बुधवार, जून 18, 2025
Home Blog Page 38

सिंगल युज प्लास्टिकचा भस्मासूर रोखायलाच हवा अन्यथा परिस्थिती गंभीर – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

वैद्यनाथ मंदिरात कापडी पिशवी वेडिंग मशीनचे उद्घाटन; आनंदधाम येथे वृक्षारोपण तर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे केले आवाहन

परळी वैजनाथ, दि. ०२ – पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळेच पर्यावरणाला घातक असणाऱ्या एकल प्लास्टिक वापराचा भस्मासूर आपल्याला रोखायलाच हवा, यासाठी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक उपयोग करावा. त्याचबरोबर आपला परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी कचरामुक्त परिसरावरही लक्ष केंद्रित करून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक अशा वृक्षारोपणाकडेही प्रत्येकाने लक्ष द्यावे. एवढेच नाही तर एक झाड आई-वडिलांसाठी तर एक झाड हे आपल्या सृष्टीमातेसाठी लावावे आणि त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे आज केले.

परळी शहरातील आनंदधाम येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षारोपण, पर्यावरण विभाग व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने वैद्यनाथ मंदिरात ‘नो प्लास्टिक’ उपक्रमाअंतर्गत कापडी पिशवी मशीनचे उदघाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वैद्यनाथ देवल कमिटीचे राजेश देशमुख, ज्येष्ठ नेते दत्तापा इटके, शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे, उप जिल्हाधिकारी अरविंद लाठकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगरपरिषद मुख्याधिकारी कांबळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. कुरमूडे आदी उपस्थित होते.

मंदिर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभही पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक वृक्ष माॅ के नाम’ हा उपक्रम जाहीर केला आहे. यामध्ये एक आपली आई जीने आपल्याला जन्म दिला तिच्यासाठी एक वृक्ष व दुसरी आपली आई म्हणजे ही सृष्टी, तिच्या संवर्धनासाठी एक वृक्ष लावला पाहिजे. त्याचे संवर्धन केले पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. वृक्षारोपणाचे कार्यक्रम केवळ राजकीय स्वरूपात करू नका. फोटो पुरते करू नका. तर ते वृक्ष जगवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा असे आवाहन पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी केले.

प्लास्टिकमुक्तीचा दृढ संकल्प करा आणि कचरामुक्तीची कास धरा !

सध्या पर्यावरण विभागाच्या वतीने अधिकाधिक प्लास्टिक मुक्तीवर भर दिला जात आहे. या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले जात असून प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला पाहिजे. यापुढे एकल प्लास्टिक वापरावर बंधने आणून अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये ही जाणीव जागृती निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असून सर्व देवालयांशी व देवस्थानांशी बोलून याबाबत आपण पुढचे पाऊल टाकणार आहोत. नागरिकांनी अधिकाधिक कापडी पिशव्यांचा वापर करावा त्यासाठी घरातील पिशवी आणावी किंवा आपण ठिकठिकाणी कापडी पिशव्यांचे मशीन बसवणार आहोत याचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.

लोकसहभाग महत्वाचा

पर्यावरण संवर्धनाचे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र हे केवळ प्रशासकीय पातळीवरच मर्यादित राहू नयेत यासाठी जास्तीत जास्त लोकसहभागातून हे उपक्रम यशस्वी होतील. यासाठी लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची माझ्यापासून सुरुवात करणार असून यापुढे माझ्या परळीतील यश:श्री व मुंबईतील रामटेक या शासकीय निवासस्थानी जे अभ्यागत मला भेटायला येतील त्यांनी प्लास्टिक पिशव्या मधून आणलेले बुके आणू नयेत. एवढेच नाही तर मला भेटायला येणाऱ्यांनी हातात प्लास्टिक पिशव्या घेऊन बुके, हारतुरे आदी आणले तर त्यांना प्रवेश बंदी केली जाईल. अधिकाधिक प्लास्टिक मुक्तीसाठी आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आपण प्लास्टिक मुक्तीची व स्वच्छतेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे असे आवाहनही मंत्री श्रीमती मुंडे यांनी केले.

मध्यप्रदेशातील स्वच्छतेसारखे आपले राज्यही स्वच्छ करुया

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, मध्य प्रदेशातील स्वच्छता जर बघितली तर ती खरोखरच कौतुकास्पद आहे. मध्य प्रदेशातील स्वच्छतेचे कौतुकच केले पाहिजे. परंतु महाराष्ट्रात मात्र अशा पद्धतीची स्थिती सध्या तरी नाही हे चिंताजनक आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जबाबदारीपूर्वक काम करावे त्याबरोबरच नागरिकांनीही स्वच्छतेच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात प्लास्टिक मुक्त आणि कचरा मुक्त परिसर यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आपल्याकडे याबाबतीत नागरिकांनी जबाबदारीने या गोष्टीचे तंतोतंत पालन केले तर काही दिवसातच आपले महाराष्ट्र राज्य ही स्वच्छ व सुंदर परिसराचे होईल यात काहीही शंका नाही. सध्या पर्यावरण विभागाच्या वतीने अधिकाधिक भर दिला जात आहे. या दृष्टीने सर्व ते प्रयत्न केले जात असून प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले.

