रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 255

गंजगोलाई परिसरातील रस्ते सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

  • शहरातील स्वच्छतेला, चांगल्या सुविधा पुरविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना
  • जिल्हा परिषदेच्या बाळंतविडा उपक्रमांचीही घेतली दखल

लातूर, दि. ०५ (जिमाका) : गंजगोलाई हे लातूरचे ऐतिहासिक वैभव असून गंजगोलाईला जोडणारे रस्ते आणि परिसराच्या सुशोभिकरणाला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या कामाचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ च्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या मंजूर नियतव्ययापेक्षा अधिक निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार संजय बनसोडे, जिल्ह्याच्या पालक सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

गंजगोलाईकडे जाणारे रस्ते आणि परिसराचे सुशोभीकरण करताना या वास्तूचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून त्यानुसार आराखडा तयार करावा. या आराखड्यात समाविष्ट कामे गंजगोलाईचे ऐतिहासिक स्थान अधोरेखित करणारी, या वास्तूला साजेशी आणि दर्जेदार होतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी केल्या. लातूर शहर आणि शहराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात. समन्वयाने काम करून शहर स्वच्छ राहील, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाकडून गर्भवती महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बाळंतविडा’ उपक्रमाचाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी माहिती घेतली. तसेच उपक्रम चांगला असून पात्र आणि गरजू महिलांना चांगल्या दर्जाच्या वस्तू, साहित्य यामाध्यमातून उपलब्ध होईल, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

लातूर जिल्ह्यात विद्युत रोहित्र वारंवार नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी आहेत. विद्युत भार वाढल्याने नादुरुस्तीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या रोहीत्रांची क्षमता वाढविण्यासाठी निधीची गरज आहे. यासोबतच ऐतिहासिक वारसा असलेल्या गंजगोलाई परिसरातील रस्ते विकास आणि सुशोभीकरणासाठी निधी मिळावा, अशी मागणी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी केली. वाढीव निधी मिळाल्यास ‘बाळंतविडा’ कीटमध्येही आणखी काही वस्तूंचा समावेश करता येईल, असे ते म्हणाले.

महानगरपालिका हद्दीच्या लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांनी समन्वय करून कार्यवाही करावी, असे वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता, कृषि संलग्न सेवा, पशुसंवर्धन, शाळा, अंगणवाडी इमारती, गाव तिथे स्मशानभूमी आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे यांनीही जिल्ह्यातील विविध मागण्या यावेळी मांडल्या. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सन २०२४-२५ अंतर्गत आतापर्यंत झालेल्या निधी खर्चाची आणि सन २०२५-२६ मध्ये प्रस्तावित केलेल्या कामांची माहिती दिली.

०००

जिल्हा विकासासाठी भरीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):  जिल्ह्याचा सन २०२५-२६ चा आराखडा हा १२०० कोटी रुपयांचा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन भरीव निधीची तरतूद करेल. प्राप्त निधीचा विनियोग हा दर्जेदार, गुणवत्तापूर्ण कामे करण्यासठी करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ (सर्व साधारण) च्या राज्यस्तरीय बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या आढावा घेतला. बैठकीस सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त विभागाचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पालक सचिव हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.  तर जिल्हा मुख्यालयातून आ. रमेश बोरनारे, आ. अनुराधाताई चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच सर्व यंत्रणाप्रमुख आदी उपस्थित होते.

खर्चाचा आढावा

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सन २०२४-२५ च्या मंजूर नियतव्ययाचा खर्चाचा आढावा घेतला. जिल्ह्याला सन २०२४-२५ साठी ६६० कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर असून ५१६ कोटी रुपयांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. त्यातील २२५ कोटी निधी प्राप्त झाला असून त्यातील १८७ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे.

१२०० कोटी रुपयांचा आराखडा

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सादरीकरण करुन जिल्ह्याच्या सर्वसाधारण योजनांसाठी १२०० कोटी रुपयांचा आराखडा सादर केला. त्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील विविध प्रमुख कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली. शहरी सुविधांचा विकास, जिल्ह्यात रेशीम उत्पादन वाढीला चालना देणे, घृष्णेश्वर विकासासाठी १५६.६३ कोटी रुपयांचा विकास आराखडा अशा विविध विकासकामांचा व योजनांचा त्यात समावेश आहे.

