गुरूवार, मे 8, 2025
Home Blog Page 946

शासन आपल्या दारी – बांधकाम कामगारांसाठी सुविधा

महाराष्ट्र शासन शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्र बिंदू  मानून अनेक योजना राबवित असते. या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्यांना त्याचा लाभ मिळून देण्यासाठी राज्य शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गत आज आपण जाणून घेऊ बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध योजना व सुविधांची माहिती.

बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य विषयक सुविधा, आर्थिक सहाय्य, आदी विविध सुविधा देत आहे. या सुविधांमुळे बांधकाम कामगारांचे जीवनमान सुसह्य होण्यास मदत होत आहे.

१) सामाजिक सुरक्षा-

  • विवाहाच्या  खर्चाची  प्रतिपूर्ती  रुपये ३० हजार
  • मध्यान्ह भोजन –  कामाच्या  ठिकाणी  दुपारी  पौष्टिक  आहार
  • प्रधानमंत्री श्रमयोगी  मानधन  योजना
  • व्यक्तिमत्व विकास  पुस्तक  संचाचे  वाटप
  • अवजारे खरेदी करिता  ५ हजार  रुपये  मदत
  • सुरक्षा संच  पुरविणे  अत्यावश्यक  संच  पुरविणे

आवश्यक कागदपत्रे –

सर्व योजनांकरिता आवश्यक

  • अर्जदाराचा फोटो,
  • आधार कार्ड,
  • रेशन कार्ड.
  • बँक पासबुक  झेरॉक्स
  • बांधकाम कामगार  नोंदणी  प्रमाणपत्र

सामाजिक सुरक्षा योजनेकरिता

  • शपथपत्रआणि  हमीपत्र  (योजनेनिहाय)
  • विवाह नोंदणी  प्रमाणपत्र  (विवाह  खर्च  प्रतिपूर्ती  योजना)

 (२) शैक्षणिक सहाय्य-

या  योजने  अंतर्गत  सर्व  लाभ  फक्त  नोंदणीकृत  बांधकाम  कामगारांच्या  पहिल्या  दोन  मुलांसाठी  लागू आहेत.

  • इयत्ता  पहिली  ते  सातवी  प्रतिवर्ष  रु. २ हजार  ५००  आणि इ. आठवी  ते  दहावी –  प्रतिवर्ष  रु.  ५ हजार.
  • इयत्ता दहावी  व  बारावीमध्ये  ५०%  पेक्षा  अधिक  गुण  प्राप्त  झाल्यास  रु. १०  हजार.
  • इयत्ता अकरावी  व  बारावी च्या  शिक्षणासाठी  प्रतिवर्ष  रु. १०  हजार.
  • पदवी अभ्यासक्रम  शिक्षणासाठी  प्रतिवर्ष  रु.  २० हजार.
  • MSCIT शिक्षण  मोफत
  • वैद्यकीय शिक्षणाकरिता  प्रतिवर्ष  रु. १  लाख  व  अभियांत्रिकी  शिक्षणाकरिता – रु. ६० हजार.
  • शासनमान्य पदविकेसाठी  प्रतिवर्ष  रु. २०  हजार  व  पदव्युत्तर  पदवीसाठी  प्रतिवर्ष  रु. २५  हजार.

शैक्षणिक योजने कागदपत्रे

  • पाल्याचे  शाळेचे  ओळखपत्र
  • ७५% हजेरीचा  शाळेचा  दाखला
  • किमान ५०%  गुण  मिळाल्याची  गुणपत्रिका.
  • दहावी व अकरावीची गुणपत्रिका  मागील
  • शैक्षणिक इयत्तेत  उत्तीर्ण  झाल्याचे  प्रमाणपत्र  (वैद्यकीय, अभियांत्रिकी,  पदवी  व  पदव्युत्तर  अभ्यासक्रमासाठी )
  • MSCIT उत्तीर्ण झाल्याचे  प्रमाणपत्र

३) आरोग्यविषयक –

  • नैसर्गिकप्रसूतीसाठी रु. १५ हजार व शस्त्रक्रियाद्वारे प्रसूतीसाठी रु.२० हजार.
  • गंभीर आजाराच्याउपचारार्थ रु.१ लाख.
  • ७५% पेक्षा जास्तअपंगत्व आल्यास रु.२ लाख.
  • व्यसनमुक्तीकेंद्रातील उपचाराकरिता रु.६ हजार.