राज्यभरातील मंदिरांशी चर्चा करणार

राज्यभरातील मंदिरांशी चर्चा करुन कापडी पिशव्या वापरण्याचा आग्रह धरण्यात येणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत, या मंदिरांमधून सिंगल युज प्लास्टिकचा वापर कमी व्हावा त्याऐवजी कापडी पिशव्या वापरल्या जाव्यात याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत अनेक संस्थांशी पत्रव्यवहार देखील केला आहे. त्या दिशेने काम करत असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
••••

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

मुंबई, दि. २ :- अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधण्यात आला.  या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायजरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या प्रवाशांचा पुढील प्रवास  सुरू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६.६ मिमी पावसाची नोंद

दिनांक १ जून पासून ते २ जून सकाळपर्यंत राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६.६ मिमी,  रत्नागिरी जिल्ह्यात ११.४ मिमी, मुंबई उपनगर ८.० मिमी, कोल्हापूर ७.९ मिमी, रायगड ४.४ मिमी इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

दिनांक १ जून रोजी सोलापूर व नाशिक जिल्ह्यात विहिरीत पडणे या घटनेमुळे प्रत्येकी एक व्यक्ती मृत झाली असून ठाणे जिल्ह्यात आगीच्या घटनेत तीन व्यक्ती जखमी झाल्या असल्याची माहिती राज्य आपत्कानील कार्य केंद्राकडून देण्यात आली आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एनटीपीसीच्या सामाजिक दायित्व निधीतून एम्समध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटसाठी अर्थसाहाय्य

मुंबई, दि. २ : विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजिकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी एम्स नागपूर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत एनटीपीसीने या युनिटसाठी अर्थसाहाय्य दिले आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या कराराअंतर्गत एनटीपीसी त्यांच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) उपक्रमांतर्गत एम्स नागपूरला आर्थिक मदत करणार आहे. ही मदत बोन मॅरो ट्रान्सप्लांट (बीएमटी) युनिट उभारणी आणि गरजू रुग्णांवर उपचार साहाय्यासाठी वापरण्यात येणार आहे. या केंद्राचा फायदा विदर्भातील लोकांसोबत विशेषतः लहान मुलांच्या उपचारासाठी होणार आहे.

एम्स नागपूरमध्ये पहिल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्राच्या स्थापनेसाठी एनटीपीसी कडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीचे आभार व्यक्त केले. हे केंद्र मध्य भारतातील संपूर्ण जनतेसाठी, विशेषतः लहान मुले, आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी, एक महत्त्वाची वैद्यकीय सुविधा ठरेल. मध्य भारतात सिकल सेल आजार आणि इतर अनुवंशिक रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून, या रोगांचे उच्चाटन करणे हे देशाचे राष्ट्रीय उद्दिष्ट असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. एनटीपीसी कडून या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याने एम्स नागपूरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध होणार असून, या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

साहाय्याचा तपशील :: बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या पायाभूत सुविधांसाठी, रुग्णांच्या उपचार व औषधोपचारासाठी साहाय्य देण्यात येणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये : हे युनिट एम्स नागपूरच्या एमआयएचएएन येथील परिसरात उभारले जाणार आहे. यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसह, प्रत्यारोपणासाठी आवश्यक तपासण्या, औषधे, बाह्य तज्ज्ञांच्या सेवा व रुग्णोपचाराचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे. एनटीपीसीच्या निधीच्या अटींनुसार, युनिटमध्ये एनटीपीसीचा लोगो आणि सीएसआर अंतर्गत साहाय्याचे स्पष्टपणे उल्लेख केले जाणार आहे.

