शनिवार, जून 21, 2025
Home Blog Page 49

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया १५ जूनपासून सुरू

मुंबई, दि. ३०: भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी प्रणालीवर नविन तसेच नूतनीकरण अर्जांसाठी ऑनलाईन स्वीकृती प्रक्रिया २५ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील नूतनीकरण अर्ज तसेच २०२४-२५ मधील नविन अर्ज सादर करण्यासाठी ३१ मे २०२५ पर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे १५ जूनपासून ऑनलाईन स्वीकारण्यात येतील.

सर्व महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर प्राप्त अर्जांची प्रथम प्राधान्याने पडताळणी करून ते ऑनलाईन पद्धतीने मंजूर करावेत. त्यानंतर संबंधित अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांच्या लॉगिनवर तत्काळ पाठवावेत.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक पुढील प्रमाणे:

कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम इ. 11वी, 12 वीसाठीचे (सर्व शाखा, एमसीव्हीसी, आयटीआय आदी) नवीन अर्ज व नुतनीकरणाचे प्राप्त अर्ज 15 जून ते 15 ऑगस्ट 2025  या मुदतीत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत. वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम, द्वितीय व तृतीय सर्व शाखा कला, वाणिज्य, विज्ञान आदींसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज 15 जून ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत.

वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रथम, द्वितीय, तृतीय अंतिम वर्ष (सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन अभ्यासक्रम, फार्मसी व नर्सिंग अभ्यासक्रम) आदींचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज महाविद्यालयांनी 15 जून ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अग्रेषित करावेत.

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीत यांची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर सुनिता मते यांनी केले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ११४४ कोटींच्या योजनांचा आढावा

मुंबई, दि. ३०: मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा माहिती, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत २०२४-२५ च्या योजनांची अंमलबजावणी, खर्चाचे विश्लेषण तसेच २०२५-२६ च्या नव्या योजनांची आखणी यावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात मंजूर कामांसाठी उपलब्ध असलेल्या ₹१०८८.७७ कोटींपैकी ९९.८ टक्के म्हणजेच ₹१०८६.७५ कोटी निधी विविध यंत्रणांना वितरित करण्यात आला होता.

यावेळी २०२५-२६ साठी एकूण ₹११४४.०२ कोटींच्या प्रस्तावित योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजना ₹१०६६ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ₹७१ कोटी, तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना ₹७.०२ कोटींचा समावेश आहे.

नवीन प्रस्तावांमध्ये विशेषतः झोपडपट्टी सुधारणा, पोलीस यंत्रणा बळकटीकरण, महिला व बालकल्याण आणि अपारंपरिक ऊर्जा उपक्रमांचा समावेश आहे.

प्रमुख कामे –

  • झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन : ₹५९७.४२ कोटींची नागरी दलितेतर वस्ती सुधारणा, ₹१२५ कोटींच्या संरक्षक भिंती, ₹६४.७४ कोटी दलितवस्ती योजना, तसेच ₹४.५ कोटींचे कौशल्य विकास कार्यक्रम.
  • पोलीस व तुरुंग विभाग : पायाभूत सुविधांसाठी, वाहने व संगणकीय साधने पुरवण्यासाठी ₹१४.०६ कोटींचा निधी
  • आपत्कालीन व महसूल यंत्रणा : गतीशील प्रशासनासाठी ₹४.५ कोटींचा निधी.
  • महिला व बाल विकास : बालगृहांसाठी सीसीटीव्ही आणि संस्थांचे बळकटीकरणासाठी ₹१४.०६ कोटी निधी.
  • सौरऊर्जा उपक्रम : ₹२ कोटींच्या सौर संचांची उभारणी.