आरोग्य विषयक योजनेसाठी कागदपत्रे

  • प्रसूतीचे प्रमाणपत्र (प्रसूती साहाय्य योजना)
  • गंभीर आजारअसल्याचे प्रमाणपत्र (उपचारार्थ मदत करिता)
  • ७५% अपंगत्वअसल्याचे प्रमाणपत्र (आर्थिक मदत करिता)
  • व्यसनमुक्तीकेंद्रातून उपचार घेत असल्याचे प्रमाणपत्र

 ४) आर्थिक

  • कामगाराचा  कामावर असताना  मृत्यू  झाल्यास  रु. ५ लाख  (कायदेशीर वारसास मदत).
  • कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २ लाख (कायदेशीर वारसास मदत)
  • अटल  बांधकाम  कामगार आवास  योजना – रु. २ लाख अर्थसहाय्य
  • कामगाराचा ५० ते ६० वर्ष  वयोगटात  मृत्यू  झाल्यास  अंत्यविधीसाठी  रु. १०  हजार  मदत
  • कामगाराचा  मृत्यू झाल्यास  त्याच्या  पत्नीस  अथवा  पतीस  प्रतिवर्ष  रु.  २४ हजार (५ वर्ष मदत)
  • गंभीर आजाराच्या उपचारार्थ  रु. १ लाख.

आर्थिक विषयक योजनेसाठी कागदपत्रे

  • मृत्यू दाखला व ठेकेदाराचे कामावर असल्याचे प्रमाणपत्र
  • प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याचे प्रमाणपत्र

अर्ज कुठे करावा 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कार्यालयात किंवा https://mahabocw.in/mr/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करता येईल.

  • नंदकुमार बलभीम वाघमारे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

०००

लक्षावधी अनुयायांच्या साक्षीने दीक्षाभूमीवर २०० कोटींच्या ई-भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न

नागपूर दि. २४ : नागपूरच्या दीक्षाभूमीवर ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या अलोट जनसागराच्या साक्षीने राज्य शासनाने २०० कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन संदेश देऊन तर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या शुभ कार्याची आज मुहूर्तमेढ रोवली.

नागपूर येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर ही घोषणा करण्यात आली. यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला अधिकृत एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. दीक्षाभूमीच्या 22.80 एकर परिसराचा विकास जागतिक दर्जाचा करण्यात येणार आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक्स कळ दाबत या विकास कार्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्य शासनातर्फे ७० कोटी रुपयांच्या धनदेशाचे वितरणही करण्यात आले.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, प्रमुख पाहुणे डॉ.आफिनिता चाई चाना, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे सदस्य डॉ.कमलाताई रा.गवई, अॅड. मा.मा. येवले, डॉ. सुधीर फुलझेले, अॅड आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ.राजेंद्र गवई, डी.जी.दाभाडे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम,भन्ते नाग दीपांकर,प्रादेशिक उपाआयुक्त सिद्धार्थ गायकवाड, समाज कल्याण उपायुक्त सुकेशिनी तेलगोटे यांची उपस्थिती होती.