लोकसंख्येची वाढ पाहता वाढीव निधीची पालकमंत्र्यांची मागणी

पालकमंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले की, जिल्ह्यात येऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक पाहता येत्या पाच वर्षात शहराची लोकसंख्या वाढणार आहे. त्यादृष्टीने तयार करावयाच्या पायाभुत सुविधा विकास व अन्य आवश्यकतांसाठी वाढीव नियोजन करण्यात आले आहे.तसेच जिल्ह्यातील ५० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत आहे. त्यामुळे नागरी सुविधा विकासासाठी निधी मिळावा,अशी मागणी पालकमंत्र्यांनी केली.

सौर उर्जेच्या वापरासाठी स्वतंत्र तरतूद करावी- मंत्री अतुल सावे

इमाव कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले, पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात अधिक सुविधांचा विकास होणे आवश्यक असून त्यासाठी अधिक निधी मिळावा. तसेच सौर उर्जेचा अंगिकार करण्याबाबत आर्थिक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे उपक्रम हाती घ्यावे- पालक सचिव श्री. कांबळे

पालक सचिव श्री. कांबळे यांनी सांगितले की, येत्या पाच वर्षात छत्रपती संभाजीनगर शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे.  तसेच शहरात उद्योगांची गुंतवणूक होत असून उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत. त्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांमधील २० टक्के निधी राखीव ठेवावा आणि हा निधी रोजगार निर्मितीसाठीच्या उपक्रमांसाठी खर्च करावा, अशी सूचना त्यांनी केली.

‘घाटी’साठी स्वतंत्र तरतूद

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले की, जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न आहे. प्रस्तावित आराखड्यातील निधी हा शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला व बालविकास, दिव्यांग कल्याण अशा सामाजिक क्षेत्रात त्या त्या आवश्यक प्रमाणात खर्च करावा. शाळांच्या विकासाठी मनरेगाच्या निधीतून कामे करण्यात यावी. स्वच्छता उपक्रमांना प्राधान्य द्यावे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सौर उर्जेचा अवलंब करावा. त्यासाठी उचित तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यात महत्त्वाचे असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात ‘घाटी’ च्या विकासासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यातील अन्य सुविधा विकासासाठी उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा अधिकाधिक वापर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हा प्रशासनाचे केले कौतुक

आपल्या संबोधनात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्ह्यात होत असलेल्या विविध कामांबाबत प्रशासनाचे कौतुक केले. संत ज्ञानेश्वर उद्यान पुन्हा सुरु केल्याबद्दल जिल्हाधिकारी स्वामी यांचे तर मनपातर्फे राबविण्यात येणाऱ्या लोकोपयोगी उपक्रमांबद्दल आयुक्त जी. श्रीकांत यांचे अभिनंदन केले. देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सची करतांना राज्याचे त्यात १ ट्रिलियन डॉलर्सचे योगदान असावे यादृष्टिने प्रत्येक क्षेत्रात प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत.

०००

नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड दि. ०५ : २०१४-१५ मध्ये सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार झाली, भूजल पातळी वाढली, मात्र मराठवाड्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करायचे असेल तर पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणेही महत्त्वाचे आहे. समुद्रात वाहून जाणारे ५३ टीएमसी पाणी राज्यात नदीजोड प्रकल्प राबवून मराठवाड्यात आणण्यात येईल, ज्यामुळे आगामी पिढ्यांना दुष्काळ बघावा लागणार नाही याचे नियोजन शासनाने केले आहे असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक ३ अंतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी केली. कोनशिला अनावरण, व पूजन करून रिमोटद्वारे कळ दाबून खुंटेफळ साठवण तलाव ते शिंपोरा बोगदा कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा आष्टी उपसा सिंचन योजना एक महत्त्वाचा भाग आहे.

कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा, आमदार विक्रमसिंह पंडित, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आदींसह माजी आमदार भीमराव धोंडे तसेच लक्ष्मण पवार साहेबराव दरेकर तसेच शंकर देशमुख आदींची उपस्थिती होती.