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील समस्या मांडल्या असून, त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

बैठकीस खासदार, आमदार, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

०००

संजय ओरके/विसंअ/

गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा गौरव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात सर्वांचे योगदान आवश्यक – पालकमंत्री नितेश राणे

• दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबध्द
• दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
• सिंधुदुर्गला विकसित जिल्हा बनविणार

सिंधुदुर्गनगरी दि 30 (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या  जिल्ह्याचा समावेश आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रशासनातील अधिकारी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुका स्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा बँकेच अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले आहे. राज्य स्तरावरील मोहिमेमध्ये क्रमांक पटकाविलेल्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री महोदयांनी सत्कार केला आणि त्यांच्या  पाठीवर थाप मारली. आणि मी तेव्हाच ठरविले होते, की या मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले असेल त्यांचा मी जिल्हावासियांच्या वतीने आभार मानणार आणि त्यांचा सत्कार करणार. तुम्ही चांगलं काम करत असाल, तर तुमच्या मागे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नेहमी उभा आहे. जनतेचे सेवक म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना सेवा द्या. चांगले काम करणाऱ्यांना मी नेहमीच शाबासकी देणार.

आज तुम्ही चांगलं काम कराल, तर आम्ही जिल्हावासीय तुमच्या सोबत सदैव आहोत असेही ते म्हणाले. जनतेच्या हिताचे निर्णय घ्या, विविध क्षेत्रात नव नवीन प्रयोग करा, जगामध्ये तसेच देशामध्ये जे चांगलं आहे ते तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणा. तुम्ही अशाच पद्धतीने प्रशासनाच्या माध्यमातून चांगले काम करत जा, काहीतरी नवीन घडवा, काहीतरी नवीन प्रयत्न करा आणि आपल्या जिल्ह्याला पुढे घेऊन जा.  150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळावे ही माझी अपेक्षा आहे. पुढील पाच वर्षामध्ये जिल्ह्याला पुढे घेऊन जायचे आहे. यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. म्हणून खासदार राणे साहेबांनी देखील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.   जिल्ह्यातील शाळांचा स्तर उंचवला पाहिजे, त्यातून दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.  कोकणातल्या संपूर्ण निकालामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.  तसेच जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षणासाठी चांगले वातावरण, कायदा आणि सुव्यवस्था योग्य पद्धतीने राखणे, जिल्ह्याची प्रतिमा सुधारणे या सगळ्या गोष्टींकडे आम्ही फार बारकाईने लक्ष देत आहोत. आज विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आहे तो त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणांचा सत्कार झालेला आहे. तुम्ही दहावी-बारावी मध्ये एवढे चांगले मार्क्स मिळवलेले आहेत, एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे तुम्ही पुढेही अशाच चिकाटीने अभ्यास करत राहा. मी तुम्हाला आणि तुमच्या पालकांना विश्वास देतो की तुमच्यासाठी दर्जेदार शिक्षणाची दालने आम्ही निश्चितपणे उघडे करू. त्या दिशेने आमच्या सगळ्यांची वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.

इयत्ता १० वी मध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील. कु.आर्या अजित राणे आणि कु. श्रेयश चंद्रशेखर बर्वे आणि  कुडाळ हायस्कूल मधील कु.चैतन्या रुपेश सावंत या तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्मितेश विनोद कडुलकर, रेश्मा पालव, विधी विरेंद्र चिंदरकर,  ध्रुव आनंद तेंडुलकर,  हर्षदा किसन हडलगेकर  या पाच विद्यार्थ्यांनी ९९.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर नक्षत्रा राजेंद्र काळे या विद्यार्थीनीने ९९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. इयत्ता बारावी मधील विज्ञान शाखेतील जाधव अथर्व अतुल, तेंडुलकर मधुकर विवेक, पालव काशीराम विठोबा, कला शाखेतील दळवी तनिषा विनय, कोकरे प्रियंका प्रकाश, मांजरेकर मानसी पांडुरंग तर वाणिज्य शाखेतील भोगटे आयुषी रुपेश, वाळुंजे चित्राली राजेश, परब तनुज निलेश या विद्यार्थ्यांना देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली शासकीय कार्यालये-
१. उपविभागीय कार्यालय, कणकवली, (३ रा क्रमांक)
२. तहसिलदार कार्यालय, कणकवली (२ रा क्रमांक)
३. गट विकास अधिकारी कार्यालय, कणकवली (३ रा क्रमांक)
४. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वेंगुर्ला (३ रा क्रमांक)
५. पोलिस निरीक्षक, मालवण (३ रा क्रमांक)
६. उप अभियंता कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , देवगड (३ रा क्रमांक)
७. सहायक पशुसंवर्धन कार्यालय, (२ रा क्रमांक)
८. पशुधन विकास अधिकारी कार्यालय, कणकवली (प्रथम क्रमांक)
९. मख्याधिकारी कार्यालय, वेंगर्ला (३ रा क्रमांक)
१०. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, सावंतवाडी (२ रा क्रमांक)