दीक्षाभूमीच्या विकास कामाचे ई-भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश प्रक्षेपित करण्यात आला. 200 कोटींचे विकास कार्य दीक्षाभूमीवर लवकरच पूर्ण होईल. दीक्षाभूमी व चैत्यभूमीवरील विकास कार्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून सर्व कामे जागतिक मानांकनाची व गतीने करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्हीडीओ शुभेच्छा संदेशात स्पष्ट केले.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाच्या स्तरावरील कामे होतील. यामध्ये या संपूर्ण 22.80 एकर परिसराचा कायापालट केला जाईल, आज ७० कोटींचा धनादेश दिला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबोधित करताना, नागपूर हे शहर देशाच्या अतूट श्रध्देचे केंद्र आहे. त्यामुळे कोणत्याही निमंत्रणाशिवाय, कोणीही बोलवल्याशिवाय या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय बाबासाहेबांच्या श्रध्देपोटी एकत्र येतो. त्यामुळे या ठिकाणी जे काही निर्माण होईल, जे काही बनेल ते भव्य असेल. ते जागतिक दर्जाचे असेल. जगातील बौद्ध धर्माचे विचारक ज्यावेळी या ठिकाणी महामानवा पुढे नतमस्तक व्हायला येईल त्यावेळी त्यांना या ठिकाणाच्या सोयीसुविधा जागतिक दर्जाच्या मिळतील. दीक्षाभूमीचा विकास हा माझ्यासाठी भावनिक विषय आहे. दीक्षाभूमी माझ्या मतदार संघात आहे. त्यामुळे २०० कोटींचा हा विकास जागतिक दर्जाचा होईल, असे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी दीक्षाभूमीच्या विकासाचे हे दुसरे पर्व असल्याचे घोषित केले. यापूर्वी मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमीच्या विकासाचे झपाट्याने काम सुरू झाले होते. मात्र मधल्या काळात त्याला अडथळा आला.आता हा अडथळा दूर झाला असून लवकरच कामे पूर्णत्वास जाईल असे त्यांनी सांगितले.

हे राज्य बाबासाहेबांच्या वैचारिक वारश्याला पुढे नेणारे असून लंडन मधील बाबासाहेबांच्या घराचे स्मारकात रूपांतर असो, जापान मधील विद्यापीठाच्या पुतळ्यांचे अनावरण असो, की इंदू मिलच्या विकासाचे कार्य असो. बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे सर्व निर्मिती भव्य -दिव्य असेल व पुढील वर्षा अखेरपर्यंत इंदुमिल येथील बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दीक्षाभूमीवर जमलेल्या अथांग भीमसागराला अभिवादन करताना देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांचे नागपुरात स्वागत असल्याचे सांगितले. देश पातळीवर बुद्धिस्ट सर्किट पूर्ण केल्याचा आपल्याला आनंद असल्याबद्दल, आणि या कार्याला देशभरातून दिल्या गेलेल्या कौतुकाच्या पावती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी थायलंड येथील डॉ. अफिनिता चाई चाना यांनी यावेळी संबोधित केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानव कल्याणाच्या उत्थानार्थ केलेले कार्य केवळ भारतासाठी नाही तर थायलंड सारख्या देशातही पूजनीय आहे. आपले विरोधक किती मोजण्यापेक्षा आपल्या विचारांची माणसे वाढविण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे. आजच्या परिस्थितीत गौतम बुद्धांचे विचार जगाच्या परिप्रेक्शामध्ये उपयुक्त ठरतात.

कार्यक्रमाची प्रस्तावना दीक्षाभूमी स्मारक समितीचे राजेंद्र गवई , सूत्रसंचालन विलास गजघाटे तर आभार प्रदर्शन अॅड. आनंद फुलझले यांनी केले.

ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यास राज्य शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.२४ : ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांच्या मागण्यांबाबत त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन राज्य शासनाच्यावतीने सकारात्मक पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्यचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

सोमेश्वर येथे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगाम शुभारंभाप्रंसगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष प्रणिता खोमणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वाटचाल योग्य दिशेने सुरु आहे. २०२२-२३ या गाळप हंगामाकरीता राज्यात सर्वाधिक असा प्रती मे. टन ३ हजार ३५० रुपये इतका ऊसदर जाहीर केला आहे. आगामी काळातही आपल्या कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी संचालक मंडळांने प्रयत्न करावेत. यंदाचे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे उसाच्या क्षेत्रात व साखर उत्पादनात होणारी घट याचाही विचार करावा.