यावेळी खुंटेफळ येथे आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित जनतेशी संवाद साधला. आष्टी तालुक्यातील या उपसा सिंचन योजनेचा तिसरा टप्पा खुंटेफळ तलावाच्या रूपाने विकसित होत आहे याचे ४०% काम पूर्ण झाले असून आगामी काळात या कामाला अधिक गती दिली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

नदीजोड प्रकल्प आवश्यक

या भागात संपूर्ण शेती बागायती करायची असेल तर नदीजोड प्रकल्प आवश्यक आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये दिलेल्या पहिल्या सुधारित प्रशासकीय मान्यतांपैकी आष्टी उपसा सिंचन योजना एक होती. तब्बल ११ हजार कोटी रुपयांची मंजूरी मिळाली आणि निधीही उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे हे काम वेगाने सुरू आहे. धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर या भागाचा दुष्काळ आता भूतकाळ ठरेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. याशिवाय, या प्रकल्पात शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा, यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

२०२२ मध्ये महाराष्ट्रातील चार प्रमुख नदीजोड प्रकल्पांचा पाठपुरावा सुरू केला. या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहेत. या नदीजोड प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना विनंती केली असून त्यांनी देखील मान्यता देण्याची ग्वाही दिली आहे.

उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर

उपसा सिंचन योजना या खर्चिक आहेत, त्याचा भार शेतकऱ्यांवर पडू नये म्हणून आम्ही राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विजेच्या बिलाचा भार शेतकऱ्यांवर येणार नाही. अनेक ठिकाणी उपसा सिंचन योजना विजेच्या बिलामुळे बंद पडायच्या, मात्र आता या योजना सोलरवर चालतील. आष्टी उपसा सिंचन योजना सुद्धा सौरऊर्जेवर चालवण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.

मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना

शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीजपुरवठा मिळावा यासाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना सुरू केली. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, ज्याने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज वितरण कंपनी तयार केली. १६ हजार मेगावॅट क्षमतेचे फीडर तयार करून, शेतकऱ्यांसाठी असलेले हे प्रकल्प डिसेंबर २०२६ किंवा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सध्या आपण शेतकऱ्यांना जी वीज देतो ती एका युनिटला आठ रुपयाला पडते, सौरऊर्जेचे काम पूर्ण झाल्यावर ती प्रति युनिट तीन रुपयांना पडेल, या वाचलेल्या पैशांमुळे घरगुती आणि औद्योगिक वापराच्या विजेच्या संदर्भाने निर्णय घेता येतील. ऊर्जा विभागाने पुढील पाच वर्षाचे दर निश्चित केले आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन

जेव्हा 53 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणू, तेव्हा जायकवाडीत इतके पाणी असेल की ते सहज वितरित करता येईल. त्यामुळे मराठवाड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. माणदेशातील दुष्काळ संपवला आहे, घरात पाणी पोहोचले आहे तेच चित्र मराठवाड्यामध्ये निर्माण करायचे आहे, त्यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-धर्मांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले. त्याचप्रमाणे, आपणही एकत्र राहून विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन करतानाच बीडचा इतिहास समृद्ध आहे आणि आपल्याला तो पुढे न्यायचा आहे, त्यासाठी आपल्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केला.

मराठवाडा व अहिल्यानगरच्या भागाची स्थिती लक्षात घेऊन या भागात सिंचन प्रकल्पांना गती देण्यात येईल असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केले. बीड जिल्ह्यात सर्व प्रकारच्या विकासकामांवर लक्ष देऊन शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी घेतलेल्या विविध निर्णयांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले.

२००७ पासून या प्रकल्पासाठी प्रयत्न करत असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री असताना केलेली मदत व आता मुख्यमंत्री झाल्यानंतर या कामासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार सुरेश धस यांनी आभार मानले.

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी प्रास्ताविक केले.  प्रकल्पाबाबत करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. या प्रकल्पामुळे पहिल्या टप्प्यात 33 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे त्यांनी सांग़ितले.

भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे आणि खेळाडूंचा सत्कार

भारताला खो-खो मधील पहिला विश्वचषक मिळवून देणाऱ्या भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे आणि टीममधील खेळाडू, प्रशिक्षक यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रियंका इंगळे ही बीड जिल्ह्यातील खो-खो खेळाडू आहे.

खुंटेफळ सिंचन तलावासाठी शेतजमिनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना मोबदला धनादेश प्रदान

खुंटेफळ सिंचन तलावासाठी शेतजमिनी गेलेल्या बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबदला धनादेश प्रदान करण्यात आले. सर्वश्री रामा थोरवे, देविदास थोरवे, महादेव थोरवे, विठोबा काळे, आसाराम पठारे या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.