000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रम  – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ३०: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्यक असल्याने त्यांच्या ३०० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ३१ मे २०२५ रोजी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

अहिल्यादेवी या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, कर्तबगार व दूरदृष्टी असणाऱ्या स्त्रीशक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी धार्मिक सहिष्णूता, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, न्यायप्रविष्ट प्रशासन आणि स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभाराची उभारणी केली. त्यांचे कार्य समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक असून, ते महाराष्ट्र राज्याच्या प्रगत व उन्नत वाटचालीसाठी नेहमीच पथदर्शी ठरले आहे. यास अनुसरुन ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत अधिनस्त संस्थांमध्ये कार्यालय/ दवाखाना परिसर स्वच्छता व सुशोभिकरण करणे, गाव पातळीवर वंधत्व/सर्वोपचार शिबिरांचे आयोजन करणे, फिरस्ती मेंढपाळांची भेट घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करणे, पशुधनाचे जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, करडे/कोकरे मरतूक कमी करण्याबाबत उपाययोजना करणे, मेंढपाळांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर/परिसंवादाचे आयोजन करणे, वृक्ष लागवड करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना मंत्री मुंडे यांनी दिल्या आहेत.

पशुसंवर्धन आयुक्त रामस्वामी एन. आणि पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती वर्षानिमित्त विभागाच्या मुख्यालयातही अभिवादनपर कार्यक्रम होणार आहे.

“पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमांमुळे मेंढी-शेळी पालकांशी थेट संवाद साधत शासनाचे विविध उपक्रम, योजना तसेच शेळी-मेंढी तांत्रिक व्यवस्थापनाविषयी माहिती पशुपालकांना देणे शक्य होईल. तसेच शेळी-मेंढीपालनाला आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून अधिक किफायतशीर करण्यासाठी विभागाला आवश्यक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी करणे सुलभ होईल”, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल तालुक्यातील पाणंद रस्त्याची केली प्रत्यक्ष पाहणी

नागपूर,दि. 30 :  शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादने वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहचविता यावीत यासाठी त्यांच्या शेतापासून रस्त्याची नितांत आवश्यकता प्रत्येक भागात असते. शेतकऱ्यांची ही अडचण दूर व्हावी याउद्देशाने या योजनेअंतर्गत आपण जिल्ह्यात सर्व तेरा तालुक्यात एकूण 649 कामांना मंजूरी दिली असून यापैकी 491 कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. जी कामे हाती घेतली आहेत ती  गुणवत्तेची निकष लक्षात घेऊन पूर्ण करावीत, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

काटोल तालुक्यातील नायगाव ते खाणगाव या एक किलोमीटर पाणंद रस्त्याची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: पाहणी केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान कच्चा रस्ता देण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले असल्याचे सांगितले. यात शेतकरी कोणताही वाद न आणता स्वत: पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत भिवापूर तालुक्यात 30, हिंगणा तालुक्यात 31, कळमेश्वर तालुक्यात 27, कामठी तालुक्यात 55, काटोल तालुक्यात 58, कुही तालुक्यात 73, मौदा तालुक्यात 77, नागपूर तालुक्यात 43, नरखेड तालुक्यात 57, पारशिवनी तालुक्यात 23, रामटेक तालुक्यात 32, सावनेर तालुक्यात 92, उमरेड तालुक्यात 51 अशी जिल्ह्यात एकूण 649 पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथे महाराजस्व शिबीराला भेट 

नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सुरु असलेल्या शिबीरात भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत  उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार उमेश खोडके, गटविकास अधिकारी निलेश वानखेडे व इतर अधिकारी उपस्थित होते. या ग्रामस्तरीय शिबीरात 161 नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

******

आदर्श राजमाता : पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर 

आदर्श राजा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप डोळ्यासमोर येतं, तर आदर्श राज्यकर्त्या म्हटलं की, पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव पुढं येतं. आदर्श कन्या, सुशील भार्या, सर्वगुणसंपन्न माता अन् प्रजाहितदक्ष शासक अशा वैविध्यपूर्ण भूमिकेतून त्यांनी आजीवन जनसेवा केली. इतकेच नव्हे तर, सर्वधर्मियांना विश्वासात घेऊन उत्तम राज्यकारभार केला. महत्वाचे म्हणजे हिंदू-मुस्लिम हे अहिल्यादेवी यांच्या कारकिर्दीत गुण्यागोविंदाने नांदलेत. राजकारणातून समाजकारण करून धर्मपरायणात सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या अहिल्यादेवींना हिंदू संस्कृतीतील पुण्यश्र्लोक ही उपाधी बहाल करण्यात आली. ही गोष्ट मराठी जनमानसाच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची आहे.

अहिल्यादेवी होळकर ह्या अहमदनगर जिल्ह्यामधील चौंडी गावातल्या धनगर समाजाचे माणकोजी शिंदे-पाटील यांच्या कन्या. वयाच्या बाराव्या वर्षी अहिल्यादेवी यांचा विवाह पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. परंतू काळाने घात केला अन् दुर्दैवाने 1766 साली खंडेरावांचे आकस्मिक निधन झाले. तथापि स्वतःला मोठ्या धैर्याने सावरून, मल्हारराव होळकर या पित्यासमान सासऱ्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत अहिल्यादेवींनी आपले उर्वरित आयुष्य लोकसेवेत व्यतित केले.

स्वकर्तृत्वाच्या बळावर या राजमातेने होळकरांच्या राज्याची धुरा समर्थपणे सांभाळून सर्व जाती-धर्मातील लोकांना समान न्याय दिला. वैधव्याच्या दुःखानं अन् पुत्रशोकानं व्यथित झालेल्या या कर्तृत्ववान व धाडसी मातेनं धिरोदत्तपणे पुनश्च खंबीरपणे उभं राहून होळकर साम्राज्याचा क्रांतीसूर्य तळपत ठेवला. अहिल्यादेवींनी “मरावे परी कीर्तीरूपे उरावे” ही उक्ती आदर्श राज्यकारभार करून खरी करून दाखविली.

अहिल्यादेवींनी आपल्या कारकीर्दीत हिंदू देवळांच्या व तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धाररासाठी ठोस उपाययोजना करताना मशिदी, दर्गे यांचा विसर पडू दिला नाही. त्यांच्यासाठी देखील राजकोषात आर्थिक तरतूद केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तसेच बद्रीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून सोमनाथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून त्यांनी खऱ्या अर्थानं दातृत्वाची भूमिका बजावली. नर्मदा, गंगा, गोदावरी या नद्यांवर घाट बांधल्याने, त्या कालखंडापासून पुढच्या काळातही नद्यांवर घाट बांधण्याचा पायंडा अखंडपणे चालत राहिला आहे. राज्यातल्या गोरगरीब लोकांना राजमाता ह्या नित्यनेमाने अन्नदान, वस्त्रदान अन् सणासुदीला दानधर्मही करीत असत. चारित्र्यसंपन्नता अन् स्त्रीत्वाचे वैभव जतन करून प्रपंच व परमार्थाची सांगड घालत या महान मातेनं गतकाळातील दुःखद घटनांना पाठीमागे टाकत, आपल्या जीवनाची सुव्यवस्थित घडी बसवली. या पार्श्वभूमीवरच अहिल्यादेवी होळकर यांचा रयतेत आदर्श राजमाता म्हणून नावलौकिक होता अन् आजही आहे.