साखर कारखान्याने प्रदूषणविषयक नियमांचे पालन करावे

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने लेखापरीक्षण केल्यानंतर पर्यावरणबाबत निष्काळजी केल्याबद्दल राज्यातील ४५ साखर कारखाने बंद करण्याबाबत केंद्रीय पर्यावरण विभागाने कळविले आहे. याचा विचार करता संचालक मंडळाने बदलत्या काळानुसार नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. साखर उद्योगाबाबत कारखान्यांचे संचालक मंडळ, अधिकारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अभ्यास करावा.

पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे

कालवा सल्लागार समितीच्या माध्यमातून पुणे, सातारा, सोलापूर व अहमदनगर या जिल्ह्याला पाणी देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. जनाई सिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी अत्याधुनिक पंप व त्याअनुषंगिक बाबी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मल:निस्सारण प्रक्रिया प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी वापरण्याबाबत विचार करण्यात येत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत काम सुरु आहे. मुळशी धरणातील पाणी वीजनिर्मिती ऐवजी जिल्ह्यातील हवेली पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती तालुक्यातील भागाला मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर्षीचे पावसाने ओढ दिल्यामुळे पाणी काटकसरीने वापरून बचत करण्याचे नियोजन करावे.

राज्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असून ऊसतोड कामगारांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सकारात्मक मार्ग काढून न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्न करण्यात येईल. शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी १ रुपयांत पीक विमा, गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह विमा योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. जगताप यांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत माहिती दिली.

कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मोळी पुजन करून मोळी गव्हाणामध्ये सोडून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

000

कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा सोहळा दिमाखात साजरा

पालकमंत्री हसन मुश्रीफ व मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर दि. 24 (जिमाका) : छत्रपतींची राजधानी असलेल्या करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला.

कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हा उत्सव जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.

आज झालेल्या दसरा सोहळ्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले.

तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभागाच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांनी सोने लुटल्यानंतर बंदुकीच्या फैरी झडताच उपस्थित नागरिकांनी उत्साहात सोने लुटले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना नागरिकांनी सोने व दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

या सोहळयास पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील -भुजबळ, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, संजय पाटील, योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, दसरा महोत्सव समितीचे ऋतुराज इंगळे, विक्रमसिंह यादव, दिग्विजयराजे भोसले, बाबा चव्हाण, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, ऍड.राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते आदींसह विविध विभागांचे मान्यवर, जहागीरदार, सरदार, सरकार घराण्यातील मान्यवर, पदाधिकारी, पोलीस व विविध विभागांचे अधिकारी, आणि निमंत्रित उपस्थित होते.

भव्य मिरवणुकीने वेधून घेतले लक्ष- सजवलेले हत्ती, उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत तालमींचे कुस्तीगीर, खेळाडू सहभागी झाले होते. तर रस्त्याच्या दुतर्फा एनसीसी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. या मिरवणूकीचे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा नियोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य महादेव नरके, आदित्य बेडेकर, अजेय दळवी, ऋषिकेश केसकर, सुखदेव गिरी, वासिम सरकवास, आनंद काळे, जयदीप मोरे यांच्यासह अन्य सदस्यांनी केले.

नागरिकांना शाही दसरा महोत्सव सोहळा पाहता यावा यासाठी दसरा चौकात एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि.२४ : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. एफआरपी आणि साखरेचा दर ठरवतांना शेतकऱ्यांचे हित लक्षात घेतले जाईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील, कारखान्याचे संचालक आदी उपस्थित होते.

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे कामकाज उत्कृष्टपणे सुरू असून असेच पुढेही सातत्य कायम टिकवून ठेवावे असे सांगून श्री. वळसे पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या धोरणानुसार कारखान्यात इथेनॉल निर्मिती करण्यात येत आहे. इथेनॉल खरेदी करण्यासाठी दर निश्चिती केली असून त्यामुळे कारखान्यांना त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमखास उत्पादन मिळेल. भीमाशंकर कारखान्यानेदेखील इथेनॉल प्रकल्प हाती घेतला आहे.