०००

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे जेव्हा मुलांना शाळेच्या ओट्यावर तिसरीची कविता समजून सांगतात…

नागपूर, दि.05 :  नागपूर जिल्ह्यातील कळमना तालुक्याच्या काठावरील उबाळी या सुमारे एक हजार उंबरठ्याच्या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा रोजच्याप्रमाणे सकाळी सुरु झाली. शालेय प्रार्थना व पाठ होत असताना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे शाळेच्या पाहणीसाठी शाळेत पोहोचतात. तिथल्या शांततेला व शिस्तीत शाळेच्या ओट्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांजवळ जातात. वडीलकीच्या नात्याने मुलांची चौकशी करतात.

खुद्द शालेय शिक्षणमंत्री यांच्या या शाळा भेटीने मुख्याध्यापिका विजया गोतमारे यत्किंचितही गोंधळून  न जाता विश्वासाने पुढे येतात. शाळेची संपूर्ण माहिती त्या देतात. शिक्षणमंत्री इयत्ता तिसरीतील मुलींशी गप्पांमध्ये रमून जातात. त्यांना एक-एक प्रश्न विचारत शाळेतल्या अडचणी जाणून घेतात. कशिश ठाकूर ही विद्यार्थिनी त्यांनी दिलेल्या विश्वासावर पुढे येते. ‘सर मी कविता वाचून दाखविते असे सांगून लय धरते.

शाळेतल्या या सकाळच्या वातावरणाला नुकताच उत्तरायणाकडे कललेला सूर्य उब घेऊन आलेला असतो. अशा या भारलेल्या वातावरणाला कशिश ‘पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम् कौलारावर थेंब टपोरे तडम् तडतड तडम्’ हे बडबड गीत सादर करुन शिक्षण मंत्र्यांनाही तिसरीच्या भाव विश्वात घेऊन जाते. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे मुलींच्या गुणवत्तेचे कौतुक करुन पुढच्या शाळा भेटीला रवाना होतात.

कळमेश्वर येथील नगर परिषदेची शाळा, नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कळमना संजयनगर येथील हिंदी उच्च प्राथमिक शाळा याठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण उपसंचालक दिपेंद्र लोखंडे व वरिष्ठ अधिकारी होते. कळमेश्वर येथील शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीबाबत त्यांनी विचारणा करुन त्यावर उपचार केले जातात का याची माहिती घेतली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये चर्मरोगासारख्या आजारावर लक्ष वेधून शिक्षकांनी त्याबाबतही विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले पाहिजे असे सांगितले. मुलांच्या स्वच्छतागृहाची त्यांनी पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी पणन मंडळाने पणन सुविधा बळकट कराव्या -पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे, दि.5: कृषी उत्पन्न बाजार समित्या अधिक सक्षम करण्यासाठी पणन सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात पणन मंडळाने शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी यावर भर द्यावा, तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही व कृषीमालाचे होणारे नुकसान टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना पणन मंत्री जयकुमार रावल दिल्या.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाची बैठक पणन मंत्री जयकुमार रावल यांचया अध्यक्षते खाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार तथा काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चरणसिंह ठाकूर, सहकार आयुक्त दीपक तावरे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी पणन संचालक विकास रसाळ, उपकृषी पणन सल्लागार भवेष कुमार जोशी,  महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी महासंघाचे सभापती प्रवीण कुमार नाहटा, सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे, , महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे संचालक डॉ. परशुराम पाटील, संचालक व काजू प्रक्रिया उद्योजक रुपेश बेलोसे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले, बापगाव, काळडोंगरी, जाधववाडी आणि तळेगाव दाभाडे येथील प्रकल्पांना  विकसित करण्याची कारवाई गतीने पूर्ण करावी. कामे करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करावीत. बापगाव व काळडोंगरी येथील संरक्षक भिंतीचे बांधकाम करून संरक्षित करावे. बापगाव हे निर्यातक्षम हब म्हणून विकसित करून, याठिकाणी स्मार्ट योजना राबवावी. याठिकाणी विभागीय पणन अधिकाऱ्यानी वारंवार भेटी देवून आढावा घ्यावा. तळेगाव दाभाडे येथे ‘आंतरराष्ट्रीय फुल बाजार’  निर्माण करण्याची कार्यवाही वेगाने करावी.

शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळेल यादृष्टीने कृषी पणन मंडळाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. काजू फळपीक विकास योजनेअंतर्गत 1 हजार मे. टन. क्षमतेचे गोदाम उभारणी करावी. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता प्रकल्प सल्लागार नेमणुकीची कार्यवाही करावी. बाजार भावाच्या लिलावाबाबत शेतकऱ्यांना माहिती होण्याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठ्या आकाराची स्क्रीन लावण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अतिक्रमण होणार नाही, याबाबत दक्षता घ्या.

राज्यातील सर्व बाजार समित्या ‘ई – नाम’शी जोडणार

देशांतर्गत कृषी उत्पन्न बाजार समित्या एकत्रितपणे जोडणाऱ्या ई- नाम प्रणालीचा राज्यात प्रभावीपणे वापर होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा. तसेच अनेक बाजार समिती यापूर्वी ई-नाम प्रणालीशी जोडल्या गेल्या आहेत. आता पुन्हा नव्याने राज्यातील 16 कृषी उत्पन्न बाजार समित्या ई- नामशी जोडल्या जाणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अद्यावत ठेवल्या जाणार आहेत.

बाजार समित्यांनी आपला परिसर विकसित करण्याकरिता उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर भर द्यावा, असे सांगून ते पुढे म्हणाले, कृषी पणन मंडळाची कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडील थकीत कर्ज वसुलीबाबत कार्यवाही करावी. कृषी पणन मंडळाच्या  ताब्यातील जागेचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे. कृषी पणन मंडळात प्रकल्प सल्लागाराची नेमणूक करावी. कामकाजात पारदर्शकता राहील याकरिता विहित पद्धतीचा अवलंब करुन कार्यवाही करावी, याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबतच तज्ज्ञ सल्लागाराची मदत घ्यावी. प्रलंबित कामाबाबतचे प्रस्ताव शासनास सादर करावे, अशा सूचनाही श्री. रावल यांनी दिली.

काजू उद्योगांना चालना देणार

येणाऱ्या काळात काजू उद्योगांना चालना देण्यासाठी प्रभावी धोरण बनवले जाणार असून, राज्याचा काजू उद्योग विकसित व्हावा, देशाच्या आणि जगाच्या बाजारपेठेत महाराष्ट्राचा काजू मोठ्या प्रमाणावर विक्री करता उपलब्ध व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या संचालक मंडळाच्या  बैठकीत श्री. रावल यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने व्हिएतनाम देशाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योग उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. राज्यातील काजू प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करण्यासाठी योजना तयार करावी. काजू प्रक्रियेबाबत उद्योग उभारुन अधिकाधिक उद्योजक निर्माण करावेत. यामध्ये प्रोत्साहनपर निधी देण्याबाबततही विचार करावा. जागतिक पातळीवर काजू पिकाचे गुणवत्तापूर्वक उत्पादन वाढविण्यावर मंडळाने भर द्यावा. अपेडाच्या माध्यमातून काजू निर्यातीमध्ये वाढ करावी. महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तज्ज्ञ व्यक्ती तसेच सरव्यवस्थापकाची विहीत पद्धतीचा अवलंब करुन नेमणुकीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री श्री. रावल यांनी दिली.

ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि.०५: युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. वाचनातून प्रगल्भता येते. विविध विषयांतील माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथे आयोजित मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२४ ‘ कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि डॉ गोऱ्हे यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले.

प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष शीतल करदेकर, कार्यवाह रवींद्र गावडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, प्रत्येकाला मनासारखे वाचता येण्यासाठी स्वातंत्र्य हवे. मात्र काय वाचावे आणि काय बघावे यावर मुला-मुलींनी नियंत्रण ठेवावे. केवळ मोबाईलवर गुंतून न राहता रोज काहीतरी वाचन करावे, तरच लेखनामध्ये प्रगती होते. दुसऱ्याचे ऐकून घ्यायला शिकले पाहिजे. समाजमाध्यमावर व्यक्त होताना कायद्याच्या चौकटीत राहून लिहिण्याचा प्रयत्न करा नवीन लेखक तयार होत आहेत चांगल्या लेखनाचा अनुभव घ्या, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि इमारत दुरुस्ती पुनर्विकासासाठी निधीचा प्रस्ताव पाठवण्याबाबतही डॉ. गोऱ्हे यांनी सूचना केल्या.

शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजावेत यासाठी साहित्य संमेलने – मराठी भाषा मंत्री उदय सामंत

ग्रंथालयाकडे युवकांचा ओढा वाढविण्यासाठी ग्रंथ चळवळीने प्रयत्न करावेत. शालेय जीवनातच मुलांना राष्ट्रपुरुष समजण्यासाठी बाल, युवा आणि महिला साहित्य संमेलन यावर्षी राज्य शासनामार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

मोबाईलबरोबर पुस्तक ऐकण्याची सुविधा आहे त्याचाही विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा. मराठी संस्कृती जोपासण्यासाठी पुस्तके वाचून आत्मचिंतन करा. महाराष्ट्राची संस्कृती कशी घडली हे वाचा, ग्रंथ आणि ग्रंथालयाबद्दल अभिमान बाळगा. जिल्हा ग्रंथालयाने ग्रंथोत्सव भरविताना तो अधिक व्यापक स्वरुपात होईल असे नियोजन करावे, असेही श्री. सामंत यांनी सांगितले.

इंग्रजी आणि हिंदी यायलाच हवे, मात्र मराठीचा विसर पडू नये. मराठी भाषेकडे आदराने बघावे, विश्व मराठी संमेलनामध्ये पुस्तक आदानप्रदानाचा उपक्रम घेण्यात आला. तो उपक्रम प्रत्येक ग्रंथालयाने राबवायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करून सर्व ग्रंथालय डिजिटल करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर उभारणार असून रायगड जिल्ह्यातील गावात ही शिवाजी महाराजांचा वैशिष्ट्यपूर्ण पुतळा उभा करण्यात येणार आहे. अशा उपक्रमांमुळे पर्यटन विकास वाढीला चालना मिळेल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

प्रास्ताविकात श्री. गाडेकर यांनी वाचन संस्कृतीच्या विकासासाठी ग्रंथालय संचालनालय कटिबद्ध असल्याचे सांगितले. आभार रवींद्र गावडे यांनी मानले तर सूत्रसंचालन अमेय रानडे यांनी केले.

तत्पूर्वी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू.) मनपा अग्निशमन केंद्र, दादर-रणजित बुधकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज चौक, एस. एस. वाघ मार्ग-महात्मा गांधी चौक- महात्मा फुले रोड – शाहीर मधू कडू चौक या मार्गावरुन लेझिम आणि ढोलताशांच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली.

०००

धोंडिराम अर्जुन/ससं/

सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी : पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी

धुळे, दिनांक 5 फेब्रुवारी, 2025 (जिमाका वृत्त) :  सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला असून या आराखड्यात सात कलमी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात या सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. अशी सूचना प्रधान सचिव कृषि (विस्तार) तथा धुळे जिल्ह्याचे पालक सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा विकास आराखडा तसेच 100 दिवसांचा कृती आराखडा आढावा बैठक पालक सचिव श्री. रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्ता अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, सहायक जिल्हाधिकारी डी. सर्वानंद, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा नियोजन अधिकारी छ.रा.कनगरे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे,यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालक सचिव श्री. रस्तोगी पुढे म्हणाले की, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे (ईज ऑफ लिव्हिंग) यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्व विभागांना शंभर दिवसांचा कृति आराखड्यातंर्गत सात कलमी कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. यासाठी सामान्य नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय आदिींची माहिती नागरिकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरित्या पोहचविण्यासाठी जिल्हास्तरीय संकेतस्थळावर नागरिकांना अद्यावत माहिती उपलब्ध करुन द्यावी. संकेतस्थळावर दररोज माहिती अपडेट रहावी यासाठी मार्गदर्शीका तयार करुन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. युजरच्या दृष्टीने दररोज संकेतस्थळ अपडेट करावे. संकेतस्थळ सुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी. महापालिका, वनविभाग, बांधकाम विभाग, जिल्हा रुग्णालयासह इतर विभागांनीही जिल्ह्यातील दैनंदिन घडामोडींचे अपडेट संकेतस्थळावर नागरिकांसाठी उपलब्ध करुन द्यावे.