एनटीपीसी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकास क्षेत्रात सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत विविध प्रकल्प राबवत आहे. एम्स नागपूरसारख्या शासकीय वैद्यकीय संस्थेसोबत भागीदारी करून समाजातील गरजू घटकांपर्यंत अत्याधुनिक उपचार सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

एम्स नागपूर हे प्रगत वैद्यकीय सेवा व संशोधनासाठी झपाट्याने नावारूपाला येत आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिटच्या स्थापनेमुळे ब्लड कॅन्सर व इतर गंभीर आजारांवरील उपचार नागपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांना मिळणार असून, त्यांना दिल्ली किंवा मुंबईसारख्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

बंदरे विभागाने लोकाभिमुख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा – मंत्री नितेश राणे

Oplus_131072

मुंबई, दि. २ : बंदरे विभागाने मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पहिल्या तीन विभागांमध्ये क्रमांक मिळवण्याच्या दृष्टीने काम करावे. तसेच अधिक लोकाभिमुख होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

मंत्रालयात १५० दिवसांच्या अनुषंगाने बंदरे विभागाचा आढावा मंत्री श्री. राणे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. राणे म्हणाले, १५० दिवसांच्या कार्यक्रमासाठी बंदरे विभागाने परिपूर्ण तयारी करावी. वेगवेगळ्या राज्यात बंदरे हाताळणीसाठी वापरण्यात येत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा विभागाने अभ्यास करावा. बोटींना ट्रॅक करण्यासाठी ॲप विकसित करावे. बंदरे विकास आणि बोटींच्या नियंत्रणासाठी विभागाची स्वतःची आधुनिक व्यवस्था विकसित करावी. या सर्व गोष्टींसाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन करावे. सविस्तर अभ्यास करून त्याचा आराखडा तयार करावा. प्रलंबित असलेली पदभरती तसेच रिक्त पदांवरील नियुक्त्या मार्गी लावाव्यात. ‘आय गॉट’ नोंदणी करावी, हरीत बंदर उभारणीवर भर द्यावा, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

‘वॉटर टॅक्सी’ सुरू करण्यासाठी बंदरे विभागाने नियोजन करावे – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. २ : गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याबाबतचे नियोजन पूर्ण करावे. तसेच गरजेच्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

वॉटर टॅक्सी सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. बैठकीस परिवहन, बंदरे आणि हवाई वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाचे ब्रिजेश सिंघल, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रदीप बढीये यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Oplus_131072

मंत्री श्री. राणे म्हणाले, वॉटर टॅक्सी सुरू करण्यासाठी टर्मिनल उभारणी टप्प्याटप्प्याने सुरू करावी. तसेच यासाठी विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करावेत. माल वाहतुकीसाठीही जेट्टी उभारण्यासाठी ठिकाणे निश्चित करावीत. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. या सेवेमुळे नवी मुंबईतील विविध भाग मुंबईशी जोडला जाईल. प्रवासाची वेळ सुमारे ४० मिनिटे असणार आहे. या वॉटर टॅक्सी सेवांमध्ये इलेक्ट्रिक बोट्सचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाला फायदा होईल. तसेच मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल,  असेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक दि.२ : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर नाशिकच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ.पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, रुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. हा मंत्र आपण विसरल्याने जीवनशैलीशी निगडित विविध आजार आपल्याला होतात. गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे हा हॉस्पिटल काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा इथे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

०००००

‘विकसित महाराष्ट्र – २०४७’ उपक्रमांतर्गत धोरणासाठी नागरिकांच्या सूचना

नागरिकांना आवाहन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी आखण्यात येणाऱ्या प्रस्तावित धोरणाच्या निर्मितीत लोकसहभाग असावा या हेतूने नागरिकांकडून विविध सूचना मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र शासनाने ‘ विकसित महाराष्ट्र – २०४७’ या विशेष उपक्रमांतर्गत लघु, मध्यम आणि दीर्घ काळासाठी राबवायच्या कार्यपद्धतीसाठी धोरण तयार करण्याचे ठरविले आहे. त्याअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी आखण्यात येणाऱ्या प्रस्तावित धोरणाच्या निर्मितीत लोकसहभाग असावा या हेतूने नागरिकांकडून विविध सूचना मागविण्यात येत आहेत.

000

पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर भर – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा  दि. १: सातारा जिल्हा बहुतांश डोंगरी व दुर्गम आहे. या भागात कायदा व सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला वाहनांसह आत्याधुनिक साहित्य देण्यात येत आहे. पोलीस विभाग अत्याधुनिक करण्यावर शासनाचा भर आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाने वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतुल सबणीस यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


पोलीस विभागाकडून चांगल्या कामाची अपेक्षा सर्व जण करतात यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून 15 स्कॉर्पीओ, 1 थार, 4 मोठ्या बसेस,दामिनी पथकासाठी 16 प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत. दामिनी पथकातील महिला पोलीस शाळा, महाविद्यालय, क्लासेस व गर्दीच्या ठिकाणी गस्त घालतील.