भीमाशंकर कारखान्याने असलेला चांगला ताळेबंद टिकवून ठेवावा. परिसरात गुळाचे गुऱ्हाळ असण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. ऊसाच्या कमी उत्पादनामुळे यावर्षी ऊस कमी होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी चांगले काम करीत असून त्यांच्या अडचणी असल्यास त्या संचालक मंडळापुढे मांडाव्यात, त्या सोडविल्या जातील, असेही श्री.वळसे पाटील म्हणाले.

कारखान्याची ऊस गाळप क्षमता पूर्वी ६ लाख टन इतकी होती. परंतू कारखान्याचा विस्तार केल्याने गेल्यावर्षी गाळप क्षमता ९ लाख टन झाली असून शेतकऱ्यांनाही चांगला दर देवू शकलो. ऊस पिकाचे उत्पादन वाढण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याचा माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळून फायदा होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून एकरी शंभर टन ऊस पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. बेंडे म्हणाले, कारखान्याने वीज प्रकल्पातून ६ कोटी ८० लाख युनिट वीज निर्मिती केली. मागील वर्षी क्षमतेपेक्षा जास्त गाळप केले. यावर्षी १ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात नवे तंत्रज्ञान वापरून चांगल्या दर्जाची साखर निर्माण करणार आहोत. येत्या महिन्याभरात इथेनॉल निर्मितीला सुरूवात होणार आहे. शेवटच्या शेतकऱ्याचा ऊस तोडल्या शिवाय कारखाना बंद केला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

श्री. गावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सहकार मंत्री श्री. वळसे पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपन व गव्हाण पूजन करण्यात आले. यानंतर गव्हाणात मोळी सोडून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्य, न्यायाचा लौकिक पुन्हा एकदा जगभर पोहचणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दिनांक 24 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): नाशिकच्या पवित्र भूमीत बुध्द स्मारक परिसरात महाबोधिवृक्षाच्या रोपणातून आज आपण पुन्हा एकदा तथागतांच्या शांतीच्या शिकवणीची उजळणी करणार आहोत. हे रोपण पुढच्या कित्येक पिढ्या लक्षात ठेवतील. आजच्या या ऐतिहासिक महाबोधिवृक्ष रोपणातून महाराष्ट्राचा सामाजिक ऐक्याचा, सामाजिक न्यायाचा लौकीक पुन्हा एकदा जगभर पोहचेल, असा विश्वास  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. आज नाशिक येथील ऐतिहासिक आज  बुद्ध स्मारक, त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे आयोजित ऐतिहासिक महाबोधिवृक्ष भव्य महोत्सव 2023  कार्यक्रम प्रसंगी दूरदृष्यप्रणलीद्वारे शुभेच्छा संदेश देतांना ते बोलत होते.