त्याचबरोबर शालेयस्तरावरील विद्यार्थ्यांना त्यांचे अत्यावश्यक कागदपत्रे सहज उपलब्ध होण्यासाठी 9 ते 12 वी पर्यंच्या विद्यार्थ्यांचे डी. जी. लॉकर खाते तयार करावे. तालुका, उपविभागीय तसेच जिल्हास्तरावर ई ऑफीसचा वापर करावा. सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छतागृहे नेहमी स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. जनतेच्या तक्रारींचा त्वरीत निपटारा करावा. सर्व अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जिल्ह्यात उपविभाग तसेच तालुकास्तरावर क्षेत्रिय भेटी द्याव्यात. भेटी दिल्यावर क्षेत्रीय भेटीचा फॉर्म भरण्यात यावा. क्षेत्रिय भेटीची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा सूचना विज्ञान अधिकाऱ्यांनी ॲप विकसित करावे. पोलीस विभागाने जप्त केलेल्या वाहनांचे नियमानुसार निर्लेखन करावे. उद्योग व्यवसायिकांना उद्योगासाठी परवानगी सहज उपलब्ध करुन द्यावी. रुग्णालयातील स्वच्छतेबाबत नागरिकांकडून फिडबॅक घेण्यात यावा. ॲग्रिस्टॅक शेतकरी आयडी तयार करण्याच्या कामास गती द्यावी. कृषी, महसुल, ग्रामविकास विभागाने क्षेत्रीय भेटीदरम्यान या कामांचा आढावा घ्यावा. सीएससी सेंटरधारकांना ॲग्रिस्टॅक शेतकरी आयडी  सोबत प्रधानमंत्री आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सूचना द्याव्यात. सर्व शासकीय दस्ताऐवजांचे डिजिटायझेशन करुन ते सहज उपलब्ध होण्यासाठी त्यास कोडवर्ड द्यावेत.

नवीन शाळांचे तसेच वर्गखोल्यांचे बांधकाम सामाजिक दायित्व निधीतून करावे. नविन शाळेचे बांधकाम करतांना शाळा व अंगणवाडीचे बांधकाम एकाच ठिकाणी करावे. शासकीय कार्यालयाचे सर्व्हेक्षण करुन शक्य असेल त्या शासकीय कार्यालयात सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करावा. अनेर, अक्कलपाडा, लळींग येथे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात. शंभर दिवसांच्या कृति आराखड्यातंर्गत सात कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात चांगल्याप्रकारे अंमलबजावणी होत असल्याबद्दल पालकसचिव श्री. रस्तोगी यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2024-2025 मधील मंजुर तरतूद, प्राप्त निधी, झालेल्या खर्चाचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना सन 2025-2026 चा प्रारुप आराखडा तसेच जिल्हा विकास आराखड्याच्या माहितीसह जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्पांची माहिती पीपीटीद्वारे दिली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नरवाडे, पोलीस अधीक्षक श्री. धिवरे, महापालिका आयुक्त श्रीमती दगडेपाटील यांनी आपआपल्या विभागाचा तर निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गावंडे यांनी महसुल विभागाचा शंभर दिवासांच्या कृति आराखड्यातंर्गत सात कलमी कार्यक्रमाची माहिती बैठकीत दिली.

‘ओटीएम २०२५’ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाने भूषविले यजमानपद

मुंबई, दि. ०५: वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे मे.फेअर फेस्ट मीडिया लि. यांच्या वतीने आशियातील सर्वात मोठा ट्रॅव्हल ट्रेड शो ‘आऊटबाऊंड ट्रॅव्हल मार्ट २०२५’चे (ओटीएम) पार पडला. केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या ट्रेड शो मधील महाराष्ट्र दालनाला भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांनी केले.

महाराष्ट्रातील 70 हून अधिक भागधारकांचा महाराष्ट्र दालनात सहभाग

जागतिक स्तरावर पर्यटनाला चालना देण्यासाठी दरवर्षी मुंबईत या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे प्रदर्शन 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडले. राज्यात प्रदेशनिहाय असलेली पर्यटनस्थळांची माहिती देखील ‘ओटीएम’च्या माध्यमातून देण्यात आली. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत 70 हून अधिक भागधारक यामध्ये सहभागी होते. या प्रदर्शनामुळे राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र, त्या ठिकाणी जाण्याची सोय, उपलब्ध सेवा सुविधा इ. माहिती पर्यटकांना उपलब्ध  करून देण्यात आली. या दालनात पर्यटन स्थळांची  माहिती व पर्यटन व्यावसायिकांशी परस्पर संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.