पोलीस विभागाला आवश्यक त्या सर्व गोष्टी दिल्या जातील. सातारा पोलीस दलाचे काम उठावदार आहे ते आणखीन उठावदार होण्यासाठी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

जिल्हा वार्षिक योजनेतून 15 स्कॉर्पीओ, 1 थार, 4 मोठ्या बसेस   दामिनी पथकासाठी 16 प्लेझर स्कूटी मिळाल्या आहेत. पोलीस विभाग सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करीत आहे. सातारा पोलीस विभाग या पुढेही उत्तम पद्धतीने काम करील असे पोलीस अधीक्षक श्री. दोशी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री श्री. देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून वाहने मार्गस्त केली.
0000

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आरगच्या बौद्ध विहार इमारतीची पाहणी

सांगली, दि. १ (जि. मा. का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या आरग (ता. मिरज) येथील बौद्ध विहार इमारतीची पाहणी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केली. यावेळी माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी इमारतीच्या दर्जेदार कामाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना करून येत्या 15 तारखेपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी केल्या.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेवून पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते आदि उपस्थित होते.

 लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारतीचेही लोकार्पण

 दरम्यान तत्पूर्वी मिरज येथील वार्ड क्रमांक 20 मध्ये बांधण्यात आलेल्या लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारतीचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महापालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण व समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह महापालिकेचे माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, हे सुंदर असे बौद्ध विहार उभारण्यात आले असून, यातील ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. या ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवावे. या भागातील विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, या भागातील विविध विकासकामांसाठी प्रस्ताव द्यावेत. ती कामे मार्गी लावू, अशे त्यांनी यावेळी आश्वासित केले.

00000

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे ⁠थ्री स्टार करणार, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

सांगली, दि. १ (जि. मा. का.) : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसे निर्माण केली जातात. समाज घडवला जातो. सर्व सामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून, राज्यातील १२५ वसतिगृहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज केले.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मिरज तसेच १२५ वी जयंती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सांगली या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतींचे उद्घाटन व लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री व आमदार डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिरज येथे रमा उद्यान, मेडिकल कॉलेज ग्राऊंडच्या शेजारी, वसतिगृह इमारत ठिकाणी आयोजित या कार्यक्रमास बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सामाजिक न्याय विभागाच्या पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण मेघराज भाते उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात १२५ वसतिगृहात उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शासकीय इमारतीत विद्यार्थी वसतिगृहे असावीत, या दृष्टीने वाटचाल सुरू केली. भविष्यात भाडे तत्त्वावरील वसतिगृहे शासकीय इमारतीत व्हावीत, यासाठी प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.  

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, विद्यार्थी दशेत असताना अनेक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जडणघडण वसतिगृहात झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही देण आहे. मागासवर्गियांची मुले या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया इथे घातला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना थ्री स्टार प्रमाणे सोयी सुविधा द्याव्यात. वसतिगृहात अंतर्गत व बाह्य स्वच्छता नियमित ठेवावी, असे त्यांनी सूचित केले.

आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आपण सामाजिक न्याय मंत्री पदावर असताना मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे शासकीय इमारतीत असावीत, विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केले. वसतिगृहातील सुविधा दर्जेदार असाव्यात, विद्यार्थ्यांना सुरक्षित, संरक्षित शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. तालुक्यात १७ बौद्ध विहार बांधली. जिल्ह्यातील दोन वसतिगृहे खाजगी जागेत असून, ती शासकीय जागेत असावीत यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल, त्यास मान्यता द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात सहायक आयुक्त समाजकल्याण मेघराज भाते म्हणाले, जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या सहा निवासी शाळा आहेत. तसेच २१ शासकीय वसतिगृहे असून, त्यापैकी दोन वसतिगृहे वगळता अन्य सर्व वसतिगृहे शासकीय जागेत आहेत. या वसतिगृहात शिक्षण घेऊन अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते दोन्ही वसतिगृहांचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले.

 

00000

ताज्या बातम्या

महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाला सर्वोत्तम कामगार रुग्णालय बनविणार – मंत्री प्रकाश आबिटकर

0
मुंबई, दि. १८: महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाला गतवैभव मिळवून देत राज्यातील सर्वोत्तम कामगार रुग्णालय बनविणार असल्याचा मानस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश...

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित – मंत्री गिरीश महाजन

0
मुंबई, दि. १८ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी नद्या, नाले  भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती...

मराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक – मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १८ : राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ नुसार मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे...

लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंतांना साहित्य अकादमी पुरस्कार

0
मुंबई, दि. १८: साहित्य अकादमीच्या आज जाहीर झालेल्या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये मराठी साहित्यातील दोन साहित्यिकांचा समावेश आहे. लेखक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळी डोळे’...

शेतमजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन ठोस पावले उचलणार – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
मुंबई, दि. १८ :  शेतीतील उत्पादकता वाढावी तसेच शेतीचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी शेतीतील मजुरीविषयक धोरण ठरविण्याबाबत शासन ठोस पावले उचलणार आहे. कमी...