पुरोगामी विचारसरणी असलेल्या अहिल्यादेवींनी कालबाह्य झालेल्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये काळानुरूप सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. विधवांचे धन जप्त करून ते राजकोषात जमा करण्याची जुलमी प्रथा त्यांनी बंद केली. विधवेला मुल दत्तक घेण्याची इच्छा असल्यास तिला तशी कायद्याने मुभा देण्यात आली. न्यायप्रक्रियेत आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याचे अहिल्यादेवींनी फर्मान काढले होते. त्या उत्तम लढवय्या होत्या. त्या राजकारणाबरोबर अर्थकारणातही पारंगत होत्या. गावोगावी लोकांसाठी जागीच न्यायनिवाडा व्हावा, यासाठी त्यांनी पंचाधिकारी नेमले होते. भिल, गोंड जमातीतील लोकांकडून पडीक जमिनीवर लागवड करून घेतली. त्याद्वारे अहिल्यादेवींनी मल्हाररावांच्या काळापेक्षा अनेक पटीने राजकोषात वृद्धी केली. प्रजेकडून कररूपात प्राप्त झालेल्या धनराशीतून जनहिताचे विविध उपक्रम राबवून प्रजेला सुखी व आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. जनसामान्यांबद्दल त्यांच्या अंत:करणात अपार करुणा होती.

उल्लेखनीय बाब म्हणजे अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात शिक्षणावर अधिक भर दिला. होळकरांची राजधानी महेश्वर हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. मराठी, हिंदी पाठशाळेतून संस्कृत भाषेचेही शिक्षण दिले जायचे. याशिवाय वेद-पुराण, शास्त्रे, वेदांत, व्याकरणाचे शिक्षण हे विद्वान-पंडितांमार्फत देण्याची व्यवस्था अहिल्यादेवींच्या कारकीर्दीत करण्यात आली होती. त्यांच्या राजदरबारात शिल्पकार, साहित्यिक, कलाकार, विद्वान-पंडित यांना विशेष मानसन्मान मिळत असे. कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांना सरकार दरबारी मानाचे स्थान होते. अहिल्यादेवींनी सैनिकी शिक्षणही घेतले होते. त्या जाबांज लढवय्या होत्या. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य टिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने त्या आपल्या सैन्यदलाला वेळोवेळी भेटी देत असत. विशेष म्हणजे अहिल्यादेवींनी आपल्या सैन्यदलात महिलांची विशेष तुकडी तयार केली होती.

अभिमानाची गोष्ट म्हणजे मोगल, टिपू, निजाम, पेशवे यांच्यावर अहिल्यादेवीच्या कर्तबगारीची मोठी छाप होती. परधर्माविषयी त्यांच्या मनात नितांत आदर व सहिष्णुता होती. “राजा हा विश्वस्तासारखा असावा अन् प्रजेचे कल्याण चिंतणारा असावा”, हा आदर्श त्यांनी आपल्या राज्यकारभारात घालून दिला होता. त्यामुळेच त्यांना एक आदर्श शासनकर्त्या म्हणून रयतेकडून सन्मान मिळायचा. अहिल्यादेवी ह्या प्रजाहितदक्ष राजमाता म्हणून साऱ्या राज्यात किर्तीमान होत्या.

आदर्श राजमाता पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पावलावर पाऊल टाकत, त्यांचासारखा राज्यकारभार या पार्श्वभूमीवर शासन जनसामन्यांसाठी लोकहिताचे निर्णय घेत आहे. पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून महिलांना एस.टी. प्रवासात सरसकट 50 टक्के सूट देण्यात आली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत गोरगरीब महिलांना माहे 1500 रुपये आर्थिक मदत राज्य शासनातर्फे देण्यात येत आहे. राज्यातील कोट्यवधी माता-भगिनींना या योजनेमुळे आर्थिक आधार मिळून त्याद्वारे त्या छोटेखानी उद्योग करून कुटुंबाला हातभार लावत आहेत. विशेष म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहताहेत. याशिवाय वयोश्री योजनेंतर्गत वयोवृद्ध महिला-पुरुषांना मोफत वैद्यकीय सुविधा व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष मोहिमेत महिलांना आरोग्य तपासणी, हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका, औषधं उपलब्ध करून देणे, यासाठी दोन कोटींचा निधी निर्धारित केला आहे.

