेच योजनेचा लाभ मिळावा यासाठी कुठल्याही कामासाठी अतिरिक्त शुल्क देण्यात येऊ नये’, अशा आशयाचा फलक पंचायत समिती, ग्राम पंचायत परिसरात ऊभारण्याची तसेच तक्रारीसाठी त्यावर संबधित अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक ठळकपणे दर्शवावा अशी सूचना मंत्री श्री.गोरे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तसेच आस्थापनाविषयक कामकाजाचा, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती, सेवानिवृत्तीनंतरचे लाभ आणि प्रलंबित चौकशी प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला. कर्मचाऱ्यांची सेवाविषयक प्रकरणे अडवून ठेवण्याच्या कार्यपध्दतीची मंत्री श्री.गोरे यांनी गंभीर दखल घेतली आणि तातडीने प्रलंबित प्रकरणांवर संबधित अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा आणि प्रकरणे निर्गत करावी असे निर्देश यावेळी दिले.

१०० दिवस कृती कार्यक्रमातील योजनांची अंमलबजावणी आणि अन्य विविध योजनांची अंमलबजावणी आणि जिल्हा परिषदनिहाय उद्दिष्ट पूर्तीचा आढावा आगामी काळात घेण्यात येणार असून आवश्यकतेनुसार नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मंत्री श्री.गोरे यांनी दिली.

प्रधान सचिव श्री.डवले यांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद योजनांच्या उद्दिष्टांचा आढावा घेऊन त्याची काटेकोरपणे आणि सकारात्मक पध्दतीने अंमलबजावणी करावे असे सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत इमारतीमधे नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छता गृहे सुस्थितीत ठेवणे याला प्राधान्य देण्याची सूचना केली. योजनांचे उद्दिष्ट साध्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे त्यांनी सूचित केले.

विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांनी सर्व अधिकाऱ्यांनी महाआवास योजनेतील विविध घरकुल योजनांच्या उदिृष्ट पूर्तीसाठी विशेष भर देऊन सर्व यंत्रणांनी ताळमेळ ठेवून मोहिम स्वरुपात ते पूर्ण करावे अशी सूचना केली. विभागातील योजनांच्या पूर्ततेचा यावेळी आढावा घेण्यात आला.

यावेळी महा आवास योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना, ग्रामविकास-बांधकाम विभाग, ग्रामपंचायत विभाग, स्वच्छ भारत अभियान, कृषि विभाग, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणारी अभियाने, प्रशासकीय व आस्थापनाविषयक बाबी, प्रलंबित अपिले यासह १०० दिवसाचा विशेष कृती कार्यक्रमांच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विविध योजनांचे कार्यान्वयन अधिकारी उपस्थित होते.

०००

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली क्लॉस श्वाब यांची भेट

दावोस, दि. 20 – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार यात होणार आहेत आणि विविध कंपन्यांसोबत बैठकाही होणार आहेत.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे आयोजन दरवर्षी ज्यांच्या पुढाकारातून केले जाते, त्या क्लॉस श्वाब यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. हरित ऊर्जा, ईलेक्ट्रीक व्हेईकल, उद्योग जगतातील अनेक नवीन घडामोडींवर या दोघांमध्ये यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या विकासभरारीला त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या.

यंदाच्या गणेशोत्सवात क्लॉस श्वाब हे एका बैठकीसाठी मुंबईत आले होते. त्यावेळी 12 सप्टेंबर रोजी सपत्नीक त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी येऊन श्रीगणेशाची आरती केली होती. या भेटीत त्यालाही उजाळा देण्यात आला. या बैठकीने आज देवेंद्र फडणवीस यांच्या दावोसमधील भेटी, बैठकांचा श्रीगणेशा झाला.

दावोस येथे साकारलेल्या इंडियन पॅव्हेलियनच्या उद्घाटन समारंभाला सुद्धा अनेक केंद्रीय मंत्री, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ते हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या स्वागत समारंभालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतीय वेळेनुसार हा कार्यक्रम मध्यरात्रीनंतर होईल.

होरॅसिसच्या अध्यक्षांसोबत बैठक

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांचीही भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालकसुद्धा आहेत. येणार्‍या काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यासाठी त्यांनी यावेळी पुढाकार दर्शविला. नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबतसुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...