त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे आज राज्य शासन व शांतदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीलंकेतील महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीलंका येथील बोधीवृक्षाचे प्रमुख पूज्यनीय हेमरत्न नायक थेरो,  श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विदुर विक्रमनायके, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, पर्यटन, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, श्रीलंका येथील महिंदावस थेरो पूज्यनीय भिक्खू डॉ.वास्कडूवे, मलेशिया येथील महाथेरो संघराजा, पूज्यनीय भिक्खू सरणांकर, श्रीलंका येथील आनंदा नायके थेरो पूज्यनीय भिक्खू नाराणपणावे, पूज्यनीय भिक्खू डॉ.पोंचाय, महाराष्ट्र भिक्खू संघ सल्लागार प्रा.डॉ.भदन्त खेमधम्मो महास्थवीर,आमदार प्रा.देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज आहिरे, राहुल ढिकले शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रशासक तथा मनपा आयुक्त श्री.अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, बार्टीचे संचालक सुनिल वारे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ,  समिती सदस्य आनंद सोनवणे, प्रकाश लोंढे  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, बौद्ध अनुयायी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संदेशात पुढे म्हणाले की, महाबोधीवृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक न्याय विभागाचे कार्य कौतुकास्पद आहे. विजयादशमीच्या दिवशी आज अपूर्व असा योग जूळून आला आहे. भगवान बुद्धांचा हा शांतीचा आणि ज्ञानमार्गाचा संदेश घेऊनच भारताचे महान सुपुत्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची दिशा दाखवली. त्यांनी आजच्याच दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजारो अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. हा भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी सामाजिक न्यायाचा, सामाजिक क्रांतीचा दिवस होता. महाराष्ट्र ही पुरोगामी आणि समता-बंधुता आणि एकता या मुल्यांना आदर्श मानणारी भूमी आहे. संत-महंताची भूमी आहे. या संतानीही आम्हाला समतेचा वसा दिला आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीला स्वाभिमानाचा मंत्र दिला. जाज्वल्य असा देशाभिमान, देव-धर्म आणि देवळांच्या रक्षणांचा धडा घालून दिला. महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महाराष्ट्र सुपुत्रांनी महाराष्ट्राची जडण-घडण केली. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आणि अन्य राज्यांसाठी आदर्श म्हणून काम करतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला सामाजिक न्यायाची वाटच आमच्यासाठी आदर्श आहे, त्याच आदर्शांवर आमची वाटचाल सुरु असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवासाठी देशविदेशातून आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार जगासाठी नेहमीच प्रेरक – मंत्री छगन भुजबळ

कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, आज नाशिकच्या भूमीत या त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात भगवान गौतम बुद्धाना ज्या महाबोधीवृक्षाच्या छायेत सिद्धी मिळाली, त्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण होत आहे. आजचा हा क्षण अतिशय ऐतिहासिक आहे. आज विजयादशीच्या दिवसाचे औचित्य साधून  ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सव साजरा होत आहे. व या सोहळ्यात भगवान गौतम बुद्धांच्या  विचारांचे सोने लुटण्यासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. या महाबोधीवृक्षामुळे नाशिकच्या इतिहासात मोलाची भर पडली आहे. जे जे चांगल, उदात्त आहेत.  ते नाशिक मध्ये येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी 18 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन दिला.

श्रीलंकेतून बोधीवृक्ष येथे आणला ही श्रीलंकेची नाशिक आणि महाराष्ट्रासाठी मोठी भेट आहे  शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्धांचे मौलिक विचार जगासाठी आजही तितकेच प्रेरक असून तेच जगाला वाचवू शकतात. यामुळे या विचारांचा प्रसार आणि प्रचार होणे आवश्यक आहे, अशी भावना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, सुमारे २६०० वर्षांपूर्वी, भारतातील बोधगया बिहार येथे निरंजना नदीच्या काठावर असलेल्या वृक्षाखाली भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झाले. पुढे सम्राट अशोक यांनी आपल्या मुलांना श्रीलंकेत बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठविले. तेव्हा अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा येथे या फांदीचे रोपण केले. त्यानंतर हे झाड महाबोधी वृक्ष नावाने ओळखले जाते. तेव्हापासून बौद्ध भिक्षू आणि समर्पित राजांनी त्यांची काळजी घेतली आणि संरक्षित केली.आज या महाबोधी वृक्षाच्या फांदीचे आपल्या नाशिकमध्ये रोपण करण्यात येत आहे. ही नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्याच्या भूमीत बौध्द धर्म स्वीकारण्याचा निर्णय घोषित केला. आणि विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे लाखो लोकांच्या उपस्थितीत धर्माचा स्वीकार केला. या वृक्षाच्या दर्शनासाठी देश- विदेशातील नागरिक येतील. या वृक्षाचे संगोपन आणि संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ती आपण सर्व मिळूण पार पाडूया असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

भगवान बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाचा स्वीकार करावा – केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार

भगवान बुद्धांचे ज्ञान व बोधीवृक्ष हे भारताच्या इतिहासाच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणता येईल. भगवान गौतम बुद्धांच्या अष्टांगिक मार्गाने जीवन सुखकर करता येत असल्याने या अष्टांगिक मार्गाचा अवलंब जीवनात करावा. तसेच महाबोधिवृक्षाच्या रोपणाने नाशिकमध्ये बुद्धांच्या ऊर्जादायी विचारांची सुरुवात या वृक्षारोपणच्या माध्यमातून झाली आहे, ही नाशिकसाठी गौरवाची बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.