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अशी ही बैठक महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनची पहिलीच बैठक होय. या बैठकीत चौंडीच्या सर्वंकष विकासाचा आराखडा तयार करून त्यासाठी 681 कोटी 32 लाखाची तरतूद करून तिला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टींचे येथे जाणाऱ्या नागरिकांना दर्शन होईल. इतकेच नव्हे तर गत होळकर साम्राज्याची अन् अहिल्यादेवींच्या आदर्श राज्यकारभाराची जाणीव होईल. अन् त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल. खरंतर महायुती सरकारने पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अर्पण केलेली हीच खरी आदरांजली होय.

बंधू भगिनींनो, अल्पवयात विधवा झालेल्या एका स्त्रीनं सर्वधर्मसमभावाची कास धरून सन 1765 ते 1795 अशी तब्बल 30 वर्षे इंदूर संस्थानावर अधिराज्य करून भारतीय इतिहासात जणू एक विक्रमच नोंदविला. राजमातेचा मानवतावादी दृष्टिकोन सर्वधर्मीयांना प्रिय होता. मुस्लिम समाजाचे लोक तर अहिल्यादेवींच्या इंदूर संस्थानच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मशिदीत नमाज अदा करून दुवा मागत असत. म्हणूनच सकल जनमानसात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी असे सन्मानाने म्हटले जात असे. अहिल्यादेवी म्हणजे मानवी जीवनातला अज्ञान, अध:कार, दुःख दूर करून त्यास प्रकाशमान करणारी दिव्यज्योत होती. राज्यातील सर्वधर्मीय जनतेच्या वतीने पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली अन् त्रिवार वंदन!

00000

लेखक: रणवीर राजपूत, ठाणे

निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी

 

महिलांच्या तक्रारींना पोलीस विभागाने तात्काळ प्रतिसाद द्यावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.३०  : मानसिक त्रासाच्या, छेडछाडीच्या तसेच हुंड्याबाबतच्या पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिलांच्या प्रत्येक तक्रारीला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद द्यावा व दोषींवर कडक कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस विभागाच्या शिवतेज सभागृहात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा घेतला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, पोलीस अधिक्षक तुषार दोषी यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

महिला पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, महिलांच्या येणाऱ्या तक्रारी संवदेनशिलपणे हातळाव्यात. जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने पर्यटक कास पुष्प पठार, ओझर्डे, सडावाघापूरी धबधब्याकडे येत आहेत. या पर्यटकांना हुल्लडबाजांकडून त्रास होणार नाही यासाठी पोलीस तैनात करावेत.

पोलीस विभागाला जीथे जीथे मदतीची आवश्यकता असेल त्या त्या वेळेस पालकमंत्री म्हणून संपूर्ण सहकार्य केले जाईल. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था आणखी चांगल्या पद्धतीने राखावी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस विभागाने कामांची उंची वाढवावी, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

0000

औद्योगिक आस्थापनांच्या माध्यमातून कुशल मुनष्यबळाची निर्मिती व्हावी : मंत्री मंगलप्रभात लोढा

नाशिक, दि. 30 मे, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :  औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्यातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करणे व संस्थांचा दर्जावाढ करून विकास करणे हे धोरण शासनाने निश्चित केले आहे. औद्योगिक आस्थापनांनी खाजगी भागीदारी धोरणाद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना दत्तक घेवून कुशल मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन कौशल्य विकास, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.
आज शहरातील निमा हाऊस, सातपूर येथे आयोजित ‘इंडस्ट्रीयल मिट’मध्ये मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार डॉ.शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे,  निमाचे अध्यक्ष आशिष नहार, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य चे सचंलालक सतीश सूर्यवंशी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक अनिल गावित,  निमा सचिव राजेंद्र अहिरे, कौशल्य विकासचे प्र. उपायुक्त श्री. रिसे, उपसंचालक आर एस मुंडासे यांच्यासह औद्योगिक आस्थापनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार औद्योगिक संघटना, उद्योग व त्यांचे ट्रस्ट, केंद्र किंवा राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम व स्वयंसेवी संस्था यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्याचा अधिकार आहे. दत्तक घेण्याच्या 10 वर्षे कालावधीसाठी आर्थिक सहभाग किमान 10 कोटी व 20 वर्षे कालावधीसाठी आर्थिक सहभाग 20 कोटी रूपयांचा असणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) धोरणात्मक भागीदार म्हणून काम करणार असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना त्यांचे स्थान, मूल्यांकन आणि संभाव्यतेच्या आधारे तीन याद्यांमध्ये विभागले जाणार असून त्यांच्या जागेची  व इमारतीची मालकी शासनाकडे राहील. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांबाबत शासनाची धोरणे कायम राहणार आहेत. प्रत्येक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक पर्यवेक्षण समिती (आयएमसी) असेल जिथे नवीन येणार भागीदार अध्यक्ष असेल तर सचिव आय.टी.आय.चे प्राचार्य/ उपप्राचार्य अथवा शासनाने नियुक्त केलेली व्यक्ती असेल. या संदर्भात कोणताही वाद मिटविण्यासाठी राज्यस्तरीय संचलन समिती असणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
यावेळी मंत्री श्री. लोढा यांनी उपस्थित औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

जनसुनावणी संपन्न
मंत्री श्री. लोढा यांच्या उपस्थितीत आज दुपारी भोसला मिलिटरी स्कूलमधील सभागृहात कौशल्य, रोजगार, उद्योजकता नावीण्यता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी जनसुनावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार सीमा हिरे, संचालक श्री. सूर्यवंशी, सहसंचालक अनिल गावित आदी उपस्थित होते. मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले की, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा नावलौकिक उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.
०००००

प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी कृषिमंत्र्यांनी साधला संवाद

छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका) – शेती हा व्यवसाय अधिकाधिक किफायतशीर व्हावा. कृषी विभागाचे सर्व निर्णय हे शेतकऱ्यांना मदत करणारे व हिताचे व्हावे. यादृष्टीने शेतकऱ्यांच्या सुचना ऐकून त्यास शासन प्राधान्य देत आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज येथे केले.

कृषी विभागाच्या वतीने प्रगतीशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद आयोजीत करण्यात आला होता.  जालना रोडवरील शिवनेरी लॉन येथे हा कार्यक्रम पार पडला.  छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकरी या परिसंवादात सहभागी झाले होते.विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर व लातूर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री ॲड. कोकाटे हे होते. आ. अनुराधा चव्हाण, कृषी आयुक्त सुरज मांढरे, स्मार्टचे प्रकल्प संचालक डॉ. हेमंत वसेकर, संचालक आत्मा अशोक किरनळ्ळी , विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख तसेच सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिसंवादात कापुस, मका, सोयाबीन,फळबाग , संरक्षित शेती, मसाला शेती, शेतकरी गट-उत्पादक कंपनी, अन्न प्रक्रिया उद्योग, शेती पुरक व्यवसाय, नैसर्गिक शेती  करणाऱ्या शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले होते. त्यातील शेतकऱ्यांनी आपल्या गटामार्फत मांडलेल्या सुचना कृषीमंत्र्यांनी ऐकल्या. या सुचनांची नोंद घेण्यात आली.

ॲड. कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती करतांना आलेले अनुभव, विद्यापीठांनी केलेल्या शिफारसी, बाजारपेठ इ. सर्व बाबींचा एकत्रित अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रशासनाचे कृषी शास्त्रज्ञ व विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांचे पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांना माती परिक्षण सुविधा अधिक जवळ उपलब्ध व्हावे यासाठीही शासन प्रयत्नशील असून फिरत्या प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या सेंद्रीय शेती मालाच्या विक्रीसाठी स्वतंत्र मॉल शासनाच्या जागेवर बांधण्यात येणार आहेत,असेही ॲड. कोकाटे यांनी सांगितले.

डॉ. हेमंत वसेकर यांनी सांगितले की, लातूर येथे १० हजार मे. टन शेती उत्पादन साठवता येतील असे सायलो  तयार करण्यात येत आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांना  शेतमाल साठवणुकीची सुविधा उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अटीशर्तीतील बदल, पिकांसाठीच्या वाणांची उपलब्धता, यंत्रांची अनुदानावर उपलब्धता अशा विविध सुचना मांडल्या. शेतातील मजूरीचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा, प्रामुख्याने फळबागांसाठी  अस्तरीकरणासह शेततळी, निर्यात सुविधा केंद्र उभारणी, हळद, अद्रक अशा पिकांची आधारभूत किंमत निश्चित करणे, मक्याचे वाण विकसित करणे, संरक्षित शेतीसाठी विमा योजना, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना एमआयडीसीत जागा मिळण्यात आरक्षण, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अनुदानात ३५ टक्क्यांवरुन ६० टक्क्यांपर्यंत वाढ, शेती प्रक्रिया उद्योग, सेंद्रीय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा विक्रीची सुविधा, शेतमाल वाहतुकीसाठी वाहन खरेदीसाठी अनुदान अशा विविध मागण्या मांडल्या.

०००००

शेतकऱ्यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाचा लाभ व्हावा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.३० (जिमाका) : भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्यावतीने जिल्ह्यात दि.२९ मे ते १२ जून या कालावधीत विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कृषी शास्त्रज्ञ थेट गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते दिग्रस येथे जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मयूर ढोले, कृषी उपसंचालक राहुल चव्हाण, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.नंदकिशोर हिरवे, श्री.चांदुरकर, पुसदचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, दारव्हाचे उपविभागीय कृषी अधिकारी संध्या सावंत, दिग्रसचे तालुका कृषी अधिकारी श्री.राजपूत, इफकोचे जिल्हा प्रतिनिधी संतोष फलटणकर उपस्थित होते.

कृषी विभागाच्या सर्व यंत्रणांनी गावे, वाड्या- वस्त्या येथे जाऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करावे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर शास्त्रज्ञांनी उपाययोजना सूचविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्री.राठोड यांनी केले. सोबतच चित्ररथाद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांचा सहभाग जास्तीत जास्त वाढवावा, असे सांगितले.

कृषी तंत्रज्ञानाच्या गावोगावी जनजागृतीसाठी विकसित कृषी संकल्प अभियान कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन- अफ्रो व ईफ्को यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.

अभियान जिल्ह्यातील २०० गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान चर्चा सत्राद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे करिता कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, दोन्ही कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी होणार असून शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, तालुक्यात काम करणारे प्रगतीशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी यांचा सुद्धा सहभाग असणार आहे.

000

 

ताज्या बातम्या

आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या

0
बुलडाणा, (जिमाका) दि. २०:  प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा -२  व राज्य शासनाच्या आवास योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 1 लाख 20 हजाराहून जास्त घरकुलांचे उद्दिष्ट ठेवण्यात...

उद्योगस्नेही वातावरणातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

0
छत्रपती संभाजीनगर दि. २०: राज्यात अधिकाधिक गुंतवणूक यावी यासाठी उद्योगांना सर्व ते सहकार्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रशासकीय विभागांनी समन्वय...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

0
पुणे दि.२१: आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे शुक्रवार (२०) रोजी दर्शन...

आर्थिक महाशक्ती होताना व्यापार व उद्योगांचे महत्त्वाचे योगदान – केंद्रीय मंत्री अमित शाह

0
मुंबई, दि. २०: देशाच्या नीती निर्धारणांमध्ये मूलगामी बदल घडविले असून भारतास २०२७ पर्यंत जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती म्हणून स्थान संपादन करताना व्यापार व उद्योगांचे...

पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात विचारवंत दिले- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. २० : पश्चिम बंगालने देशाला अनेक क्षेत्रात थोर विचारवंत व क्रांतिकारक दिले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लाल - बाल - पाल या त्रयींसह...