ओटीएम प्रदर्शनात दरवर्षी ६० देशांतील २,१०० प्रदर्शक, ३० राज्य आणि ४० हजारांहून अधिक भागधारक सहभाग घेतात.  या ट्रॅव्हल ट्रेड शोमध्ये पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासाठी देश-विदेशातील अनेक भागधारकांची दालने आहेत. देश-विदेशातील पर्यटन क्षेत्रातील परस्पर व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करणे व पर्यटनाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

०००

संध्या गरवारे /वि.सं.अ/

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल – इंदापूर टप्प्याचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई, दि. ०५: राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (जुना क्र. 17) च्या चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे. यातील पनवेल ते इंदापूर या टप्प्याचे संपूर्ण काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दिली आहे. तसेच सध्या पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्यात सेवा रस्ता पूर्ण करण्याचे काम प्रगतीपथावर असून मुख्य रस्त्याच्या व्हाईट टॉपिंग अर्थात पीक्यूसीचे पूर्ण झाले असल्याचेही प्राधिकरणाने कळविले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल ते इंदापूर दरम्यान राष्ट्रीय महमार्ग क्र 66 च्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम दोन टप्प्यामध्ये सुरू असून पहिला टप्पा पनवेल ते कासू आणि दुसरा टप्पा कासू ते इंदापूर असा आहे. या परिसरात होणारा मुसळधार पाऊस आणि हवामानाचा विचार करून हा रस्ता मजबूत आणि टिकाऊ होण्यासाठी कठोर काँक्रीट रस्ते (रिजिड पॅव्हमेंट) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रस्त्याच्या खालीलबाजूसही मजबूत आणि टिकाऊ कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे.

पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची जबाबदारी मे./स. सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे होते. परंतु, कंत्राटदाराने प्रकल्पाच्या अटी पूर्ण न केल्याने 17 नोव्हेंबर 2021 रोजी करार रद्द करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याचे काम दोन कंपन्यांना देण्यात आले असून पनवेल ते कासू या 42 किलोमीटरच्या रस्त्याचे काम मे.स.जे.एम.म्हात्रे या कंत्राटदाराला जानेवारी 2023 मध्ये 151.26  कोटीं रुपयांच्या करारासह देण्यात आले. एप्रिल 2023 मध्ये अधिकृत कामाला सुरुवात झाली.

मुख्य मार्गावर पांढऱ्या टॉपिंगचे (काँक्रिट) काम पूर्ण झाले असून फक्त एका अंडरपासच्या ठिकाणी काम अपूर्ण आहे. मात्र, सेवा रस्त्याचे काम पूर्ण असल्याने संपूर्ण चार लेन मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे.

कासू ते इंदापूर 42 किलोमीटर रस्त्याचे काम मे.स. कल्याण टोलवे या कंत्राटदाराला ऑक्टोबर 2022 मध्ये 332 कोटी रुपयांच्या करारासह देण्यात आले. नोव्हेंबर २०२२ मध्ये अधिकृत कामाला सुरुवात झाली. 42.3 कि.मी.पैकी 30 कि.मी. मुख्य मार्गाचे काँक्रिट काम पूर्ण झाले आहे, तसेच कंत्राटदाराने रस्ता वाहतुकीसाठी चालू ठेवला आहे.

पनवेल-इंदापूर (NH-६६) या विभागातील शिल्लक कामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ/

‘कॅरी ऑन योजनेसंदर्भात’ विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ०५ : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी ‘कॅरी ऑन योजना’ लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठांच्या पातळीवर एक समानता ठेवावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ई – बैठक झाली. या बैठकीला सर्व विद्यापींठाचे कुलगुरू, कुलसचिव(ऑनलाइन), उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच राज्यभरातील विविध अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, काही वेळा शैक्षणिक कारणांमुळे किंवा अन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी येतात, त्यांना पुन्हा संधी  देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासातील अडथळे दूर करण्यासाठी ‘कॅरी ऑन योजनेचा’ उपयोग होतो. मात्र याबाबत सर्व विद्यापींठाच्या पातळीवर एकसमानता असली पाहिजे. यासाठी कालबद्ध नियोजन करावे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ‘कॅरी ऑन योजनेच्या माध्यमातून’  विद्यार्थ्यांना या वर्षासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात यावी, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...