नाशिक जागतिक स्तरावर पर्यटन स्थळ म्हणून नावरूपास येणार – मंत्री गिरीश महाजन

ऐतिहासिक महाबोधीवृक्ष महोत्सव कार्यक्रमासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केली असून नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा समारंभ आहे. यामुळे नाशिक जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येणार आहेत असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाबोधी वृक्षामुळे नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल -पालकमंत्री दादाजी भुसे

सम्राट अशोक विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात नाशिकमध्येच श्रीलंकेतील अनुराधापुरच्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले आहे. या महाबोधीवृक्षामुळे  नाशिकची वेगळी ओळख निर्माण होणार असून ही आपल्या सर्व नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरोवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले. सर्व नाशिककरांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

बोधीवृक्षाच्या माध्यमातून भारत आणि श्रीलंकेचे ऋणानुबंध दृढ होणार – विदुर विक्रमनायके

श्रीलंकेचे केंद्रीय बुद्धा शासन धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विदुर विक्रमनायके यावेळी बोलतांना म्हणाले, जास्त बोललो तर जास्त चुका होतात. कमी बोललो तर कमी चुका होतात.  काही बोललोच नाही तर चुकाच होत नाहीत. 2300 वर्षापूर्वी भारतातूनच बोधीवृक्ष श्रीलंकेत नेण्यात आला. आता तो पुन्हा या निमित्ताने भारतात आणण्यात आला आहे. बोधीवृक्ष संस्कृती आणि परंपरेच प्रतीक आहेत. मानवी जीवनात मनाने मनाशी साधलेला संवाद हा महत्त्वाचा आहे. बोधीवृक्ष शांततेच प्रतीक आहे. या कार्यक्रमामुळे अनुराधापुर आणि नाशिक बरोबरच भारत आणि श्रीलंकेचे ऋणानुबंध अधिक दृढ होईल यात शंका नाही. या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याने मनस्वी आभार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महाबोधीवृक्षाचे रोपण व कोनशिलेचे अनावरण

कार्यक्रमापूर्वी श्रीलंका येथील अनुराधापूर येथून आणलेल्या महाबोधीवृक्षाच्या फांदीची त्रिरश्मी बुद्ध लेणी स्‍मारकाच्या प्रवेशद्वारपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी मिरवणूकीत शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे पूज्य भिक्खू सुगत थेरो, पूज्य भिक्खू संघरत्न थेरो व देशविदेशातून भिख्यु मोठ्या संख्येने सहभागी झाले. शांततेचे प्रतीक म्हणून दोन्ही देशातील मंत्री महोदयांनी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देवून एकमेकांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येऊन स्तुपात जाऊन भगवान बुद्धांना वंदन करण्यात आले. त्यानंतर श्रीलंकेतील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येऊन  कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भिक्खू सुगत थेरो यांनी केले. तर आभार भिक्खू संघरत्न थेरो यांनी मानले.

 

पतसंस्थांनी विश्वासार्हता जपण्याचे काम करावे – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि.२४ : सहकार क्षेत्रात पतसंस्थांनी पारदर्शक कारभार करून विश्वासार्हता जपण्याचे काम करावे आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

घोडेगाव येथे श्री संत सावता महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सोमवारी सायंकाळी आयोजित सावित्रीबाई फुले कन्या दत्तक पालक योजनेअंतर्गत १०१ मुलींना शालेयपयोगी साहित्याचे वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी,गट विकास अधिकारी वाळूंज,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भास्कर,
विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशराज काळे, सरपंच अश्विनी तिटकारे, पंचायत समितीचे माजी सभापती सखाराम घोडेकर आदी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, सहकारामध्ये विविध संस्था, बँका चुकीच्या कारभारामुळे अडचणीत आल्याने त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो. संस्थांमधील असलेला पैसा हा जनतेचा असून आपण फक्त त्याचे विश्वस्त आहोत याचे भान ठेवुन संस्थाचालकांनी विश्वस्तांच्या भूमिकेने काम करावे, असेही श्री. वळसे पाटील म्हणाले.

संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भास्कर यांनी प्रास्ताविक केले. घोडेगावच्या माजी सरपंच क्रांती गाढवे यांनी आपले विचार व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा कुपवाडा (जम्मू काश्मीर) येथे उभारण्यासाठी राजधानीतून रवाना

नवी दिल्ली, दि. २३ : जम्मू आणि काश्मीर सीमेवरील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून हा पुतळा राजधानीतील महाराष्ट्र सदनातून निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांच्या हस्ते कुपवाडाकडे आज सकाळी रवाना करण्यात आला.

राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा समारंभपूर्वक कुपवाडा येथे 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई येथून रवाना करण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

हा पुतळा दिल्लीहून रवाना होण्यापूर्वी दिल्ली मराठी प्रतिष्ठानतर्फे येथील महाराष्ट्र सदनात  काल उशीरा रात्री  एक लहान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी प्रतिष्ठानतर्फे  निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग, सहाय्यक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावर,  मेजर जनरल सुजित पाटील, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सोहळ्यास दिल्लीतील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजभवनातून रवाना होणारा छत्रपतींचा हा पुतळा बडोदा, दिल्लीमार्गे रस्त्याने प्रवास करून साधारणत: दहा ते बारा दिवसात कुपवाडा येथे पोहोचेल.

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेच्यावतीने जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारत पाक सीमेवर मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे. भारतीय सैन्याच्या छावणीत उभारण्यात येणारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ x ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमीपूजन भारतीय सेनेच्या राष्ट्रीय रायफल्स च्या ४१ व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते दि. २० मार्च २०२३ रोजी झाले. नवीन तंत्रज्ञानाने बनविलेला छत्रपतींचा हा पुतळा जम्मू काश्मीर मधील प्रतिकूल हवामानात दीर्घकाळ तग धरेल असा बनवला गेला आहे.

‘आम्ही पुणेकर’ या संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, परिस्थिती अनुकूल असल्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर रोजी पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट

नागपूर, दि.  २४ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट दिली.  यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे येणाऱ्या सर्व अनुयायांचे स्वागत करीत उपमुख्यमंत्री महोदयांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठी हे शहर जगाच्या नकाशावर आले असल्याचे यावेळी ते म्हणाले.

आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे यांच्यासह मोठ्या संख्येने अनुयायी यावेळी उपस्थित होते.

000

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन

पुणे, दि. २४ : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उप जिल्हा रुग्णालय मंचर येथे अत्याधुनिक सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य डी.के.वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कृष्णा डायग्नोस्टिक केंद्राचे डॉ. परीमल सावंत, डॉ. संजयकुमार भवारी आदी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी या तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. येथे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तसेच बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच दुर्धर आजाराची पूर्व तपासणी केली जाणार आहे. गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यामाने सार्वजनिक खासगी तत्वावर या सीटी स्कॅन तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सी.टी.स्कॅन केंद्राचा या परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे, असेही श्री. वळसे-पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. जाधव यांनी केले.

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत थेट संवाद

0
छत्रपती संभाजीनगर, दि.७, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी, दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य...

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी साधला जीवन विकास प्रतिष्ठानमधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

0
छत्रपती संभाजीनगर, दि.7, (विमाका) :- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज येथील जीवन विकास प्रतिष्ठानला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी...

१६ वा वित्त आयोग ८ ते ९ मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

0
मुंबई,दि.७ : सोळाव्या वित्त आयोगाचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा   ८ व ९ मे , २०२५ रोजी  नियोजित आहे. आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या सह...

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

0
मुंबई, दि. 7: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध...

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे  – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. ७ : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत....